मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर देशाचे संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र कुणी कितीही प्रयत्न केले तरीही ते अशक्य असल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले आहे. याउलट असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते याची आठवण शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज करून दिली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केले. तसेच चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला आहे. राज्य शासनानेही इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे. नागपूरमधील दीक्षाभूमीचे जतन, संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करून शासनाने बाबासाहेबांना खरी मानवंदना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे. राज्यातदेखील हा दिवस आपण साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ आरपीआय नेते अविनाश महातेकर आणि नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.