Homeमाय व्हॉईसया कोरोनाचे विसर्जन...

या कोरोनाचे विसर्जन कर रे बाप्पा!

देवा, गणराया ये, तुझ्या आगममनाचीच वाट आम्ही सारे, तुझे भक्त, पाहत आहोत! गणपतीची वाट फक्त भाविकच पाहतात असे नव्हे, तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक हौश्या, नवशा आणि गवशांना त्यांच्या-त्यांच्या मनीषा पूर्ण करण्याची संधीही मिळत असते. गणपती आले की त्यांच्या येण्याची चाहूल आधी बाजारात दिसणारे हारतुऱ्यांचे सजावटीचे सामान देऊ लागते. मूर्तीकारांची लगबग, आधीच दोन-तीन महिन्यांपासून सुरू झालेलीच असते. कलाकार गणेशाच्या सुंदर मूर्तींचे देखणे डोळे अधोरेखित करत आहेत, अशा छायाचित्रांना वृत्तपत्रे पहिल्या पानावर जागा देऊ लागतात आणि मोठ्या गणेशोस्तव मंडपांतही सजावटीची धांदल सुरू असल्याचीही दृष्ये टीव्हीच्या पडद्यावरून दिसू लागतात.

या दरवर्षींच्या गणेशोत्सव तयारीच्या ओळखीच्या दृष्यांना या वेळी थोडा फाटा मिळाला. बाजारात खरेदीचा उत्साह उसळला होता आणि मूर्तीकारांचेही अंतिम हात फिरवणे सुरू झाले होतेच, पण सार्वजनिक गणेशोत्सवांच्या कार्यकर्त्यांची मात्र थोडी निराशाच झाली होती. एकतर कोरोनाच्या वातावरणात गणेशमूर्तींच्या उंचीवरची बंधने कायम राहिली. सार्वजनिक बाप्पा जास्तीतजास्त चार फूट उंचीचे असतील, हे जाहीर झाल्यावर मंडपांचे आकार व सजावटीचे भारही तितक्या प्रमाणात घटणे सहाजिकच होते. मंडपांच्या आकारउकारांतली वाढती स्पर्धा गेली दोन वर्षे खंडित झालेली आहे. मोठ्या, अधिक मोठ्या, अधिक उंच मूर्ती तयार करण्याची खटपट व त्यासाठी लगणारे तांत्रिक तसेच यांत्रिक कौशल्य यांची मागणीही रोडावत गेली आहे. आता गणेशस्थापनेत अमूक मंडळाच्या गणपतीला तमुक पुलाचा अडथळा होतो, हा पूल तोडावा काय किंवा नवा पूल बांधताना मंडळातील गणेश मूर्तीच्या उंचीचे गणितही अभियंत्यांनी आधी मांडावे काय, असे प्रश्न व अशा अपेक्षा यांचेच विसर्जन झाले आहे.

हे सारे घडले ते एका सूक्ष्माती सूक्ष्म जिवामुळे. पण हा जीव घातक ठरल्याने त्याला विषाणू म्हणणे भाग आहे. हा विषाणू डोळ्यांना दिसत नाही आणि तो आल्याची चिन्हे दिसत नाहीत तोवर त्याचे अस्तित्त्वही लोकांना कळत नाही. पण त्याने जगभरात जो काही उत्पात मांडला आहे त्याला जगाच्या इतिहासात तोड सापडत नाही. कोरोना अर्थात कोविड-19 हा सार्स म्हणजे श्वसनमार्गावर आघात करणाऱ्या प्रकाराचा विषाणू सध्या नवे नवे बदल स्वतःमध्ये घडवतो आहे आणि लोकांना अधिकाधिक घाबरवून टाकतो आहे. या कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव झाकोळले गेले आहेत.

मागील वर्षीच्या मानाने यंदा स्थिती बरी आहे असे वाटत होते. मात्र दुसऱ्या लाटेने ते सारे आश्वासक वातावरणच उद्ध्वस्त झाले. लोक आणि त्याहीपेक्षा प्रशासक आणि शासक अधिक घाबरून घट्ट झाले. कोरोनाची तिसरी लाट उठेल काय या भीतीने दातखीळ बसलेले शासक जनतेला सतत सावधतेच्या सूचना देत आहेत आणि त्याचा परिणाम सण-समारंभांच्या उत्सवावर सहाजिकच होत आहे. सार्वजनिक गणेशाचे दर्शन आता मंडपात जाऊन घेताच येणार नाही असे निर्बंध राज्य सरकारच्या गृह विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे त्याबाबतीतील अनेक शक्यता आणि उत्साहाची संभाव्य आवर्तने यांचा विलय तातडीने झालेला आहे.

आधीच्या सूचना अशा होत्या की, सार्वजनिक मंडपात एका वेळी जास्तीतजास्त पन्नास भाविकांना प्रवेश द्यावा, त्यांना सामाजिक अंतराचे भान ठेवूनच वावरणे बंधनकारक करावे. काही सूचना तर अशाही होत्या की, फक्त लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच आरती व मिरवणुकात घेतले जावे, वगैरे.. पण ही बंधने पुरेशी नाहीत हे सरकारच्या ध्यानात आले. कारण जर गणेशोत्सव कार्यकर्ते लोकांच्या लसीकरणाची प्रमाणपत्रे तपासू लागले, तर ते बाकीची कामे कधी करणार आणि लसीकरण झालेल्यांचा प्रवेश या बंधनाची खात्री कोण कोणाला देणार, असा मोठाच प्रश्न तयार होत होता. आरती व मिरवणुकावरही अशीच बंधने होती. आता घरगुती गणेशाच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकाही बंद केल्याच्या सूचना जागोजागी महापालिका आणि नगरपालिकांचे अधिकारी काढत आहेत.

सार्वजनिक गणपती आणताना व पोहोचवतानाही दहापेक्षा अधिक लोक नकोत व विसर्जनही प्रत्यक्षात पाण्यात उतरून कोणीच करू नये, तर मनपांच्या केंद्रांवर मूर्ती नेऊन द्याव्यात अशाही सूचना निघाल्या आहेत. या साऱ्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहाला खीळ बसणे स्वाभाविकच आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात त्यानुसार रुग्णालयात जाण्याची वेळ लोकांवर येणे, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे व नातलगांचे प्राण कंठाशी येणे, घरच्या कोणाही माणसाच्या मृत्यूची कुऱ्हाड कुटुंबावर कोसळणे या साऱ्या भयंकर वेदनादायी अनुभवापेक्षा, थोडा कमी उत्साह जनतेला सणाविषयी वाटला तरी चालेल अशी स्थिती खरेतर आलेली आहे.

बाप्पा

मुख्यमंत्री ठाकरेंनी तर स्वतःच्या शिवसेना पक्षासह सर्व राजकीय पक्षांना गर्दीचे कर्यक्रम टाळण्याच्या सूचना केलेल्या आहेत व त्या योग्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने त्याबाबतचे पालन केले जाईल असे जाहीर केले खरे, पण शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत अगदी हजारो नाही, तरी शेकडो कार्यकर्ते बुधवारी दिवसभर नरिमन पॉईंटवरील बैठकांसाठी राज्याच्या सर्व विभागांतून गोळा झालेच होते. खरेतर अशा बैठका घेणे राजकीय पक्षांनाही अनिवार्य आहे. जसे तुम्ही आम्ही कामावर जाण्यासाठी उत्सुक आहोत, घरी बसून जनतेचे पोट कसे भरणार अशी चिंता आहे. तसेच लोकांत गेल्याशिवाय आणि सभा, बैठका केल्याशिवाय राजकीय पक्ष तगणे कठीण आहे. पण कोरोना कळात त्यावर टीकाही होणे अपिरहार्यच आहे.

सध्या कोरोनाचे राज्यातील आकडे थोडे थोडे वाढू लागेल आहेत. मुंबई शहरातील रोजची रुग्णसंख्या तीनशेच्या खाली गेल्याने ऑगस्टमध्ये लोक आनंदी झाले होते. पण लोकलसेवा नियमित तत्त्वावर सुरू झाली, अगदी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानांच फक्त लोकलमध्ये प्रवेश आहे, असे जरी असले तरी, लाखो लोक आज लोकलप्रवास करत आहेत. मेट्रोसाठी व बेस्ट वा ठामपा बस प्रवासासाठी अशी बंधने नाहीत. त्यामुळे तिथली गर्दीही कोरोनापूर्व टप्प्याच्या जवळ पोहोचलेली आहे. अशा वातावरणात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या पट्टयातील कोरोनाचे आकडे गेले पंधरा दिवस सतत थोडे थोडे वाढत आहेत. मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, ठाणे या मोठ्या महानगरपालिकांसह ठाणे, पालघर व मुंबई या जिल्ह्यांचा समावेश आरोग्य विभागाने ठाणे मंडळ या शीर्षकाखाली केला आहे. या ठाणे मंडळातील रोजचे कोरोनाचे आकडे तीन आठवड्यांपूर्वी सातशेच्या खाली गेले होते. ते आता पुन्हा हजारांच्या जवळ पोहोचताना दिसत आहेत.

मुंबई महानगरातले रोजचे नवे रुग्ण आता पाचशे-साडेपाचशेंनी वाढत आहेत. ठाणे महानगरातील ही वाढ रोज तीस नवे रुग्ण अशी खाली गेली होती, ती आता पुन्हा रोज नवे साठ-पासष्ठ रुग्ण अशी वाढली आहे. तीच स्थिती पुणे, पिंपरी-चिंचवडची आहे. अहमदनगर व सोलापूर हे जिल्हेही पुन्हा वाढते आकडे देत आहेत. यामानाने नागपूर, अमरावती व कोल्हापूर मंडळांतील आकडे पुष्कळच खाली आले आहेत. या विभागात अनेक जिल्हे शून्य नवे रुग्ण दाखवत आहेत. रोजचे मृत्यूचे आकडेही त्यामानाने पुष्कळ खाली आहेत. देशात बुधवारी संपलेल्या चोवीस तासात 42600 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. त्यातील 30196 केरळ राज्यातील आहेत तर महाराष्ट्रातील नवे रुग्ण 4174 इतके आहेत. म्हणजे केरळचे आकडे वजा केले तर देशात बारा हजार नवे रुग्ण आढळले, त्यातील चार हजार महाराष्ट्राचे वगळले तर उर्वरीत देशात सर्व मिळून जेमतेम आठ हजारांचा आकडा आहे.

आपल्याकडेही नागपूर, कोल्हापूर, अमरावती या तीन्ही भागात दुसऱ्या लाटेचा जोर प्रचंड होता. ही बाब लक्षात घेता तिथे तिसरी लाट कमी दिसेल अशी अपेक्षा होती. तेही खरे होताना दिसत आहे. पण उर्वरीत राज्यात आकडे कमी होत नसल्यामुळेच गणेशोत्सवाची सुरूवात होत असताना तिसरी लाट महाराष्ट्राला धडक देईल काय ही भीती कायम आहे. अनेक तज्ज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की, तिसरी लाट आली तरी ती पहिल्या लाटेपेक्षाही कमी असू शकेल. किमान दुसऱ्या लाटेइतकी मोठी व तितकी उत्पातकारक अशी तिसरी लाट नसेल अशी अपेक्षा आहे. तज्ज्ञांना असे वाटण्याचे कारणही हेच आहे की लसीकरणाने चांगला वेग घेतला आहे. जितक्या अधिक लोकांचे लसीकऱण होईल तितका लोकांना रुग्णालयात दखल करावा लागण्याचा धोका कमी होतो हा जगभराचा अनुभव आहे. तितक्या प्रमाणात मरणाचाही धोका उणावतो.

सध्या भारतात आणि अमेरिकेतही जितके कोरोना रुग्ण दवाखान्यात दाखल झाले आहेत, त्यातील दोन तृतियांशांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही, असे आकडेवारी सांगते. अत्यल्प प्रमाणाता लसीकरण झालेल्यांना कोरना होतो. पण त्याचीही तीव्रता मंदावलेली असते. भारत सरकारचे आकडे सांगतात की दहा हजार लसवंतांपैकी फक्त तीन व्यक्ती कोरोनाग्रस्त होतात व रुग्णालयात जातात. भारताने आजमितीस 70 कोटी लोकांना किमान एक डोस दिलेला आहे. महाराष्ट्रात सात कोटी लसीकरण होत असताना मुंबई महानगरात एक कोटी नागरिकांना किमान एक डोस देण्यात आला. हा एक नवा विक्रम देशस्तरावर प्रस्थापित झाला आहे. बुधवारच्या एका दिवसात महाराष्ट्रात चौदा लाख लोकांचे लसीकरण झाले. आता पहिल्या डोसबरोबरच दोन्ही डोस पूर्ण केलेल्यांचे आकडेही तितक्याच वेगाने वाढत जाणार आहेत व त्याप्रमाणात कोरोनाची भीती कमी होणार आहे. गणेशाकडे इतकीच प्रार्थना करूया की, या कोरोनाचे संपूर्ण विसर्जनही लवकरच कर रे बाप्पा!!

Continue reading

राहुलजींची मौजमजा तर काँग्रेसच्या आमदारांकडून त्यांच्या नेतृत्त्वाचाच कचरा!

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेतून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचलेले शरद पवार हे त्यांच्या रा.काँ.श.प. पक्षाचे एकमेव राज्यसभा सदस्य सध्या आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे नातू पार्थ अजित पवार आणि सुनबाई सुनेत्रा हेही सध्या राज्यसभेत दिसणार आहेत. याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, धनगर नेते...

मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेने ट्रम्पचा इराणवरील हल्ला!

“युद्ध नको, मज बुद्ध हवा” असे म्हणणाऱ्या भारताला युद्धाच्या झळा जाणवत आहेत. इस्रायलचे अध्यक्ष नेतन्याहू यांच्या हट्टाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप बळी पडल्यामुळे सुरु झालेले इराणविरुद्ध बलाढ्य अमेरिका आणि कट्टर इस्रायल, हे युद्ध आता तिसऱ्या सप्ताहात पोहोचले आहे. त्याचा...

नातवाबरोबर ‘खेळण्या’साठी थोरले पवार राज्यसभेत?

दर दोन वर्षांनी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून देण्याच्या सात जागांची निवडणूक ऐतिहासिक ठरली, यात शंकाच नाही. देशभरातील दहा राज्यांतील 37 राज्यसभा जागांसाठी मार्च 16ला निवडणुका होत आहेत. त्यात महाराष्ट्रातील सात जागाही आहेत. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, 5 मार्च...
Skip to content