साहित्य अकादमीने 24 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कवितासंग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1 साहित्यिक अभ्यासाला मिळाले आहेत. मराठी भाषेतील कादंबरीसाठी कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला तर कोंकणी भाषेतील लघुकथेसाठी प्रकाश एस. पर्येकर यांच्या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला आहे.
24 भारतीय भाषांमधील प्रतिष्ठित परीक्षक सदस्यांनी शिफारस केलेल्या पुरस्कारांना साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाने 20 डिसेंबर 2023 रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. पुस्तकांची निवड संबंधित भाषांमधील तीन सदस्यांच्या परीक्षकांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली होती. कार्यपद्धतीनुसार, कार्यकारी मंडळाने परीक्षकांनी एकमताने केलेली निवड किंवा बहुमताच्या आधारावर केलेल्या निवडीच्या आधारे पुरस्कार घोषित केले. पुरस्काराच्या आधीच्या पाच वर्षांत (म्हणजे 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान) प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकांशी संबंधित हे पुरस्कार आहेत.
प्रत्येकी 1,00,000/- रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून 12 मार्च 2024 रोजी कमानी सभागृह, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली- 110 001 येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.

मराठीचं “रिंगाण” समृद्ध करणारी कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्र्व समृद्ध करण्याची कामगिरी कादंबरीकार कृष्णात खोत यांनी केली आहे. त्यांच्या या शैलीवर आणि प्रतिभेवर साहित्य अकादमी पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी ‘रिंगाण’ मधून मराठी साहित्याचे रिंगण समृद्ध करणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कादंबरीकार कृष्णात खोत यांचे साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
‘आधुनिक जगरहाटीत ग्रामीण संस्कृती आणि आपल्या गावा-गावातील बदलत्या जीवनाचं नेमकं चित्रण करण्यात खोत यांचा हातखंडा आहे. तो त्यांनी आपल्या लेखनातून अनेकदा सिद्ध केला आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या साहित्यकृतीचा सन्मान होण्याने मराठी साहित्य क्षेत्रातील नवोदितांसाठी प्रेरणा मिळणार आहे.लेखक, कादंबरीकर कृष्णात खोत यांच्या हातून यापुढेही अशीच दर्जेदार साहित्य सेवा घडत राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.