Homeटॉप स्टोरीभाजपा सरकारने देशाची एकता...

भाजपा सरकारने देशाची एकता व अखंडता मोडीत काढली! 

भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता व अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षांत केले आहे. जातीय तणाव निर्माण करून भाजपा सामाजिक सौहार्द बिघडवत आहे. विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेसी विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत रमेश चेन्नीथल्ला यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले. रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुका दोन महिन्यांत होत आहेत, यासाठी काँग्रेस सर्व ताकदीने मैदानात उतरत आहे. राज्यातील सहा विभागात आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर जिल्हा स्तरावर, ब्लॉक स्तरावरही बैठका घेऊन पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. देशपातळीवर भाजपाविरोधी पक्षांची इंडिया आघाडी काम करत असून सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागावाटपावरही चर्चा झाली असून ही चर्चा सकारात्मक झालेली आहे. लवकरच जागावाटपाचा निर्णय होईल. २०१९च्या निवडणुकीत भाजपाला ३० टक्के मिळाली होती. म्हणजे ७० टक्के मते विरोधात होती. हे सर्व पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणे शक्य आहे. भाजपा व आरएसएसच्या विचारधारेविरोधात ही लढाई असून भाजपा देशाचा इतिहास, परंपरा, लोकशाही, संविधान व सर्व व्यवस्था मोडीत काढत आहे. भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचने हेच काँग्रेसचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातून जास्तीतजास्त खासदार विजयी करण्यासाठी काम केले पाहिजे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या फोडा व राज्य करा नितीच्या विरोधात देशात संताप आहे. भाजपा सरकारने सर्व व्यवस्था मोडीत काढल्याने राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्या यात्रेला अभूतपूर्व यश आले तसेच यश आता भारत जोडो न्याय यात्रेलाही येईल. महाराष्ट्राने भारत जोडो यात्रा यशस्वी केली होती. जनतेने या यात्रेला मोठा प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद भारत जोडो न्याय यात्रेलाही मिळेल. महाराष्ट्रात ही यात्रा पाच दिवस, सहा जिल्हे ४७९ किमी असून यात्रेचा शेवट मुंबईत होणार आहे. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. देशातील ७० कोटी जनतेचे उत्पन्न किमान वेतनापेक्षा कमी आहे. एवढी मोठ्या लोकसंख्येचे जीवनमान खालावले आहे. शेतकरी बेहाल आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. स्पर्धा परिक्षांचे पेपर फुटत आहेत, महागाई वाढली आहे आणि केवळ मुठभर मित्रांचा फायदा होत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून मुंबईपर्यंत ६९०० किमीचा प्रवास करणार आहे व मुंबईत महारॅली होणार आहे.  

अशोक चव्हाण म्हणाले की, सध्या वन नेशन वन इलेक्शनची चर्चा जोरात सुरू असून भाजपा लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही घेऊ शकते. निवडणुका केव्हाही होऊद्या पण आपण त्यासाठी तयार असेल पाहिजे. तेलंगणात निवडणुकीच्या चार महिने आधी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असेल अशी चर्चा केली जात होती. पण चित्र बदलले. सर्वांनी झोकून देऊन काम केले व तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली. कर्नाटकातही काँग्रेसने भाजपाचा पराभव करत मोठा विजय मिळवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रतेचा निकाल हा लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीने देशातील सर्वच राज्यात राजकीय अस्थिरता माजेल. हा निर्णय राजकीय होता. या निर्णयाचा काँग्रेस निषेध करत आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, २०२४ वर्षात आव्हाने आहेत. लोकसभा निवडणुका आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. या दोन्ही निवडणुकीमध्ये चांगले यश मिळाले पाहिजे. भाजपा विरोधात एकजूट करून निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वांनी एकत्र काम केले तर विजयाची पताका नक्की फडकेल. भारत जोडो यात्रेने एक चैतन्य निर्माण केले होते. त्याप्रमाणेच भारत जोडो न्याय यात्राही यशस्वी करून दाखवू.

पत्रकार परिषदेत राम मंदिरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, मंदिराचे बांधकाम अर्धवट झाले आहे. अशा अर्धवट बांधकामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे. हिंदू धर्माचे सर्वोच्च असलेल्या चारही शंकराचार्यांनी हेच म्हटले आहे. ते सुद्धा या कार्यक्रमाला जाणार नाहीत. काँग्रेसला निमंत्रण होते. पण हा कार्यक्रम राजकीय फायद्यासाठी आहे व अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परीषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार कुमार केतकर, माजी मंत्री नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बस्वराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, डॉ. विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड, AICCचे सचिव सोनल पटेल, आशिष दुआ, संपतकुमार, माजी खासदार हुसेन दलवाई, संजय निरुपम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, NSUIचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, उपाध्यक्ष नाना गावंडे, सरचिटणीस प्रमोद मोरे, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्यासह सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार अभिजित वंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केले. पत्रकार परिषदेत भारत जोडो न्याय यात्रेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content