Homeडेली पल्समंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी असे: पंतांना विचारा. अगदी तेव्हाचे राजभवनही यास अपवाद नसे. पंत म्हणजे कायदा पूर्ण कोळून प्यायलेले गृहस्थ. दुसरे म्हणजे त्यांची निरीच्छ वृत्ती. वास्तविक ते अशा पदावर होते की अफाट संपत्ती ते सहज कमवू शकले असते, असे

पंत

आजचे अनेक अधिकारी पाहिल्यावर सहजच वाटून जाते. पण सुपारीप्रेमी पंत यांनी कधीही कोणाच्याही सुपारीच्या खांडाचेही मिंधेपणही स्वीकारले नाही. म्हणूनच त्यांचे म्हणणे कोणीही अमान्य करत नसे. विविध मुख्यमंत्री, कायदेतज्ञ रामराव आदिक, शीघ्रकोपी पतंगराव कदम किंवा कठोर शिस्तीचे द. म. सुखटणकर हेसुद्धा यास अपवाद नव्हते, याचे त्या काळात मंत्रालयात कार्यरत असणारे कर्मचारी आणि वृत्तसंकलन करणारे वार्ताहर प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. पंतांचे ‘आत्मभान’ हे छोटेखानी आत्मकथन वाचले की, त्याचा सहज प्रत्यय येतो.

मुंबई उच्च न्यायालयातही विविध प्रकरणांच्या संदर्भात पंतांचा नियमित वावर असे. त्यांनी एखादा मुद्दा शासनाच्या वतीने मांडला की, न्यायालय तो सामान्यपणे उचलून धरत असे. पंतबाळेकुंद्री आणि त्यांचे तत्कालीन वरिष्ठ म्हणजे नगरविकास सचिव डी. टी. जोसेफ यांनी अथक परिश्रम करुन मुंबई नागरी वारसा नियमावली सिद्ध केली. तिला अपेक्षेनुसार आव्हान देण्यात आले. न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांच्यासमोर ही सविस्तर सुनावणी झाली. प्रतिवादी होते गलेलठ्ठ विकासक आणि त्यांचे खंदे वकील. पण पंत सर्वांना पुरून उरले. परिणामी मुंबईचा बराच नागरी इतिहास बचावला. अन्यथा कुलाब्यापासून थेट माहीम-शीव या पट्ट्यात एकही ऐतिहासिक वास्तू वाचू शकली नसती. चहूकडे सिमेंटचे जंगल उभे झाले असते. पंतबाळेकुंद्री आणि जोसेफ ही लढाई एकहाती लढले. या दोघांचे ऋण मुंबई कधीच विसरू शकणार नाही. ही नियमावली आज देशभरातील राज्यांनी जवळपास तशीच स्वीकारली आहे. त्या अभूतपूर्व कामगिरीचा हा अल्पाक्षरी इतिहास या आत्मकथनात शब्दबद्ध केलेला आहे. पंत यांच्या निधनाने एक आदर्श लोकसेवक निजधामास गेला आहे.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content