Homeटॉप स्टोरीबनावट व्हिडिओ फॉरवर्ड...

बनावट व्हिडिओ फॉरवर्ड करू नका! कायदा कडक आहे!!

विरोधकांना प्रचारासाठी मुद्दे सापडत नसल्याने आता आरक्षणाच्या मुद्द्यावर अपप्रचार सुरू झाला असून सध्या भाजपाच्या अनेक नेत्यांच्या आवाजात, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून बदनामीकारक व खोटी वक्तव्ये प्रसृत केली जात आहेत. अशा अपप्रचारापासून समाजाला वाचविण्यासाठी सावध राहा व असे व्हिडिओ समाजमाध्यमांवर दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या. ते इकडेतिकडे फॉरवर्ड करू नका. कायदा कडक आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिला.

सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. या सभेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि महाराजांच्या नौदलाच्या शक्तीविषयी संपूर्ण जगाला आदर आहे, पण गुलामगिरीच्या मानसिकतेत गुरफटलेल्या काँग्रेसने मात्र, भारतीय नौदलाच्या झेंड्यावरील ब्रिटीशांचे चिन्ह स्वातंत्र्यानंतरही बदलले नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नौदलाच्या ध्वजावर छत्रपतींचे मानचिन्ह विराजमान झाले. याच काँग्रेसकडून ओबीसी, दलित, आदिवासी समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाला धोका निर्माण केला जातो आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सातारा ही वीरांची भूमी आहे. या भूमीतील जनतेला आज देशाच्या लष्करी शक्तीचा निश्चितच अभिमान वाटत असेल, कारण आता लष्कराकडे मेड इन इंडिया शस्त्रे आहेत. यामुळेच शस्त्रांच्या दलालांची दुकाने बंद झाली असून विरोधकांची हीच पोटदुखी आहे. देशाच्या अभिमानाला, अस्मितेला आणि एकतेला शक्ती देण्याची ग्वाही मी सत्तेवर आलो तेव्हा जनतेला दिली होती आणि आता ती पूर्ण केली आहे. आपल्या सरकारने सैन्यदलात वन रँक वन पेन्शन योजनाही लागू केल्याचा उल्लेखही मोदी यांनी केला. महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांना तसेच देशभरातील सर्व किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्शीहणाले.

भारतीय राज्यघटनेने धर्माच्या नावावर आरक्षणास मनाई केली असताना काँग्रेसने मात्र, एका रात्रीत मुस्लिमांचा समावेश ओबीसी यादीत करून त्यांना ओबीसी आरक्षण बहाल केले आणि आता घटनेत बदल करून हीच नीती त्यांना संपूर्ण देशात राबवायची आहे. पण जोवर मोदी जिवंत आहेत, आणि जोवर मोदींना जनतेचा आशीर्वाद आहे, तोवर काँग्रेसचा हा कट यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला.

त्याआधी सोलापूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर विजय संकल्प सभेतही मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर देत काँग्रेसला झोडपले. या निवडणुकीत जनता पुढच्या पाच वर्षांकरिता विकासाची गॅरंटी निवडणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. समाधान अवताडे, नरेंद्र काळे आदी उपस्थित होते.

आता बाबासाहेबही घटना बदलू शकत नाहीत!

सत्ता मिळाल्यास पाच वर्षांत पाच पंतप्रधान देण्याचा नवा फॉर्म्युला काँग्रेस आघाडीने काढला आहे. इंडी आघाडीला देश चालवायचा नसून केवळ मलई चाखायची आहे, असा आरोपही त्यांनी केला. मागील दहा वर्षांत सामाजिक न्यायासाठी सरकारने जेवढे काम केले, तेवढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या काळात कधीही झाले नाही. आरक्षण अधिकाधिक मजबूत करण्यासाठी मी बांधील आहे. त्यामुळेच भाजपा सरकार घटना बदलणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. आताच्या स्थितीत खुद्द बाबासाहेब आंबेडकरांना वाटले असते तरी आज ते घटना बदलू शकले नसते. मी तर बदलू शकणारच नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content