छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यात राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगताना दंतकथांमुळे ज्या घटना घडल्याच नाहीत त्या घटना लोकांमध्ये पसरविण्यात येत आहेत, असे सांगितले. मातीसाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर मातीसाठी कसे मरावे, हे छत्रपती शंभूराजे यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले, असे ते म्हणाले.

शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, लेझीम पथक, तुतारीवादन, लहान मुलांच्या वेशभूषा, रांगोळ्या, ढोलताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. संघटनेचे अध्यक्ष शांताराम चाळके, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सरचिटणीस राजेश दाभोळकर, सल्लागार सुबोध सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रवींद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले.

