‘आयकर सिंधु’च्या उभारणीपूर्वी विविध परवानग्या मिळवण्यात आणि अतिक्रमणे हटवण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याचा आयकर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करावा आणि प्रशासन सदैव नागरिककेंद्री राहील याची खात्री करत आपले अधिकार सहानुभूती, संवेदनशीलता आणि लोकसेवेच्या भावनेने वापरावेत, असे आवाहन केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये कार्यालयीन पायाभूत सुविधा आणि शासकीय निवासस्थाने सुधारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. मर्यादित शासकीय निवासस्थानांच्या उपलब्धतेमुळे अधिकाऱ्यांना अनेकदा लांबचा प्रवास करावा लागतो. मुंबई आणि नवी मुंबईतली अनेक प्राप्तीकर कार्यालये सध्या भाड्याच्या इमारतींमधून कार्यरत असल्यामुळे कायमस्वरूपी कार्यालयीन जागा उभारण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळामार्फत (सीबीडीटी) सरकार-ते-सरकार भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईतल्या नरिमन पॉईंट येथे प्राप्तीकर विभागाच्या ‘आयकर सिंधु’ या अत्याधुनिक नवीन कार्यालयीन संकुलाचे उद्घाटन नुकतेच केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अत्यंत संवेदनशील जबाबदारी पार पाडताना प्रामाणिकपणा, व्यावसायिकता आणि निष्ठा यांसारख्या सर्वोच्च मानकांचे पालन करून देशाची सेवा करण्याची संधी मिळणे हा एक विशेष बहुमान असतो, हे सर्व अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. ‘आयकर सिंधु’, हे नाव प्राप्तीकर विभागाच्या भूमिकेशी तंतोतंत जुळणारे आहे. ज्याप्रमाणे समुद्र (सिंधु) असंख्य नद्यांचे पाणी स्वतःमध्ये सामावून घेतो, त्याचप्रमाणे हा विभाग देशभरातील करदात्यांकडून प्राप्तीकराचा महसूल गोळा करतो आणि तो भारताच्या संचित निधीमध्ये जमा करतो; जिथून या संसाधनांचा वापर राष्ट्रउभारणी आणि लोककल्याणासाठी केला जातो, असे त्यांनी सांगितले.
‘आयकर सिंधु’ हे एक अत्याधुनिक कार्यालय असून त्याची स्वतःची एक वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षमतेनुसार आणि वचनबद्धतेनुसार या कार्यालयाची उत्कृष्टता जपावी. वारसा म्हणून मिळालेल्या संस्थांना मजबूत आणि समृद्ध करणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी असते. प्राप्तीकर विभागाचे हे कार्यालय पुढची अनेक वर्षे राष्ट्राची उत्कृष्ट सेवा करत राहील, असा विश्वासही सीतारामन यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सीबीडीटीचे अध्यक्ष रवी अग्रवाल आणि सीबीडीटीचे सदस्य (प्रशासन) पंकज कुमार मिश्रा हेदेखील उपस्थित होते. मुंबईचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी स्वागतपर भाषण केले.

‘आयकर सिंधु’ थोडक्यात-
‘आयकर सिंधु’ ही केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली, सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाची 13 मजली एक आधुनिक कार्यालयीन इमारत आहे. प्राप्तीकर विभागासाठी एक सुरक्षित, तंत्रज्ञान-सक्षम आणि नागरिक-केंद्रित वातावरण प्रदान करण्याच्या उद्देशाने या इमारतीची रचना करण्यात आली आहे. या इमारतीत सुरक्षित अभिलेख व्यवस्थापन सुविधा, जप्त केलेल्या मालमत्ता आणि नोंदींसाठी स्ट्राँग रूम, आयकर सेवा केंद्र, परिषद आणि प्रशिक्षण सुविधा, एक ग्रंथालय, उपाहारगृह, मनोरंजन क्षेत्र आणि अतिथीगृहाची सोय आहे. विभागाच्या भविष्यातील कार्यात्मक गरजा लक्षात घेऊन या इमारतीची रचना करण्यात आली आहे.

