मंगळवारची रमझान ईद शांततेत आणि चांगल्या प्रकारे पार पडावी. मी काही त्यांच्या सणाच्या विरोधी नाही. परंतु ईद झाली की बुधवारपासून (4 एप्रिल) राज्यातील सर्वच प्रार्थनास्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजेत, असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संभाजी नगरात (औरंगाबाद) आयोजित केलेल्या प्रचंड सभेत दिला. सर्वोच्च न्यायालयाने कुठेच भोंगे लावू नयेत असे सांगितले असताना राज्य सरकारने कुणाचेच लाड करू नयेत असे ठणकावून सांगितले.
काल रात्री संभाजी नगरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरील प्रचंड सभेत राज ठाकरे बोलत होते. ही सभा होणार की नाही हा सस्पेन्स सरकारने आदल्या दिवसापर्यंतपर्यंत ठेवला होता. अखेर पोलिसांनी अटीं-शर्तींसह जाहीर सभेला परवानगी दिली. सभा होईल की नाही हा सस्पेन्स असतानाही म न सैनिकांनी तसेच मराठवाड्यातील जनतेने सभेला मोठा प्रतिसाद दिला हे मान्य करावेच लागेल. विविध भागातून म न सैनिक आणले गेले, हे मान्य केले तरी सभेला मिळालेला प्रतिसाद सरकारने गंभीर्याने घ्यावा असाच होता. हे राज यांचे विरोधकही हे मान्य करतील.
आपल्या सुमारे तासभर केलेल्या भाषणात राज यांनी महाराष्ट्राच्या सद्यस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. अनेक चांगल्या गोष्टी व समाजसुधारणा सर्व देशाला देणाऱ्या राज्याची सध्याची परिस्थिती चिंताजनक असून रामदास स्वामींनी सांगितलेला ‘महाराष्ट्र धर्मच’ राज्याला वाचवेल हे सांगायला ते विसरले नाहीत. प्रस्तावनेत काही काळ गेल्यानंतर राज यांनी त्यांचा पेटंट विषय – शरद पवार, हाती घेतला आणि गेल्या दोन्ही सभेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्यावर कडाडून टीका केली. अगदी नास्तिकपणापासून तो शिवाजी महाराज यांचे नाव न घेण्यापर्यंत.. राज यांनी जणू एके-47च चालवली!!

मी त्यांची नास्तिक उघड केल्यापासून ते आता उघडउघड देव देव करत आहेत, फुले-आंबेडकर-शाहू यांचीच नावे ते घेतात. ही मंडळी थोर होतीच. पण, या मंडळींनी ज्यांचे विचार पेलले त्या शिवाजी महाराज यांचे नाव पवार चुकूनही घेत नाहीत. तसेच महाराजांची प्रतिमाही त्यांच्या सभेत नसते, असे झणझणीत अंजनच त्यांनी घातले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना लेन यांच्या नावाने बदनाम केले त्याच लेन यांनी मी फक्त शिवाजी महाराजांच्या कथा सांगितल्या. कोठलाही इतिहास सांगितला नाही, असे सप्रमाण सिद्ध करून पवार यांचा बाबासाहेब यांच्या विरोधातील प्रचार कसा विषारी आणि विखारी होता हे उघड केले. मी माझ्या आजोबांची म्हणजे प्रबोधनकारांची पुस्तके नीट वाचलेली आहेत, असा पवार यांना टोला हाणून आपल्याला पाहिजे तेवढाच भाग मी वाचून दाखवत नाही, असे त्यांनी पवार यांना सुनावले.
पवार यांनी जातीभेद वाढवले असे गेल्या दोन सभेत सांगितल्याप्रमाणे या सभेतही स्पष्ट केले. सभेत पवार यांच्यावरच गाडी अडकते की काय अशी श्रोत्यांना शंका येताच येतोय मी.. भोंग्यांवरही येतोय, असे सांगताच सर्वांना हायसे वाटले. तितक्यात सभास्थानाच्या जवळ असलेल्या मशिदीतून अजानचा आवाज सुरू होताच ते कडाडले.. अरे त्यांच्या आवाजात / तोंडात बोळा कोंबा रे.. !! आयला यांचे लाड वाढत चालले आहेत. हिंदूनो यांचा भोंगा बंद करायचा आहे.. असे म्हणताच सभेने उस्फुर्त प्रतिसाद दिला. केंद्र व राज्य सरकारने या भोंग्यांबाबत काहीतरी गंभीर निर्णय घ्यावा असे सुचवावेसे वाटते. कारण यासंबंधात जनता राज यांना प्रचंड प्रतिसाद देत असल्याचे तीन जाहीर सभांवरून दिसून आले आहे. विषय हाताबाहेर जाण्याआधीच इलाज झालेला बरा!!


यात तुमची भूमिका स्पष्ट होत नाही. ती स्पष्ट होणे गरजेचे होते.