खारघर मुक्कामी महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार प्रदान प्रसंगी उष्माघाताने बळी गेल्याच्या घटनेबाबत आयोजक कंपनीवर गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात यावी, असा खळबळजनक अहवाल नवी मुंबई पोलिसांनी दिल्याची माहिती हाती आली आहे.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यावर्षीचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. भरदुपारी घेण्यात आलेल्या या समारंभात उष्माघाताने आतापर्यंत १४ श्रीसदस्यांचे बळी गेले आहेत. सध्या हे बळी उष्माघाताने गेले की प्रचंड गर्दीत झालेल्या चेंगराचेंगरीत झाले याबाबत राजकीय वाद सुरू आहे. यातच आता पोलिसांनी आयोजक कंपनीवरच गुन्हा नोंदवावा असा अहवाल दिल्याने सरकारवर बॉम्बच टाकला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यातच ‘लाईट अँड शेड्स’ ही समारंभ आयोजक कंपनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्याची असल्याचे बोलले जात आहे.
आयोजक कंपनीवर गुन्हा नोंदवला जावा असा जरी पोलिसांचा अहवाल म्हणत असला तरी मूळ अहवलात मात्र या कंपनीवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा नोंदवला जावा असे नवी मुंबईतील जवळजवळ सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत होते. नव्हे, त्यांचे तसे मतच होते, असे पोलिसांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सदोष मनुष्यवध हा शब्दच ऐकून अनेकांना कापरे भरले व त्यांनी तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या दबावापोटी सदोष मनुष्यवध हे शब्द गाळण्यात आल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर विशेष शाखेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान ही दुर्घटना घडली तेव्हा कामावर असलेल्या अधिकाऱ्यांना पत्रकारांशी काहीही बोलू नका, अशी तंबी देण्यात आलेली होती व आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात तर एक प्रकारचा सन्नाटा पसरलेला दिसतो. गुन्हे वार्तांकन करायला जाणाऱ्या रोजच्या चेहऱ्यांनाही पोलीस अधिकारी टाळू लागले आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी आयोजक कंपनीला सुमारे १४ कोटी रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
जाता जाता कवी शांताराम यांच्या सडेतोड आणि थेट ओळी आठवतात…
“करा रे खुशाल करा हवा तो राडा!
धमाल करण्याचा जमाना आहे!
बिंधास करा बलात्कार – भ्रष्टाचार – अत्याचार – भरसभेत – लोकसभेत
हवामान चांगले आहे… फेस्टिव्हल, कार्निवलचा सिझन आहे…
सहनशील आहेत समजूतदार गांडू
रडतात, ओरडतात… पण धोक्याची घंटा वाजवीत नाहीत”….

