Homeटॉप स्टोरीशिवसेना कोणाची, याचा...

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी आता येत्या आठवड्यात, मंगळवारी, ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, या खटल्यात मांडले जाणारे मुद्दे आणि गुंतागुंतीचा युक्तीवाद पाहता, सध्याचे खंडपीठ हा खटला सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण पीठाकरे रेफर करण्याची दाट शक्यता आहे, असे राज्यघटनेचे अभ्यासक ॲड. भास्करराव आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

शिवसेना

कपिल सिब्बल यांनी काल न्यायालयासमोर असा दावा केला की, निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांच्या कक्षेबाहेर जाऊन एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. २०१८च्या शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षाच्या ९ प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी ६ जण तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील १६०पेक्षा अधिक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी होते. मात्र, आयोगाने ठाकरे गटाला असलेल्या या संघटनात्मक बहुमताकडे आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या लाखो प्रतिज्ञापत्रांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ आमदारांच्या संख्येलाच महत्त्व दिले.

सत्तेच्या प्रभावाखालील ‘परिस्थितीजन्य’ बहुमत

विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष यातील घटनात्मक फरक सिब्बल यांनी अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, केवळ काही आमदारांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षात फूट पडली असे मानता येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे सुरुवातीला असलेले संख्याबळ मर्यादित होते आणि सत्तेत आल्यानंतर मिळवलेले हे बहुमत नैसर्गिक नसून ते केवळ सत्तेच्या प्रभावाखालील ‘परिस्थितीजन्य’ बहुमत आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्षालाच राजकीय पक्ष मानणे लोकशाहीच्या मूळ तत्त्वांच्या विरुद्ध आहे.

शिवसेना

निवडणूक आयोगाची कृती कायदेशीर प्रक्रियेला धरून नाही!

शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने घाईघाईने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याची कृती कायदेशीर प्रक्रियेला धरून नसल्याचा मुद्दा सिब्बल यांनी कोर्टात ठासून मांडला. ते म्हणाले की, जर अपात्रतेचा निर्णय आधी आला असता, तर या प्रकरणाची कायदेशीर स्थिती पूर्णपणे वेगळी असती. कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेल्या या महत्त्वपूर्ण घटनात्मक मुद्द्यांमुळे आता ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण देणारा ठरणार आहे.

1 COMMENT

  1. 11 ऑगस्टच्य् निकालाकडे राजकीय पक्षांबरोबर सामान्य माणसांचेही लक्ष लागले आहे.

Comments are closed.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content