वर्धा जिल्हा काँग्रेसमुक्त झाला. मात्र या भागातून पंजाही गायब होण्याचे श्रेय शरद पवारांना आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवारही सापडला नाही. परिणामी राष्ट्रवादीचा उमेदवार आयात करण्याची वेळ काँग्रेसवर आली, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केले.
वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार, खा. रामदास तडस यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विजय संकल्प सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. अनिल बोंडे, ज्येष्ठ नेते रामदास आंबटकर, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्षाचे नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या खा. तडस यांचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तडस पुन्हा विरोधकांना धोबीपछाड देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) शरद पवार यांचे कुस्तीतील पॅनल ताब्यात घेणारे तडस यांना यंदा 60 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महात्मा गांधी यांची भूमी असलेल्या वर्धा मतदारसंघाचे नेतृत्त्व करणारे रामदास तडस हे संयमी खासदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या दोन कालावधीदरम्यान लोकसभेत 1035 प्रश्न उपस्थित केले तर 113 चर्चांमध्ये सहभाग घेतला. अशा कार्यक्षम उमेदवारालाच वर्ध्याचे मतदार पुन्हा निवडून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांना धर्मग्रंथापेक्षाही संविधान महत्त्वाचे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाचे संविधान सुरक्षित असून अस्तित्त्वाच्या भीतीमुळे संविधान बदलण्याविषयीचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांना धर्मग्रंथापेक्षाही संविधान महत्त्वाचे आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा- महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या विजय संकल्प सभेत म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिससारख्या २ लाखांहून अधिक नेत्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणीबाणी लादून तुरुंगात टाकण्याचे महापाप काँग्रेसने केले. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधानाचा गैरवापर केला होता, याचे फडणवीस यांनी स्मरण करून दिले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ. श्वेता महाले आदी उपस्थित होते.