Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या ९५९ महसुली...

महाराष्ट्रातल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या महसुली मंडळातील लोकांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी जाहीर केले.

मुंबईत मंत्रालयातील वॉर रुम येथे मदत, पुनर्वसन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपसमितीचे सदस्य तथा सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनील चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव वि. र. दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारुरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील उर्वरीत तालुक्यातील काही मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, असा निकष लक्षात घेऊन १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसूलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती ९५९ महसुली मंडळामध्ये देण्यात येतील, असेही पाटील म्हणाले.

राज्यात पशुधनाकरिता चारा निर्माण होण्याकरिता १ लाख लाभार्थ्यी शेतकऱ्यांना ५ लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या ३० कोटी रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली. जेणेकरून राज्यातील पशुपालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. तसेच जून २०१९मध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव, रावेर, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेत पिकांच्या नुकसानीकरिता  मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने अस्तित्त्वात आलेली महसुली मंडळे जिथे पर्जन्यमापक बसविले नाहीत, तसेच बिघडलेली पर्जन्यमापके असलेली महसुली मंडळे येथून देखील नव्याने माहिती मागवावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

१७८ तालुक्यातील ९५९ सर्कलमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती म्हणून जाहीर

अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५० मंडळं, अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील ७३, बुलढाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील  ७०, वाशीम जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१, यवतमाळ जिल्ह्यातील ५ तालुक्यामधील ९, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ५०, बीड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५२, हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यातील १३, जालना जिल्ह्यातील ३ तालुक्यामधील १७, लातूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४५, नांदेड जिल्ह्यातील ८ तालुक्यातील २३, धाराशीव जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २८, परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ३८, नागपूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ५, वर्धा जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ६, अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९६, धुळे जिल्ह्यातील ३ तालुक्यातील २८, जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७, नंदुरबार जिल्ह्यातील ३ तालुक्यातील १३, नाशिक जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ४६, कोल्हापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यातील २०, पुणे जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३१, सांगली जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ३७, सातारा जिल्ह्यातील ८ तालुक्यामधील ६५, सोलापूर जिल्ह्यातील ७ तालुक्यामधील ४६,  अशी एकूण १७८ तालुक्यातील ९५९ मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली  आहे.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content