एक काका याच्याशी लढता लढता थेट वर गेला. पण दुसरा काका आधी याच्या काकाला नामोहरम करून मोकळा झाला. आता या पुतण्याशी म्हणे आतून भिडला आहे. या पुतण्याला राजकारणातून नेस्तनाबूत करूनच बारामतीकर काका शांत बसेल. बारामतीकर काकांचा सख्खा पुतण्या या परळीकर काकांच्या पुतण्याला हाताशी धरून आपल्या काकांशी राजकारणात दोन हात करीत होता, तेव्हाच हे लक्षात आले होते की तो दिवस दूर नाही ज्यादिवशी थेट बारामतीकर पुतण्या आणि परळीकर पुतण्या दोघांच्याही नाकात ८० वर्षांचे तरुण काका दम आणून मोकळे होतील. परळीकर धनंजय मुंडे सध्या ज्या अडचणीत सापडले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढणे फक्त आणि फक्त शरद पवार यांनाच शक्य आहे. ज्या शरद पवारांशी केवळ वर्षभरापूर्वी हेच धनंजय अजितदादांच्या मदतीने आणि संगतीने पंगा घेऊन मोकळे झाले होते.
१२ जानेवारीला धनंजय यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या लग्नाची भानगड बाहेर येताच याच धनंजय यांनी मुंबईतल्या मीडियातल्या कितीतरी मंडळींना फोन लावून विनंती केली की मला सांभाळून घ्या. चूक झालेली असली तरी यावेळी सांभाळून घ्या आणि त्यांनी याच पद्धतीने विरोधकांनादेखील नक्की फोन केले असतील आणि धनंजय यांच्या या अशा फोनाफोनीतून जर यावेळी भाजपा नेते गप्प बसण्याची भूमिका घेणार असतील तर पुढे राजकीय फायदा धनंजय यांचा होईल आणि असल्या घाणेरड्या प्रकाराला वाचा न फोडल्यास राज्यातल्या भाजपावर नक्की नामुष्की

ओढवणार आहे. धनंजय यांनी जशी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतरच्या भेटीत मी त्यांना सांगितले होते की, आज तुम्ही मंत्री झाले. उद्या तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री पण होऊ शकता. विनंती एवढीच की बायकांच्या भानगडी सोडून द्या आणि सभोवताली, अवतीभोवती सतत जी तीन अत्यंत नीच, दलाल घाणेरडी दगाबाज भ्रष्ट माणसे तुम्ही बाळगलेली आहेत त्यांना लाथ मारून दूर करा. अन्यथा ज्या वेगाने वर चढला आहात, दुप्पट वेगाने खाली यायला वेळ लागणार नाही.
मुंडे यांनी माझे सांगणे त्यावेळी अजिबात मनावर घेतले नाही. कारण, सत्तेची मस्ती आणि नशा त्यांच्या त्यावेळी डोक्यात भिनलेली असावी. मंत्रीपदाची शपथ घेल्यानंतर आपण कृषी मंत्री झालो या थाटात ते वावरत असताना मी मित्रांना हेच सांगितले की धनंजय यांच्यावर आतून मनातून चिडलेले शरद पवार अतिशय कमी महत्त्वाचे खाते देऊन मोकळे होतील आणि धनंजय यांना पवारांनी लगेच झटका दिला. त्यांनी आग्रह धरूनदेखील कृषी खाते मिळाले नाही. केवळ सामाजिक न्याय खाते देऊन त्यांची काकांनी बोळवण केली. त्यामुळे याक्षणी पंकजा मुंडे नव्हे किंवा त्यांचे कुटूंब नव्हे तर गालातल्या गालात हसून मोकळे झाले असतील ते बारामतीकर शरदकाका. लै फडफड करीत होतास ना.. बघ आता काय घडले आहे ते, ये गुमान माझ्याकडे नाक घासत.. नाहीतर भोग तुझ्या कर्माची फळे. मला धोका देतोस काय, ही तर तू केलेल्या भानगडीची, वासनेची सुरुवात आहे. पुढे पुढे बघ काय घडते ते, हे असेच शरद पवार मनातल्या मनात नक्की म्हणत असतील. कारण अजितदादा व धनंजय मुंडे यांनी दिलेले धोके शरद पवार नक्कीच विसरलेले नाहीत..

