महायुतीमध्ये सहभागी असलेल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांच्या प्रत्येकाला त्यांची जागा नेमकी कुठे आहे आणि त्यांना काय करायचे आहे, हे सर्वांना माहित आहे. विरोधी पक्षाने आमच्यावर कितीही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तरीही आमचा हा जोड फेव्हिकॉलचा जोड आहे.., असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री, मी तसेच अजितदादा, आमच्यात पूर्णपणे संवाद आहे. आमचे संपूर्ण प्रयत्न एका दिशेने चाललेले आहेत. 100% समन्वय आमच्यामध्ये आहे. आम्ही सर्व निर्णय एकमताने घेतो. याउलट इंडिया आघाडीची बैठक चालली आहे. त्यात कोणाला माहित नाही की, कोणाची खुर्ची कुठे आहे? ममता बॅनर्जी व्यासपीठावर आल्या. प्रत्येकाला जाऊन त्यांनी नमस्कार केला. रांग संपली तरीसुद्धा त्यांना त्यांची खुर्ची काही दिसली नाही. त्या पुन्हा आल्या. नमस्कार केला आणि निघून गेल्या. शरद पवारांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न त्यांनी अजितदादांना थांबवण्यासाठीही केला होता. पण काय झाले हे तुमच्यासमोर आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई वरळीच्या एनएसयुआय स्टेडियममध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत ते बोलत होते. या इंडिया आघाडीत 36 पक्ष आहेत. त्यातले अर्धे पक्ष तर असे आहेत की त्यांना अस्तित्त्वच नाही. त्यांना विचारा तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण, एकही सांगू शकत नाही. पाच जणांनी तर आताच आपापला उमेदवार जाहीर केला आहे. परंतु ज्यांना पंतप्रधान होण्याची इच्छा आहे अशा राहुल गांधी यांचे नाव कोणीच घ्यायला तयार नाही. आम्हाला विचारा.. आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार एकच. नरेंद्र मोदी.. यांना स्वतःचा लोगो तयार करता येत नाही. 36 लोक आहेत. ते 36 रंग सांगतात. त्याचमुळे आज ज्या लोगोच्या अनावरण होणार होते त्याचा कुठे ठावठिकाणाच समजला नाही. जे पक्ष आपला लोगोही तयार करू शकत नाहीत ते उमेदवार काय ठरवणार, असा सवालही त्यांनी केला.

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून निवडून दिले जातील. महायुतीत लोकसभेचा उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक जागेवर नरेंद्र मोदी हेच उमेदवार समजून कामाला लागा, असे आवाहन शिवसेनेचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. राज्यात महायुती लोकसभा निवडणूक एकत्रित लढेल आणि सर्व ४८ जागा जिंकेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवून आपल्याला सर्व जागा जिंकायच्या आहेत. लोकसभा जागावाटपावर चर्चा करुन मार्ग काढला जाईल. पण, उमेदवार कोणाचाही आणि कोणीही असला तरी पंतप्रधान मोदी हेच उमेदवार समजून सर्वांनी एकजुटीने काम करावे. महायुतीने आपली ताकद एकजूट केली तर सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकणे अशक्य नाही. इंडिया आघाडीला दोन दिवसांच्या बैठकीतून साधा लोगो निश्चित करता आला नाही तर ते आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार काय ठरविणार? सर्व भ्रष्ट पक्ष आणि नेते या आघाडीत एकत्र आले आहेत. ज्यांनी आपल्या हयातीत फक्त भ्रष्टाचार केला ते मोदींसारख्या निष्कलंक नेतृत्त्वाला हटवायला निघाले आहेत. मात्र त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीतील बहुतांश नेत्यांच्या चर्चा केल्यानंतर महायुतीत व सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. विकासासाठी एकत्र आले पाहिजे आणि राजकारणातील अस्पृश्यता संपविली पाहिजे. युती आणि आघाडी करताना पक्षाच्या विचाराशी प्रतारणा होणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळते. या सत्तेतून समाजातील सर्व वंचित घटकांना हक्क मिळेल. कुणावरही अन्याय होणार नाही. यापुढील काळात एकमेंकांविरोधातील संघर्ष टाळला पाहिजे. महायुतीत कोणताही वाद नाही. आम्हा नेत्यांतही उत्तम समन्वय आहे. माध्यमांतील बातम्याकडे लक्ष देऊ नका. कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. आपल्याला लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकायच्या आहेत. जागावाटपाबाबत कोणीही भाष्य करू नये. वरिष्ठ पातळीवर आम्ही लोक त्याबाबत निर्णय घेऊ.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्याने कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल, असेही पवार म्हणाले.
या बैठकीला मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रफुल्ल पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार उदयनराजे भोसले, महादेव जानकर, अविनाश महातेकर, विनय कोरे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे आदी मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

