Homeमाय व्हॉईससुनीलजी, आपणच स्वतःला...

सुनीलजी, आपणच स्वतःला झापड्यात कोंडून का घ्यायचे?

शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्य चिकित्सक सुनील कर्णिक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्याविषयीचे ‘स्वतः खेरीज सर्वकाही’ या पुस्तकाचे प्रकाशनही केले गेले. या पुस्तकात कर्णिक यांच्याबद्दल विविध मित्रांनी केलेले लेखन आहे. यात सारंग दर्शने, प्रदीप कर्णिक, अनंत देशमुख, प्रकाश अकोलकर, प्रेमानंद गज्वी, मुकुंद कुळ्ये, अलका गाडगीळ, विजय तापस, अशोक बेंडखेळे, दीपक राजाध्यक्ष आदींचे छोटेखानी लेख आहेत. लेख म्हणजे त्यांना जसे सुनील कर्णिक भावले त्याबाबतच ही सर्वमंडळी व्यक्त झाली आहेत. प्रवीण धोपट यांनी सुनील यांना बोलते करायचाही प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नात तसेच सत्काराला उत्तर देताना केलेल्या छोटेखानी भाषणात एकूणच मराठी पत्रकारिता आणि मराठी साहित्य याबद्दल त्यांनी नाराजीचा सूर आळवला. आपणच स्वतःला झापड्यात कोंडून घ्यायचे आणि दुसऱ्यांवर झापडबंद आहेत, असा आरोप करायचा हेच मुळी चुकीचे आहे.

बाकी विषयांबाबत मी काही बोलणार नाही. परंतु मराठी पत्रकारितेविषयी त्यांनी जो नाराजीचा सूर लावला होता, तो निदान मला तरी साफ नामंजूर आहे. मराठी आणि इंग्रजी पत्रकारिता तुलना केल्यास मराठी कमी पडते असे काहीसे विधान त्यांनी केले. साहित्य प्रकाशन संस्था आणि सत्यकथा मासिक वगळता त्यांची मोठी कारकीर्द मराठी पत्रकारितेत गेलेली आहे. शिवाय ते ज्याठिकाणी पत्रकारिता करत होते तेथे ते उच्च पदावर काम करत होते. असे असतानाही त्यांच्या हाताखाली असलेल्या कनिष्ठ पत्रकारांकडून त्यांना (कर्णिक यांना) हवी तशी पत्रकारिता का करुन घेता आली नाही, याचे थोडेही विवेचन त्यांनी केलेले नाही. इंग्रजी वर्तमानपत्राकडे जी साधनसामुग्री वा मनुष्यबळ असते, तितकी साधने आणि माणसे मराठीकडे नसतात हे मान्यच करावे लागेल. पण याला कारण जसे व्यवस्थापन करणारी मंडळी आहेत, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात संपादकवर्ग जबाबदार आहे, असे खणखणीत विधान कर्णिक यांनी करायला हवे होते.

माझ्या माहितीतील एका मोठया वर्तमानपत्राच्या पुरोगामी संपादकाने सूत्रे हाती घेताच मला केवळ दहा माणसे द्या मी पेपर काढून दाखवतो, असे राणाभिमदेवी थाटाचे उद्गार काढले होते. हे तर काहीच नाही. साध्या रात्रपाळीच्या भत्त्यातही व्यवस्थापन वर्ग भेदभाव करत होता. तोही अनेक पुरोगामी आणि विद्वान संपादकांना संपवता आलेला नव्हता. इंग्रजी वर्तमानपत्रे बहुआयामी असतात. त्यांचे लक्ष चहूबाजूला असते असे ते म्हणतात. असे असेल तर कर्णिकजी ज्या पेपर्समध्ये होते तेथे बातमीची वा संपादकांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधी बाजूच्या चार ओळीतरी कधी छापून आल्या आहेत का हो? आपणच स्वतःला झापड्यात कोंडून घ्यायचे आणि दुसऱ्यांवर झापडबंद आहेत, असा आरोप करायचा हेच मुळी चुकीचे आहे.

कर्णिक स्वतःला डावे समजतात. ते तसे आहेतही. पण कुठली आंदोलने इंग्रजी पेपर्समुळे चालली हो? स्वातंत्र्य आंदोलन, कामगार चळवळी, अन्यायाविरोधात पहिला आवाज मराठी वर्तमानपत्रातूनच उठतो आणि तो जनतेत हुंकारतो. असे माहीत असूनही उगाचच इंग्रजीचे गोडवे कशाला? इतकेच माझे म्हणणे आहे. या सत्कार समारंभाला जाणत्यांनी मोठी गर्दी केली होती. नेहमी संग्रहालयात रिकाम्या खुर्च्या पाहयची सवय झालेल्यांना हा सुखद धक्का होता. जाता जाता संग्रहालयातील पंख्याना जरा वंगण घालता येते का ते पाहवे. हो.. खालून वाहतुकीचा आवाज आणि हॉलमध्ये पंख्यांचा आवाज.. कार्यकारी समितीने तातडीने लक्ष द्यावे असे वाटते!

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content