मुंबईतला लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, मेट्रो लाईनचे काम आणि भांडुप-मुलुंड परिसर यांचे काय नाते आहे हे एका परमेश्वरालाच माहित! कारण मेट्रोचे अपघात येथेच सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात मेट्रोची एक स्लॅब कोसळून रिक्षा चक्काचूर झाली होती व माणसे दगावली होती. काल एशियन पेंट बस थांब्यानजीकचा रस्ता, पदपथ व जोडरस्ता खचला हेही ठिकाण मेट्रोच्या भल्यामोठ्या सिमेंटच्या खांबापासून अवघ्या दहा-पंधरा पावलांवर असावे. म्हणूनच हा रस्ता खचण्याचे प्राथमिक कारण मेट्रोचेच बांधकाम असल्याची कुजबूज महापालिका अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे. मात्र उघडपणे कुणीही काहीही सांगण्याच्या मनःस्थितीत नाहीत.
मेट्रोचे बांधकाम करणाऱ्या कपंनीने वा महापालिकेने रस्त्याखालच्या मातीची शास्त्रीयदृष्ट्या पाहणी केली होती की नाही हाच खरंतर कळीचा मुद्दा आहे. कारण, मेट्रोचा भलामोठा सिमेंटचा खांब किमान तीन मजले तरी जमिनीत पुरावा लागतो असे तज्ज्ञाचे मत आहे. आता तीन मजले जमीन खणणे आणि अवघ्या पंधरा पावलांवर असलेला पदपथ व जोडरस्त्याचा संबंध जरूर येतो हे सांगायला एक्स्पर्टची गरजच नाही. हा रस्ता खचला तेव्हा कडेला उभा असलेला टेम्पोही गचकन पलटी होऊन खड्यात स्वाहा होताना सर्वांनीच पाहिला आहे. आता टेम्पोचीच उंची किमान 12 फूट मानू. त्याच्याही खाली तो गेला आहे. त्या भागाला भेट दिली असता किमान 40 फुटाचा खड्डा नक्की पडला असणार याची खात्री जाणवली. घटनास्थळी एक भलीमोठी क्रेन उभी होती. खड्ड्याची खोली दिवसाही सहजासहजी दृष्टीस पडू नये म्हणून महापालिका व विकास प्राधिकरणाने त्या खड्ड्याभोवती काळ्या ताडपत्रीचे वेष्टनासारखे कडे तयार केलेले दिसले.

निवासी संकुलांना धोका?
चोरगल्लीच्या नाक्यावरच हा अपघात घडल्याने गल्लीच्या आतील बाजूस असलेल्या अनेक निवासी संकुलांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाल्याचे दिसून आले. अनेक नामवंत विकासकांचे निवासी प्रकल्प या गल्लीत आहेत. गल्लीच्या तोंडावरच रस्ता खचल्याने माती धसू लागली तर काही महिन्यांनी ‘कलते’ मनोरे पाहण्यासाठी परदेशात जाण्याची गरजच उरणार नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने बोलताना दिली. या परिसरातील मातीचे नमुने केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेत पाठवले जावेत व चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते जाहीर केले जावेत, अशी मागणीही तेथील नागरिकांनी केली आहे. मेट्रोच्या संबंधित कंत्राटदाराला याआधीच दंड झालेला आहे. धोका नको म्हणून या कंत्राटदाराला हाकलून द्यावे व नवा कंत्राटदार नेमला जावा, अशी मागणीही पुढे येण्याची दाट शक्यता आहे. गेले दोन दिवस सुटीचे असल्याने महापालिकेकडून अधिकृत तपशील प्राप्त होऊ शकला नाही. मात्र या रस्त्यावरील अपघात वाढल्याचे लक्षात घेता आणि या भागातल्या कोकणी बांधवांची संख्या लक्षात घेता तेथे ‘घरच्या देवाची नड दिसतेय.. गाऱ्हाणे घालूक व्हया…’ अशी चर्चा सुरू झाल्यास नवल नसावे.
मुंबई व आसपासच्या परिसरात पाऊस सुरु होऊन जेमतेम चार-पाच दिवसच झाले आहेत. तशात महापालिका प्रशासनाची जी वाताहात झालेली दिसून येते तेव्हा पुढील ओळी आठवतातच. “Politicians and Bureaucrats is the new upper class in Maharashtra. It is an upper class that is growing by an increasing number of top paid politicians and districts. They let the people suffer but let they let go free.” मात्र, हे सारे जनतेच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले तर…
छायाचित्र मांडणीः शलाका वाकणकर
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

