.. तर आम्हीही निवडणुकीत देवाच्या-धर्माच्या नावावर प्रचार करू. जय भवानी.. जय शिवाजी, हर हर महादेव.., गणपती बाप्पा मोरया.. असे म्हणत प्रचार करू. मग मात्र आमच्यावर कारवाई करता कामा नये, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.
मुंबईतील नरीमन पॉईंट येथील ठाकरे गटाच्या शिवालय, या नूतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ठाकरे माध्यमांशी बोलत होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करण्याचे आवाहन केले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ असे जाहीर केले आहे. निवडणूक आयोग यावर काहीच कारवाई का करत नाही? आपण अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. यावर निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नाही. परंतु, एकमेव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, राम मंदिराचा मुद्दा घेतला तर त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली. ही कारवाई कमी होती की काय म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा मतदानाचा मूलभूत अधिकारही काढून घेतला. यावेळी मी अमित शाह यांच्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला तर निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर दिले नाही. मग, आम्हीही निवडणुकीत देवा-धर्माच्या नावावर प्रचार करू.. असे ठाकरे म्हणाले.
मध्य प्रदेशातील सत्ता राखण्यात भाजपा यशस्वी ठरला आहे. मध्य प्रदेशात लाडली बहना ही योजना राबवल्यानेच भाजपाला मोठे यश आले असल्याची चर्चा आहे. लाडली बहना फक्त मध्य प्रदेशातच आहे का? त्याचा लाभ मणिपूरमध्ये का होत नाही? महाराष्ट्रात का होत नाही? बहीण ही बहीण असते. लाडली बहना मध्य प्रदेशात यशस्वी होत असेल तर मुंबईत का होत नाही? मुंबईत अत्याचार का होत आहेत? मग मुंबईतील महिला बहना नाहीत का? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले.
धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांचे त्यांच्या उद्योगासाठी तिथेच स्थानांतर होणे गरजेच आहे. त्यांना 400 ते 500 फुटांची जागा मिळायला हवी. 80 ते 90 हजार झोपड्या अद्याप पात्र-अपात्रतेच्या सीमेवर आहेत. मला अडाणी यांना विचारायचे आहे की तुम्ही काय करणार आहात? पिढ्यान्पिढ्या धारावीवासीय राहत आहेत. त्यांना तेथेच राहायला मिळायला हवे. टीडीआर सक्ती करणार असाल यत मग त्याचे अधिकार आपल्याकडे घ्यायला हवेत. धारावीचा विकास झालाच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. मात्र, विकासकामांमुळे मुंबईकरांचा श्वास घुसमटला आहे. नियोजनशून्य कामामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सरकार केवळ कंत्राट काढत आहे. हे कॉन्ट्रॅक्ट सरकार आहे. अभ्युदय नगर बांद्रा रिक्लेमेशन हेदेखील अदानीला देण्यात येणार आहे, अशी माहिती मिळली आहे. त्यामुळेच 16 तारखेला भव्य मोर्चा अदानींच्या ऑफिसवर काढण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
तीन राज्यांत निवडणुका जिंकल्यात आता हिम्मत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले.