Wednesday, October 23, 2024
Homeडेली पल्स15 जुलैपर्यंत घ्या...

15 जुलैपर्यंत घ्या 1 रूपयात पीक विमा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात कालपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही 14 पिके या विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या पिकांचा विमा उतरवण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता.

या योजनेतील वैशिष्ट्य:

विमा योजनेत समाविष्ट  पिके भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या  १४ पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि  बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे.

ई-पीक पाहणीः

शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी मध्ये करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमीन, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मस्जिद यांच्या जमिनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसानभरपाईपासून वंचित राहवे लागेल. यावर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडलमधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६० टक्के भारांकन देऊन येणाऱ्या उत्पादनानुसार महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

पीक विमा

अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पिक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच  असावा. पिक विम्यातील नुकसानभरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधारसंलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधारसंलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात. आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे.

विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे:

पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपूर्व / लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणीपश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे?

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसदेखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांकाआधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटरच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत १५ जुलै २०२४ आहे.

सर्वसाधारण पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम यात जिल्हानिहाय फरक संभवतो.

भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी रु. ४०००० ते ५१७६०, ज्वारी रु. २०००० ते ३२५००, बाजरी रु. १८,००० ते ३३,९१३, नाचणी रु. १३७५० ते २००००, मका रु. ६००० ते  ३५५९८, तूर रु. २५००० ते ३६८०२, मूग २०००० ते २५८१७, उडीद रु. २०००० ते २६०२५, भुईमूग रु. २९००० ते ४२९७१, सोयाबीन रु. ३१२५० ते ५७२६७, तीळ रु. २२००० ते २५०००, कारळे रु. १३७५०, कापूस रु. २३००० ते ५९९८३, कांदा रु. ४६००० ते ८१४२२.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे..

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content