Homeपब्लिक फिगरअंधेरी ते दहिसर...

अंधेरी ते दहिसर मेट्रोला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्या – वायकर

मुंबईचे जनजीवन तसेच प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी मुंबईत उभारण्यात येणार्‍या मेट्रोच्या जाळ्यापैकी एक, अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो लाईन क्रमांक ७ला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो लाईन क्रमांक ७’ असे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चाही करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. सर्वच स्तरातील जनसामान्यांची त्यांच्याप्रती आदराची भूमिका आहे. व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कुंचल्यातून समाजातील विविध अनिष्ट प्रथांवर त्यांनी आसूड ओढले. मार्मिकसारख्या व्यंगचित्र मासिकामधून संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिवंत ठेवण्याचे महानकार्य शिवसेनाप्रमुखांचे होते.

१९ जून १९६६ रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना होऊन या पदाच्या प्रमुखपदावर अर्थात शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांचे नेतृत्त्व संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानने अत्यंत स्वाभिमानाने स्वीकारले. कुठल्याही राज्यातील दळणवळणाची साधने अधिक सक्षम केल्यास त्या राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास जास्त वेळ लागत नाही. ही त्यांची दूरदृष्टी १९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आल्यानंतर जनतेला पाहायला मिळाली, ती मुंबईत उभारण्यात आलेल्या ५५ उड्डाणपूल व मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाच्या रुपाने. उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे या महाविभूतीचे, व्यंगचित्रकाराचे, मराठी मनाच्या अस्मितेचे, हिंदुत्वरक्षकाचे नाव ‘हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो क्रमांक ७’ देऊन त्यांच्या या कार्याचा यथेच्छ सन्मान करावा, असा प्रस्ताव आमदार वायकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

या प्रश्‍नी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तसेच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील हा प्रस्ताव देण्यात आला असून चर्चाही करण्यात आली आहे. एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव तसेच एमएमआरडीएचे आतिरिक्त आयुक्त डॉ. सोनिया शेठ यांनादेखील हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content