Homeमुंबई स्पेशलमुंबईत १ एप्रिलपासून...

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आहेत. त्यापैकी सुमारे १३ लाख ५४ हजार ९६६ वृक्ष रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये व इतर सार्वजनिक ठिकाणी आहेत. या वृक्षांच्या आरोग्य संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या अभियान अंतर्गत वृक्षांभोवती साचलेले सिमेंट-काँक्रिट काढून त्याजागी मोकळी लाल माती टाकणे, झाडांच्या खोडांवर ठोकलेले खिळे, जाहिरात फलक, दोऱ्या व केबल्स काढणे, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करणे अशा उपाययोजना केल्या जातात. झाडांच्या खोडांना गेरू-चुना लावून त्यांचे संरक्षण करण्याचे कामही यामध्ये समाविष्ट आहे. मुंबईत २०२५मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले होते. १ हजार ४६० झाडांवरील जाहिरात फलक हटविण्यात आले होते. यासोबत झाडांवरील तब्बल १७.४३ किलो खिळे काढण्यात आले होते. या अभियानामुळे वृक्षांना आवश्यक पाणी व प्राणवायू मिळून सुदृढ वाढ होण्यास मदत होते.

तज्ज्ञांच्या मते, वृक्षांच्या मुळांभोवती काँक्रिट असल्यास पाणी जमिनीत मुरत नाही, परिणामी मुळांची वाढ खुंटते आणि झाडे कोमेजण्याचा धोका वाढतो. खिळे, वायर व जाहिरातफलकांमुळे झाडांच्या खोडाला इजा होऊन भविष्यात झाडे कोसळण्याची शक्यता निर्माण होते. जनजागृती करणे, हे वृक्ष प्राधिकरणाचे कर्तव्य असल्याने या अभियानाला विशेष महत्त्व आहे. या अभियानात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग घेतला जाणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारीही यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, उपलब्ध संसाधनांचा वापर करुन ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content