सत्ता असताना किमान 100 वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला आज संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत आहे. अनेक वर्षे सत्ता भोगूनही गरीबी हटावचे आश्वासन पूर्ण न करणाऱ्या काँग्रेसला आजही पुन्हा तेच आश्वासन द्यावे लागत आहे. मात्र देशाचा मतदार काँग्रेसच्या या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आज मुंबईतल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. दिनेश शर्मा, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी नकली शिवसेनेच्या प्रचारात सहभागी झाल्याचे पाहून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना होत असतील, अशा शब्दांत यादव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.
बहुमताच्या बळावर मागच्या 10 वर्षांत भाजपा-एनडीए सरकारने वेगाने देशाचा विकास केला. देशहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांमुळे आमच्यावर टीका करता येत नसल्याने विरोधक अपप्रचार करत फिरत आहेत. भाजपा-एनडीएने 400 जागांवर विजय मिळवला तर देशाचे संविधान धोक्यात येईल असा आरोप करताना काँग्रेसला त्यांनीच तब्बल 100 वेळा संविधान बदल केल्याचा सोयीस्कररित्या विसर पडतो. 1950मध्ये संविधान लागू झाल्यापासून पं. नेहरूंच्या राजवटीत 11 वेळा, इंदिरा गांधींनी 17 वेळा तर राजीव गांधींच्या राजवटीतच 10 वेळा संविधानात बदल केले गेले होते. आणीबाणी लागू करून संविधान, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम काँग्रेसनेच केले, असे ते म्हणाले.
एकीकडे सागरी सेतू, मेट्रो, पूल, रस्ते बांधणारे, कलम 370 हटवून जम्मू काश्मीरच्या जनतेला न्याय देणारे, ट्रिपल तलाक प्रथा बंद करून मुस्लीम महिलांचा सन्मान राखणारे, जातपात न पाहता सर्वांसाठी गरीब कल्याणाच्या योजना राबवणारे भाजपा-एनडीए, महायुती सरकार आहे. तर दुसरीकडे सदैव विकासकामात खोडा घालणारे, मुंबईची मेट्रो रोखणारे आणि संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून अपप्रचार करणारे मविआ आणि युपीए सरकार आहे. विरोधक समजतात तशी जनता दुधखुळी नाही. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात विकसित भारतासाठी भाजपा-एनडीए आणि महायुतीच्या उमेदवारांना मत देऊन मतदार विरोधकांना धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारधारेला तिलांजली देत नकली शिवसेना हिंदूत्वविरोधी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसली आहे. नकली शिवसेनेचे इतके अध:पतन झाले आहे की व्होटबँकेचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसच्या रांगेत ते जाऊन बसले आहेत. 1993 बॉंम्बस्फोटातील आरोपी इब्राहिम मुसाला उबाठा सेनेच्या प्रचारात उतरवून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणा-य़ा दहशतवाद्यांचे समर्थन नकली शिवसेना करत आहे, असेही मुख्यमंत्री यादव म्हणाले.
मोदी सरकारने भारतीय सांस्कृतिक स्थळांचा जीर्णोद्धार आणि मंदिरांची पुनर्बांधणी केली आहे. मोदी सरकारमुळेच अयोध्येत रामलल्ला मंदिरात विराजमान झाले. आता जनतेच्या नजरा मथुरेतील गोपाळकृष्णाकडे लागल्या आहेत हे आम्ही जाणून आहोत असे ते म्हणाले.