Homeबॅक पेजआदिवासी खेळाडूंना लवकरच...

आदिवासी खेळाडूंना लवकरच येणार ‘अच्छे दिन’!

केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीसगढ राज्याच्या सहकार्याने पहिल्यादांच आदिवासी खेळाडूंमधील गुणवत्ता हेरण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेचे शानदार आयोजन नुकतेच रायपूर, जगदलपूर, सरगुजा‌ या तीन ठिकाणी करण्यात आले होते. या पहिल्या स्पर्धेला देशभरातील आदिवासी खेळाडूंचा चांगला प्रतिसाद लाभला. ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील‌ ३८००पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. १०६ सुवर्णपदकांसाठी चुरस होती. अॅथलेटिक्स, जलरतण, हॉकी, फुटबॉल, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती या खेळांचा समावेश या पहिल्या स्पर्धेत होता. भविष्यात या खेळांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. मल्लखांब आणि कबड्डी, हे दोन खेळ प्रर्दशनीय खेळ म्हणून सामील केले गेले होते.

या पहिल्या स्पर्धेत कर्नाटक, ओडिसा, झारखंड, महाराष्ट्राच्या खेळाडुंचे वर्चस्व राहिले. कर्नाटकाने २३ सुवर्ण, ८ रौप्य, ७ कांस्यपदकांची कमाई करुन पदकतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली. ओडिसाने २१ सुवर्ण, १९ रौप्य, २१ कांस्यपदक मिळवून कर्नाटकापाठोपाठ दुसरा क्रमांक मिळवला. झारखंडने ६ सुवर्ण, ८ रौप्य, ११ कांस्यपदके जिंकून तिसरे स्थान प्राप्त केले. महाराष्ट्राने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवताना ६ सुवर्ण, १० रौप्य‌‌, ४ कांस्यपदके पटकावली. कर्नाटकाने जलतरण स्पर्धेत तब्बल १५ सुवर्णपदके मिळवली. अॅथलेटिक्समध्ये ५ आणि कुस्तीत ३ सुवर्णपदके जिंकली. त्यांचा जलतरणपटू मनिकांता एलने ८ आणि त्याचा सहकारी दिनेश एनने‌ ५ सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांच्याच मेघांजलीने ४ सुवर्ण, २ रौप्यपदके मिळवली. ओडिसाच्या अंजली मुंडाने ५ सुवर्णपदके जिंकून आपल्या शानदार कामगिरीचा ठसा उमटवला. यजमान छत्तीसगढने पदकतालिकेत नववा क्रमांक मिळवताना ३ सुवर्ण, १० रौप्य, ६ कांस्यपदके पटकावली.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना रोख रक्कमेची पारितोषिके जाहीर केली. वैयक्तिक पदकविजेत्यांना अनुक्रमे दोन, दिड‌, एक लाखाची तर सांघिक विजेत्या संघाला अनुक्रमे एक लाख, पंचाहत्तर आणि पन्नास हजार रुपयांची पारितोषिके देण्याची घोषणा त्यांनी केली. ओडिसाने हॉकीत आपले वर्चस्व राखताना पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदकांची जोडी मिळवली. पुरुष गटात त्यांनी झारखंडचा ४-१ गोलांनी सहज‌ पराभव केला. महिलांचे सुवर्णपदक मिळवताना त्यांना मिझोरामने जोरदार झुंज दिली. अखेर एकमेव गोलाच्या जोरावर ओडिसा महिला संघाने बाजी मारली. फुटबॉलमध्ये प. बंगालने आपली ताकद दाखवताना यजमान छत्तीसगढला एकमेव गोलाने नमवले. पारंपरिक तिरंदाजीमध्ये झारखंडच्या तिरंदाजांनी आपले अचूक लक्ष्य साधताना सर्वात जास्त पदके पटकावली. यजमान छत्तीसगढने या पहिल्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करुन भारतीय क्रीड़ाविश्वात एका नव्या अध्यायाची नोंद केली. भारतातील आदिवासी खेळाडूंमधील शक्तीला या स्पर्धेच्या निमित्ताने मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. आदिवासी क्रीडा संस्कृतीला, प्रतिभेला योग्य दिशा, संधी यानिमित्ताने मिळेल. प्रत्येक गावातून, खेड्यातुन‌ उद्याचे चॅम्पियन्स तयार करण्याची ही चळवळ सुरू झाली आहे. या पहिल्या स्पर्धेचे भारताच्या आजी-माजी आदिवासी खेळाडूंनी स्वागत केले आहे. या खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्या गुणवतेला योग्यरित्या आकार देणे आवश्यक आहे. या स्पर्धेतुन भविष्यात भारताला नक्कीच चांगले प्रतिभावान खेळाडू मिळतील अशी आशा करायला हरकत नाही.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

गतविजेता बेंगळुरु यंदादेखील आयपीएलचे जेतेपद राखणार?

यंदाच्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेला नेहमीप्रमाणेच उत्साही वातावरणात सुरूवात झाली आहे. गतवर्षीच्या विजेत्या बेंगळुरु संघाने आपल्या सलामीच्या लढतीत हैद्राबादचा आरामात पराभव करून आपल्या विजयी अभियानाला जोमात प्रारंभ केला आहे. दुसऱ्या लढतीतदेखील त्यांनी आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नईचा ४३ धावांनी...

आसाम सरकारच्या पाठिंब्यावर आहे मयंकच्या खेळाचे भवितव्य

भारताचा महान बुद्धिबळपटू जगजेत्त्या विश्वनाथन आनंदने‌ १९८८ साली पहिल्यांदा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर‌ मग दक्षिणेकडच्या राज्यांतून अनेक चांगले बुद्धिबळपटू पुढे प्रकाशात आले. काही काळानंतर या खेळाने इतर राज्यांतदेखील‌ चांगलं बाळसं धरले आणि त्या राज्यांतूनदेखील उत्तम बुद्धिबळपटू पुढे...

येथे घडताहेत उद्याचे जिम्नास्ट…

चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या क्रीडा‌ संकुलातील सुसज्ज भव्य हॉलमध्ये गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त काळ चांगले युवा जिम्नास्ट घडवण्याचा अखंड यज्ञ सुरु आहे. त्यांच्या या तपस्येला गेल्या काही वर्षांत चांगले यश मिळाले असून त्यांचे...
Skip to content