भारत आणि मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या ऐतिहासिक संबंधांना नवीन शक्ती देण्यासाठी भगवान बुद्धांचे दोन महान शिष्य, सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष पुढच्या वर्षी भारतातून मंगोलियाला पाठविण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली.
मंगोलियाचे राष्ट्रपती हुरेलसुख सहा वर्षांनंतर भारत भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर नवी दिल्लीत झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. भारत आणि मंगोलिया आपल्या राजनैतिक संबंधांची 70 वर्षं तसेच धोरणात्मक भागीदारीची 10 वर्षे साजरी करत असताना ही भेट होत आहे. यानिमित्ताने आम्ही आमचा सामायिक वारसा, वैविध्य आणि घनिष्ठ नागरी संबंधांचे प्रतीक म्हणून एक संयुक्त टपाल तिकीट जारी करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आम्ही ‘गंदन मॉनेस्ट्री‘मध्ये एका संस्कृत शिक्षकांना पाठविणार आहोत. त्यांच्यामार्फत तिथल्या बौद्ध ग्रंथांचा सखोल अभ्यास करणे शक्य होईल. प्राचीन ज्ञानपरंपरा पुढे नेण्यासाठी मदत होईल. आम्ही एक दशलक्ष प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगोलियामध्ये बौद्ध धर्मासाठी नालंदा विद्यापीठाची खूप महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. नालंदा आणि ‘गंदन मॉनेस्ट्री‘ यांच्या संयुक्त कार्यातून आम्ही या ऐतिहासिक संबंधांमध्ये नवीन ऊर्जा आणू. लडाख स्वायत्त पर्वतीय विकास मंडळ आणि मंगोलियाच्या ‘आर-खाँगाय परगणा’ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे आपल्या सांस्कृतिक संबंधांना नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
आमच्या सीमारेषा भलेही दोन्ही राष्ट्रांना जोडणाऱ्या नाहीत. परंतु भारताने मंगोलियाला नेहमी आपला एक शेजारी म्हणून पाहिले आहे. शेजारी या नात्याने आम्ही थेट लोकांचे-लोकांशी संबंध वाढावेत, यासाठी प्रोत्साहन देत राहू. आम्ही निर्णय घेतला आहे की, मंगोलियाच्या नागरिकांना मोफत ई-व्हिसा दिला जाईल. त्याचबरोबर भारत दरवर्षी मंगोलियाच्या युवा सांस्कृतिक राजदूतांची भारत यात्राही प्रायोजित करेल. भारताच्या 1.7 अब्ज डॉलर्सच्या ‘लाइन ऑफ क्रेडिट‘ने बनविण्यात येत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे मंगोलियाच्या ऊर्जा सुरक्षेला नवीन बळकटी मिळेल. हा भारताचा जगातील सर्वात मोठा विकास भागीदारी प्रकल्प आहे आणि अडीच हजारांपेक्षाही जास्त भारतीय आपल्या मंगोलियातील सहकारी मंडळींबरोबर एकत्रितपणे हा प्रकल्प साकार करीत आहेत, असे ते म्हणाले. खाजगी क्षेत्रामध्येही ऊर्जा, दुर्मिळ खनिजे, ‘रेअर-अर्थ’, डिजिटल, खाणकाम, कृषी, दुग्धोत्पादन आणि सहकार क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन शक्यतांचा शोध घेतला जात आहे, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.