आचार्य विनोबा भावेंचे सान्निध्य व आशीर्वाद लाभलेल्या, माधुरी रावकर यांचे अल्पशा आजारानंतर आज, २४ जून रोजी मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.
विनोबांच्या जन्मस्थानाशी त्यांचा दीर्घकाळ निकटचा संबंध होता. विनोबांचे निकटवर्ती व ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते दिवंगत मधु रावकर यांच्या त्या सुविद्य पत्नी होत. विनोबांना भेटून व त्यांचा आशीर्वाद घेऊन मधु-माधुरी यांनी विवाह केला होता.
मधु रावकर यांचा विनोबांच्या भूदान यात्रेतील सहभाग, गोवा मुक्तीलढा व संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन तसेच विनोबांच्या विचारांना वाहिलेले ‘युगारंभ’ या साप्ताहिक/दैनिक या सर्व कार्यात माधुरीताईंचा सक्रिय सहभाग होता. मधु रावकर यांच्या ‘युगारंभ’ साप्ताहिकातील लेखावर सनातनी हिंदुत्ववाद्यांनी गोवा व सावंतवाडी येथे दोन केस कोर्टात टाकल्या होत्या. मधु रावकर गेल्यानंतरही केस माधुरीताई लढवत राहिल्या व जिंकल्याही!
माधुरीताईंच्या पश्चात सरस्वती, प्रज्ञा, प्रसन्ना व प्रसाद अशी मुले व नातवंडे आहेत. सरस्वती ह्या विनोबा जन्मस्थानाच्या उपक्रमात सक्रिय असून मुंबई आकाशवाणीवर उच्च पदावर कार्यरत आहेत. प्रसाद एका नामांकित दैनिकात संपादकीय विभागात उच्च पदावर कार्यरत आहेत. संपूर्ण रावकर कुटुंब आजही विनोबांच्या कार्यात कार्यरत आहेत.
मधु रावकर यांच्या अस्थी विनोबांच्या जन्मस्थानी जेथे विसर्जित करण्यात आल्या तेथेच आता माधुरीताई यांच्याही अस्थी विसर्जित करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

