Homeब्लॅक अँड व्हाईटसरकारी आशिर्वादाने ऑनलाइन...

सरकारी आशिर्वादाने ऑनलाइन ‘कॉक्रोच’ जंतरमंतरवर?

भारताचे सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत यांनी बेरोजगार तरूणांवर केलेल्या टीका-टिपणीनंतर अमेरिकेत बोस्टनमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभिजीत दिपके या ३५ वर्षांच्या तरूणाने सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केल्याची संकल्पना मांडली आणि देशभरातून लक्षावधी तरूणांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. न्या. सूर्य कांत सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीच्या प्रसंगी म्हणाले होते- झुरळांसारखे असे तरूणआहेत, ज्यांना व्यवसायात रोजगार मिळत नाही, काही जण मीडिया, सोशल मीडिया, आरटीआय व इतर प्रकारचे कार्यकर्ते बनले आहेत. प्रचंड बेरोजगारी, बेलगाम महागाई आणि चौफेर पसरलेल्या भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या झेन जीला आपला आवाज व्यक्त करण्यासाठी कॉक्रोच पार्टीच्या रूपाने जणू नवे व्यासपीठच मिळाले. सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरूणांचा उल्लेख झुरळ म्हणून केल्यानेच केवळ उपहासात्मक प्रतिक्रिया म्हणून अभिजीतला कॉक्रोच जनता पार्टीची कल्पना सुचली. त्यातून भारतातील लक्षवधी तरूणांच्या मनातील खदखद बाहेर पडली आणि अवघ्या पाच दिवसांत इंस्टाग्रामवर त्याला सव्वादोन कोटी फॉलोअर्स हिट झाले.

सन २०१४पासून देशातील सर्वात मोठ्या शक्तिशाली असलेल्या भारतीय जनता पक्षाचे इंस्टाग्रामवर ८० लाख फॉलोअर्स आहेत. काँग्रेस पक्षाचे १ कोटी ३७ लाख फॉलोअर्स आहेत. नीट आणि सीबीएसइच्या वारंवार पेपरफुटीमुळे देशातील विद्यार्थी कमालीचे अस्वस्थ व संतप्त आहेत. स्पर्धा परिक्षेसाठी मोठी जीवघेणी स्पर्धा आहे. नीटच्या परिक्षेला यंदा बसलेल्या पंचवीस लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्त्या केली आहे. एकीकडे पेपरफुटीने मानसिक ताणतणाव वाढला आहे, उच्चशिक्षण प्राप्त करूनही नोकरी मिळत नाही, रोज वाढणारी महागाई व भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था, यामुळे सारा देश हतबल झाला आहे. राज्यकर्ते ‘सबका साथ, सबका विकास’ची भाषा बोलत असतात. पण बेरोजगारी, महागाई व भ्रष्टाचार, या तीन मुद्यांवर डबल-ट्रीबल इंजिन सरकारमधील कोणीही नेता किंवा लोकप्रतिनिधी ब्रसुद्धा काढत नाही. नव्या उमेदीने कोणाकडे बघायचे हा तरूणांपुढे प्रश्न आहे. म्हणूनच कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली हजारो तरूण, विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने सहा जून रोजी दिल्लीत जंतरमंतरवर जमले होते. कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ ऑनलाइन सुरू झाली व जंतर मंतरवर प्रथमच प्रकटली. धर्मेद्र प्रधान इस्तिफा दो, असे फलक अनेकांच्या हाती दिसत होते.

अभिजीत दिपके हा कॉक्रोच पार्टीचा चेहरा आहे. तो दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा सुरक्षा दलाचे  एक हजार पोलीस तिथे सज्ज होते. जंतरमंतरवर धरणे कार्यक्रमाला परवानगीचे पत्रही तयार होते. मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या काळात राजधानी दिल्लीत येऊन कोणतेही आंदोलन करणे हे विरोधी पक्षांना शक्य झालेले नाही. सरकारने नवीन शेतकरी कायदे लागू केल्यावर त्याच्या विरोधात लढाऊ शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर काही महिने ठिय्या मांडला होता. त्यांनाही सरकारने दिल्लीत प्रवेश करू दिला नव्हता. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व राजस्थानमधून दिल्लीकडे येणाऱ्या रस्त्यावर उंच उंच बॅरिगेट्स उभारली होती. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स येऊ नयेत म्हणून रस्त्यात पोलिसांनी स्पीड ब्रेकर्स  उभारले होते.  एवढेच नव्हे तर रस्त्यात खिळे ठोकले होते. पण असा कोणताही प्रकार यावेळी घडला नाही. पोलिसांनी अभिजीतला दिल्लीत येताच ताब्यात घेतले नाही किंवा अटकही केली नाही. जंतरमंतरकडे जाणाऱ्या मोटारी रोखल्या नाहीत. जंतरमंतरवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सरकारविरोधात अश्लाघ्य घोषणा झाल्या नाहीत. मंत्र्यांना त्यांची नावे घेऊन कोणी शिव्याशाप दिले नाहीत. लाठीमार, अश्रूधूर किंवा निदर्शकांवर पाण्याचे फवारे मारण्याची वेळ पोलिसांवर आली नाही. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, ही  एकमेव मागणी आंदोलकांनी केली.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची तुलना सन २०१२च्या अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाशी झाली. तेव्हाही हजारो लोक अण्णांच्या समर्थनार्थ जमले होते. मै हूँ अण्णा.. अशा टोप्या त्यांनी घातल्या होत्या. अण्णांच्या आंदोलनावर भाजपाचे नेते खूश होते. आंदोलनातून तत्कालीन काँग्रेसप्रणीत युपीए सरकारची भरपूर बदनामी झाली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवात अण्णांच्या आंदोलनाचा निश्चितच मोठा वाटा होता. अण्णांच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊनच आम आदमी पक्षाची स्थापना झाली. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. अण्णाच्या आंदोलनाला काँग्रेसविरोधी पक्षांचा तसेच असंख्य एनजीओंचा पाठिबा मिळाला होता. सहा जूनच्या आंदोलनात अभिजीत यांना पाठिंबा देण्यासाठी कोणी राजकीय पक्ष जंतरमंतरवर उतरला नव्हता. मै हूँ कॉक्रोच.. अशा घोषणानी रंगवलेल्या टोप्या मात्र अनेक तरूणांच्या डोक्यावर होत्या. अनेकजण झुरळाचे मास्क लावून फिरताना दिसले. पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूक जंतरमंतरवर हजर होते. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनला पाठिंबा जाहीर केला. पाच-सहा तासाच्या आंदोलनातून तत्काळ काही साध्य झाले नाही. पण ऑनलाइनवर स्थापन झालेली पार्टी जंतरमंतरवर मैदानात बघायला मिळाली.

धर्मेंद्र प्रधान यांनी आठवडाभरात मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर पुन्हा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभिजीत व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनाला सोशल मीडियावर मुस्लिम तरूणांचा मोठा पठिंबा मिळाला. पण मुस्लीम तरुणांनी जंतरमंतरवर जाऊन आंदोलनात सहभागी होऊ नये असा फतवा निघाला होता. काही वर्षीपूर्वी दिल्लीतील शाहिन बाग येथे मुस्लिम समाजाने केलेल्या आंदोलनाच्या जखमा अजून भरून आलेल्या नाहीत. त्या आंदोलनात पोलिसांनी शेकडो जणांवर गुन्हे दाखल केले होते. जंतरमंतरवरही त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा मुस्लिम तरूणांना समाजातील वरिष्ठांनी दिला होता. अण्णा हजारे यांचे आंदोलन हे काही तासांचे नव्हते, ते मागणी मान्य होईपर्यंत अनेक दिवस चालले. त्यांच्या आंदोलनाचे तेव्हा दिवसरात्र थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांनी केले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची वृत्तवाहिन्यांनी फारशी दखल घेतली नाही. कदाचित सरकारविरोधी आंदोलन म्हणून वृत्तवाहिन्यांचे कॅमरे तिकडे फिरकले नसावेत.

कॉक्रोच जनता पार्टीत कोणी मुरब्बी राजकारणी नाहीत. त्यामुळे नियोजन, संयोजन किवा रणनीतीत ते कमी पडू शकतात. सरकारने त्यांचे आंदोलन संवेदनशीलपणे हाताळले. या आंदोलनाला सरकारचा आशीर्वाद होता का, अशीही चर्चा ऐकायला मिळाली. पण भाजपाच्या नेत्यांनी आंदोलनावर टीका केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर आंदोलन अराजकतेकडे अशी प्रतिक्रिया दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनीही तरूणांना नकारात्मक भूमिकेकडे नेणारे आंदोलन, अशी खंत बोलून दाखवली. सव्वादोन कोटी फॉलोअर्स संभा‌ळणे हे अभिजीत दिपके यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. धर्मेद्र प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाच नाही, तर पुढे काय हे  त्यांना ठरवायचे आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाप्रमाणे कॉक्रोच पार्टीकडे केडर नाही. अन्य संघटनांचा पाठिंबा नाही. झेन जी चळवळ पुढे कशी चालू ठेवता येईल, याचा रोडमॅपही तयार नाही. अभिजीत यांनी एक दिवसाच्या आंदोलनाची समाप्ती करताना म्हटले की, तुम्ही आमच्या पोस्ट सोशल मीडियावरून हटवू शकता, पण आम्हाला मिटवू शकणार नाही… पाहुया!

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

ठाकरे, पवारांनंतर आता ममता! पुढचा नंबर कोणाचा?

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असताना २०२२मध्ये शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनेचे ४० आमदार भाजपाच्या छत्रीखाली एनडीएत सामील झाले. आमचीच शिवसेना खरी, असा दावा शिंदेंनी केला...

जरांगेजी, उपोषणाने दबाव वाढेल; पण तोडगा चर्चेतूनच!

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे शेतात एका बाजेवर बसून मे महिन्यांच्या रणरणत्या उन्हामध्ये सकाळपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंधरा तासांनी म्हणजे मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास त्यांनी...

मटक्याचा आकडा कधी वेळेआधी फुटला नाही, पण..

यापूर्वीही नीट परीक्षेचे पेपर फुटले, मागील चुकीतून तुम्ही कोणताही धडा घेतला नाही, हे अतिशय दु:खद आहे, अशा परखड शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने देश पातळीवर परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) सुनावले आहे. यंदाच्या वर्षी नीटचे पेपर फुटल्याने परीक्षाच रद्द झाली....
Skip to content