अभिनेता ऐश्वर्य ठाकरे याने निशानची, या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी बेस्ट डेब्यू मेल (ज्युरी चॉइस) हा सन्मान मिळवत हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले आहे. हा पुरस्कार ऐश्वर्य ठाकरे यांच्या अभिनय कारकिर्दीतील पहिला मोठा सन्मान आहे. निशानचीमधील त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठे कौतुक होत आहे.
या यशाबद्दल बोलताना त्याने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचे आभार मानले. ते म्हणाले की, “माझ्यावर विश्वास दाखवून मला त्यांच्या सिनेमाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल मी अनुराग सरांचा आभारी आहे. अनेक लोक त्यांना जीनियस किंवा मॅव्हेरिक म्हणतात, पण माझ्यासाठी ते अत्यंत प्रामाणिक सर्जनशील व्यक्तिमत्त्व आहेत आणि त्यांच्यासोबत माझा प्रवास सुरू होणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”
ऐश्वर्य ठाकरे यांनी आपल्या सहकलाकार वेदिका पिंटो, मोनिका पंवार, जीशान अय्यूब, कुमुद मिश्रा आणि विनीत कुमार सिंह तसेच संपूर्ण टीमचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, हा सन्मान त्याच्यादृष्टीने फक्त आनंदाचा क्षण नाही तर एक जबाबदारी आहे. “माझ्यासाठी पुरस्कार म्हणजे केवळ गौरव नाही. ते अधिक चांगलं काम करण्याची, उत्तम कथा सांगण्याची आणि कलाकार म्हणून स्वतःला सतत घडवत राहण्याची जबाबदारी आहे.”
भाषणाच्या शेवटी त्यांनी स्वतः लिहिलेली शायरीही सादर केली.
“रस्ते मी स्वतः बनवेन, चुका आता वाढू देणार नाही,
यश मिळाल्यानंतरही जगाला माझी कहाणी सांगीन.”

