Homeबॅक पेजकोकणकन्येच्या सन्मानानंतर कोकणपुत्राकडे...

कोकणकन्येच्या सन्मानानंतर कोकणपुत्राकडे खजिन्याच्या चाव्या!

मुंबई महापालिकेचे महापौर म्हणून कोकणकन्या रितू तावडे यांना सन्मान मिळाला आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कोकणपुत्र प्रभाकर शिंदे यांना बहुमान प्राप्त झाला. रितू तावडे व प्रभाकर शिंदे हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेवर निवडून आले आहेत. रितू तावडे घाटकोपरमधून तर प्रभाकर शिंदे मुलुंडमधून विजयी झालेत. प्रभाकर शिंदे मुळचे चिपळूणचे असून ते पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी व महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी नवीन वर्षाचा महापालिकेचा ८० हजार ९५२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

प्रभाकर पै, हे भाजपाचे मुंबईचे पहिले महापौर झाले होते. नंतर चार दशकानंतर भाजपाने महापौरपद आपल्याकडे खेचून घेतले. तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद भाजपाला प्रथमच प्राप्त झाले आहे. रितू तावडे काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये आल्या तर प्रभाकर शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपामध्ये आले. भाजपाने त्यांना त्यांची ज्येष्ठता व अष्टपैलू कामगिरीचा आदर करून गेल्यावेळी सभागृह नेतेपदही दिले होते. यावेळी तेच मुंबईचे महापौर होतील असा सर्वांचा अंदाज होता. पण महापौरपद महिलांसाठी राखीव झाल्याने ती संधी रितू तावडे यांना मिळाली व प्रभाकर शिंदेंना अत्यंत प्रतिष्ठेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद लाभले.

कोकण

मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा ८० हजार ९५२ कोटींचा अर्थसंकल्प पंचवीस फेब्रुवारी रोजी सादर झाला. मुंबईच्या विकासकामांवर व नागरी सुविधांवर होणाऱ्या खर्चाच्या तरतुदीवर स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून प्रभाकर शिंदे यांचे नियंत्रण राहणार आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा रिमोट शिंदे यांच्या हाती असणार आहे. मुंबईच्या खजिन्याच्या चाव्या कोकणपुत्राकडे, ही बाब मुंबईतील तमाम कोकणवासियांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. प्रभाकर शिंदे मुलुंड पूर्वमधील वॉर्ड क्रमांक १०६मधून निवडून आले. ते फारच कमी मताधिक्याने निवडून आले म्हणून काहींनी नाके मुरडली. पण मुंबईत पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येणे ही सोपी बाब नव्हे. जो जिता वो सिकंदर… पण मुलुंडमधे सर्वपक्षीय मैत्रीचे संबंध असे निकोप राजकीय वातावरण आहे. म्हणूनच निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मॉर्निंग वॉकला सर्वपक्षीय मित्रांनी मुलुंडच्या छत्रपती संभाजी उद्यानात त्यांचा सत्कार केला, तेव्हा शिंदेशी निकराने झुंज देणारे मनसेचे सत्यवान दळवीही तेथे उपस्थित होते.

प्रभाकर शिंदे हे संस्काराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. पण त्यांनी २०१७मध्ये शिवसेनेतून भाजपामध्ये सीमोल्लंघन केले व भाजपाचे उमेदवार म्हणून त्याच वर्षी महालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पक्ष बदलला तरी मतदारांनी त्यांनाच आपले लोकप्रतिनिधी म्हणून पसंती दिली. भाजपामध्ये गेल्यावर त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्त्वावर किंवा ठाकरेंच्या शिवसेनेवर कधी टीका केली नाही. ते आपले काम करीत राहिले व भाजपाचा कार्यक्रम काटेकोरपणे पाळत राहिले. ते उत्तम वक्ते, लढाऊ कार्यकर्ते व अभ्यासू आहेत. त्यांचे वाचन भरपूर आहे. महापालिका कायदा-नियम. पोटनियम, पंरपरा त्यांना तोंडपाठ आहे. त्यांचा पत्रव्यवहार मुद्देसूद व अचूक असतो. विविध विषयांवर केलेल्या पत्रव्यवहाराची त्यांच्याकडे अद्ययावत नोंद आहे. कार्यक्षम, तडफदार नगरसेवक अशी त्यांची जनमानसात प्रतिमा आहे. पक्षात किंवा महापालिकेत कोणतेही अधिकाराचे पद असले तरी त्याचा अहंकार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. रस्त्याने जाताना ओळखीचे लोक दिसले की आपली मोटार थांबवून त्यांची चौकशी करणारा हा लोकप्रतिनिधी आहे. पूर्व उपनगरात ज्येष्ठ नागरिकांचा आधारस्तंभ अशी त्यांची ओळख आहे.

प्रभाकर शिंदे यांची चिपळूणची नाळ कायम आहे. दर एक-दोन महिन्यांनी ते गावी जात असतात. त्यांचा जन्म चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारवलेल्या शिंदे यांनी शिवसेनेत उपशाखाप्रमुख व शाखाप्रमुख म्हणूनही काम केले. दत्ताजी साळवी यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय कामगार सेनेचे ते उपाध्यक्ष होते. १९९७मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. बेस्ट समितीचे दोन वेळा अध्यक्ष होते. शिवसेनेत असताना पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामन्याला विरोध म्हणून माजी आमदार शिशिर शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून वानखेडे स्टेडियम उखडण्याचे आंदोलन, पाम व धारा तेल आंदोलन, भाडेवाढीचा निषेध करण्यासाठी रेल रोको अशा अनेक आंदोलनात ते आघाडीवर होते. मुलुंडकर असल्याचा आपणास अभिमान आहे, असे ते आवर्जून सांगतात. महापालिका प्रशासन व जनता यांच्यातील सेतू म्हणून प्रभाकर शिंदे यांची स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून झालेली निवड सार्थ ठरावी हीच कोकणपुत्राला शुभेच्छा.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

महाराष्ट्राचे सुप्रीम बॉस फडणवीस आणि दिल्ली!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सुप्रीम बॉस आहेत. महायुती सरकारमध्ये ते सर्वोच्च आहेत आणि महाराष्ट्र भाजपामध्येही त्यांचा शब्द अंतिम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जे महत्त्व आहे, तसेच फडणवीसांना महाराष्ट्रात आहे. फडणवीस यांची प्रशासावर...

कारभारी इन्फ्रामॅन, मग का मुंबई तुंबते २०० मिमी पावसात?

राज्यकर्ते नेहमीच विकास, विकास अशी भाषा बोलत असतात. रस्ते, पूल, उड्डाणपूल, पदपथ, मैदाने, बगिचे, जनतेच्या पैशातून उभारली जातात. मुंबई ही राज्याची राजधानी. देशाची आर्थिक राजधानी. देशाला सर्वाधिक महसूल, सर्वाधिक जीएसटी हा मुंबई-महाराष्ट्रातून मिळतो. विदेशातील सर्वाधिक गुंतवणूक मुंबई व महाराष्ट्रात...

चंदा चोरांनी घातला अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा

अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीत भक्तांकडून आलेल्या देणग्या व दागदागिने अशा मौल्यवान वस्तुंच्या झालेल्या चोरी प्रकरणात मंदिरातील आठ सेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यायाचे सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य विश्वस्त अनिल मिश्र यांना राजीनामे देणे...
Skip to content