अलीकडेच ठाणे शहराच्या वागळे इस्टेटमधील ओरियाना बिझनेस पार्कमध्ये असलेल्या ‘मिंत्रो’ बारमधील भांडणात आणि हाणामारीत राजकीय पाटील मंडळीच असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यातील एक पाटील मुंबईच्या शिव परिसरातील आहे तर दुसरा भांडुपमधील आहे. तिसरा मात्र ठाणे ग्रामीण भागातील असल्याचे समजते.
आता या बारच्या नावातच ‘मिंत्रो’ असल्याने चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असणार की राजकीय पक्ष कुठला? आम्ही उगाचच कल्पना लढवून पतंगबाजी कशाला करू? पोलिसांच्या सांगण्यानुसार हा बार मध्यरात्रीनंतर उशिरा सुरू होता. गिऱ्हाईकांमध्ये प्रथम बाचाबाची सुरू झाली व काही वेळातच हाणामारीचे स्वरूप प्राप्त झाले. प्रथम बारमधील बाऊन्सरनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. लगेचच ग्रामीण पाटलाची सणकलीच. तू मला काय समजवतो रे दिड फुट्या? तुझ्याकडे नुसता काळा सफारी आहे. माझ्या बापाकडे रियल कमांडो आहेत भ** !!

नंतर मात्र तुंबळ हाणामारीला केव्हा सुरुवात झाली ते तेथे कुणालाच कळले नाही. तितक्यात त्या ग्रामीणवाल्याच्या पंटरने मोबाईल फिरवला. अचानक काही आवाज वगेरे न करताच पोलिसांच्या गाड्या थडकल्या. अगदी थोड्याच अंतराने मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पथकातील एक पोलीस गाडीही तातडीने हजर झाली. गाडीचा दरवाजा उघडून तो अधिकारी आठव्या मजल्यावर असलेल्या बारमध्ये घुसलाच!! त्याने सर्वांना दूर केले. ठाणे पोलिसांना बाजूला घेऊन काहीतरी घुसरफू केले. ठाणे पोलीस परत जायला निघाले. तो मुंबईवालाही त्या ग्रामीण भागातील पाटलाच्या सोबतीने गेला.
याप्रकरणी ठाणे पोलिसांनी मारामारी करणाऱ्यांना सोडून त्या बारमालकावरच गुन्हा ठोकला. उत्पादन शुल्क खात्याने दंड म्हणून तीन दिवस बार बंद करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे या मारहाणप्रकरणी कुणाचीही वैद्यकीय तपासणी केली गेली नाही. ज्याने मार खाल्ला त्यानेही रीतसर तक्रार केलेली नाही. जर बारमालकावर उशिरापर्यंत बार चालवल्याबाबत कारवाई होऊ शकते तर मग इतक्या रात्री उशिरा बारमध्ये जाणाऱ्यावर साधा गुन्हाही का दाखल केला गेला नाही, असा संतप्त सवाल तेथील नागरिक विचारत आहेत. आणि जर का ते पाटील राजकीय नेत्याशी संबंधित असतील तर त्यांनीही इतक्या उशिरा तेथे का गेलो याचा खुलासा करणे गरजेचे आहे. एक मात्र खरे की, दिवसा काहीसा रखरखीत असलेला हा वागळे इस्टेटचा भाग रात्री मात्र काहीसा ‘लुभावना’ असतो. हे त्या रात्री अनुभवले. त्याबाबत सविस्तर लवकरच…

