Homeन्यूज अँड व्ह्यूजबँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या...

बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या घरावर आता थेट जप्ती!

बँकांकडून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने आता अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. ५ मे २०२६ रोजी आरबीआयने ‘निर्दिष्ट अ-वित्तीय स्थावर जंगम मालमत्ता’ म्हणजेच (एसएनएफए) संदर्भात एक नवीन मसुदा (ड्राफ्ट गाईडलाईन्स) जारी केला आहे. यानुसार, कर्जाची वसुली न झाल्यास बँका आता तारण ठेवलेल्या घराचा किंवा जमिनीचा मालकी हक्क थेट स्वतःकडे घेऊ शकतील. सर्व बँका आणि ‘एनबीएफसी’साठी हे लागू असेल. साधारणपणे बँकांचे काम केवळ कर्ज देणे असते, मालमत्ता सांभाळणे नाही. मात्र, ‘बुडीत कर्ज’ (एनपीए) वसुलीसाठी इतर सर्व पर्याय संपले असतील, तर बँका आता तारण ठेवलेली मालमत्ता (उदा. घर, फ्लॅट, जमीन) स्वतःच्या नावावर करून घेऊ शकतील. यालाच “स्पेसिफाइड नॉन-फायनान्शियल ॲसेट्स” (एसएनएफए) असे संबोधले जाणार आहे.

मसुद्यातील महत्त्वाच्या तरतुदी

  • मालकी हक्क संपादन: जर कर्जाची वसुली इतर कायदेशीर मार्गांनी शक्य नसेल, तर बँका अपवादात्मक परिस्थितीत त्या मालमत्तेची मालकी मिळवू शकतील.
  • ७ वर्षांची मुदत: बँका ही मालमत्ता कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवू शकणार नाहीत. मालमत्तेचा ताबा घेतल्यापासून जास्तीतजास्त ७ वर्षांच्या आत तिची विक्री करून आपली थकबाकी वसूल करणे बँकांना बंधनकारक असेल.
  • मूळ मालकाला विक्री करण्यास बंदी: बँकांनी ताबा घेतलेली ही मालमत्ता मूळ कर्जदाराला किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला परत विकता येणार नाही. यामुळे कर्ज बुडवून पुन्हा त्याच मालमत्तेवर हक्क सांगण्याच्या ‘मोरल हॅझार्ड’ला (नैतिक संकट) आळा बसेल.
  • पारदर्शकता आणि फेअर व्हॅल्यू: मालमत्तेची विक्री करताना ती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि ‘आर्म्स लेन्थ’ (तटस्थ) तत्वावर करावी लागेल, जेणेकरून बँकांना जास्तीतजास्त वसुली करता येईल.
बँक

या निर्णयाचा परिणाम काय होईल?

१. वसुलीला वेग: सध्या सरफेसी कायद्यांतर्गत लिलाव प्रक्रियेला बराच वेळ लागतो. नवीन नियमांमुळे बँका थेट मालमत्तेचे नियोजन करून ती योग्यवेळी विकू शकतील.

२. एनपीएमध्ये घट: बँकांच्या बॅलन्स शीटमधील बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

३. कर्जदारांवर दबाव: कर्जदारांमध्ये ‘मालमत्ता गमावण्याची’ भीती निर्माण होईल, ज्यामुळे कर्जाची वेळेवर परतफेड होण्याचे प्रमाण वाढू शकते.

तज्ज्ञांचे मत आणि सूचना

आरबीआयने या मसुद्यावर २६ मे २०२६ पर्यंत सार्वजनिक सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. बँकिंग तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे बँकांना वसुलीसाठी एक शक्तिशाली शस्त्र मिळाले असले, तरी यामुळे सामान्यांचे घर हिरावले जाण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे या प्रक्रियेत कायदेशीर संरक्षणाची (लीगल सेफगार्ड्स) मागणी होत आहे.

(लेखक विक्रांत पाटील ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थविषयक अभ्यासक आहेत.)

Continue reading

मोदी सरकारला बसला ‘जेन-झी’ वादळाचा तडाखा!

भारताच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांत जे घडले, ते केवळ अनपेक्षितच नव्हे तर अभूतपूर्व आहे. सलग १२ वर्षे देशावर एकछत्री आणि भक्कमपणे सत्ता गाजवणाऱ्या, 'अजेय' आणि 'बलाढ्य' मानल्या जाणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला एका मुद्यावर सपशेल माघार घ्यावी लागली. आणि...

यंदाच्या अधिवेशनात हौशे-नवशे-गवशांना बसणार चाप!

येत्या २२ जूनपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानभवन परिसरातील अनावश्यक गर्दीला आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच 'डिजिटल प्रवेशपास' व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. अधिवेशन सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्धरित्या पार पडावे यासाठी शिस्त व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले...

हर्षद महेता, केतन परिखनंतर आता पुन्हा नवा महेता! एलआयसीचीही साथ!!

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया' (सेबी)ने गुजरातमधील सुवर्ण निर्यातदार कंपनी 'राजेश एक्सपोर्ट्स' आणि तिचे अध्यक्ष राजेश महेता यांच्यावर केलेल्या मोठ्या कारवाईनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. शेअर बाजारात गाजलेल्या हर्षद महेता आणि केतन परिख घोटाळ्यापेक्षाही हा अतिप्रचंड...
Skip to content