तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील ‘तमिझगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १० वाजता विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत इतर ९ आमदारही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. एन. आनंद, आधव अर्जुन , राजमोहन, टी. के. प्रभू, के. जी. अरूणदास, सेंगोट्टईन, पी. वेंकटरमण, आदींचा यात समावेश असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून विजय यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. सरकार स्थापनेसाठी ‘विदुथलाई चिरुथाईगल काची’ (व्हीसीके) या पक्षाने आपली अधिकृत पाठिंब्याची पत्रे सादर केल्याने विजय यांचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. याव्यतिरिक्त काँग्रेस (५ जागा), सीपीआय (२ जागा) आणि सीपीआय (एम) (२ जागा) यांनीही विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या राजकीय जुळवाजुळवीमुळे तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या ६० वर्षांपासून असलेली द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन द्राविडी पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली असून एका नवीन राजकीय पर्वाची सुरुवात झाली आहे. आपल्याला सरकार स्थापन करण्याची मुभा द्यावी, याकरीता विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची सहा मेपासून रोज भेट घेतली. काल अखेर त्यांनी आपल्याला असलेल्या इतर मित्रपक्षांची पत्रे सादर केल्यानंतर राज्यपालांनी त्यांना काल सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले.
चेन्नईतील ‘जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम’मध्ये हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार असून राज्यपाल राजेंद्र अर्लेकर विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. या सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजय यांनी नुकतीच राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता, ज्याला आता मित्रपक्षांच्या पाठिंब्यानंतर अधिकृत बळ मिळाले आहे.
आंबेडकर, पेरियार आणि कामराज यांच्या विचारधारेवर आधारित पक्ष
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रस्थापित राजकीय गणितांना धोबीपछाड देत हे यश मिळवले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि कामराज’ यांच्या विचारधारेवर आधारित असलेल्या टीव्हीके पक्षाने तरुणांच्या आणि महिलांच्या पाठिंब्यावर सुमारे ३४.९२% मते मिळवली आहेत. तामिळनाडूमध्ये १९६७नंतर पहिल्यांदाच एका तिसऱ्या पर्यायाला जनतेने कौल दिल्याने या ऐतिहासिक बदलाची चर्चा संपूर्ण देशभर होत आहे.

