भरारी प्रकाशन, मुंबई आयोजित प्रसिद्ध कवयित्री डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या ‘निळाई’ या नवीन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची आणि रसिक श्रोत्यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमीचे कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. नरेंद्र पाठक यांनी भूषवले.
यावेळी बोलताना त्यांनी डॉ. चक्रदेव यांच्या कवितांमधील भावविश्व आणि त्यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये उलगडून दाखवत संग्रहाचे कौतुक केले. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील उपस्थित होत्या. साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. माधव राजवाडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
या प्रकाशन सोहळ्याचे नेटके नियोजन भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका लता गुठे यांनी केले. स्मिता आपटे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. रंजना वडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

