Homeमाय व्हॉईसध्यानधारणा कशाला? ठाणेकरांना...

ध्यानधारणा कशाला? ठाणेकरांना स्वप्नातले कारंजे दाखवायला??

“thousands have lived without love, not one without water” हे सुभाषित आपल्यापैकी अनेकांना शालेय जीवनापासून माहीत असते. अपेक्षा करूया ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे माहीत असेल. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आता सर्वांनाच जाणवू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात अचानक दुरुस्तीचे काम निघाल्याने ठाणे शहरातील नागरिकांवर मोठ्या पाणीकपातीचे संकट ओढवले होते. त्यातून महापालिका प्रशासनाने तातडीच्या हालचाली करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. परंतु ठाणेकर नागरिकांना पाणी मनस्ताप आता वारंवार होऊ लागला आहे आणि अजून सर्व उन्हाळा बाकी आहे. मंत्रालयातील नगरविकास खात्याने ठाणे महापालिकेच्या जल विभागाची झाडाझडती घेणे गरजेचे झाले आहे.

ठाणे शहराच्या अवाढव्य परिसराला पाणीपुरवठा करणे सोपे नाही हे आम्हीही जाणतो. सर्वांना पाणीपुरवठा करणे जमत नसेल तर जनतेला 24 तास पाणीपुरवठ्याची स्वप्ने महापालिका आणि बिल्डर मंडळी कशाच्या जोरावर दाखवतात? गेल्या महिन्यापासून बिल्डर मंडळींनी तर कमालच केलेली दिसते. प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती आदी अनेक वर्तमानपत्रात स्वप्ननगरीच्या जाहिराती देऊन नागरिकांच्या डोक्याचे भजेच करत असतात. काय तर म्हणे 24 तास पाणी, पाण्याची कारंजी, तरण तलाव, त्या तलावाच्या बाजूला वॉटर स्पोर्ट्स आणि संकुलाच्या आत हिरो-हिरॉईन्सना रोमान्स करता येईल इतकी गर्द नाही परंतु पुरेशी झाडे! आदी.. काय वाट्टेल ते लपेटत असतात. आता नागरिकांना द्यायलाच पुरेसे पाणी उपलब्ध नाही. तर अशा जाहिरातींना प्रशासनानेच पायबंद घालायला नको का?? आणि या सर्व जाहिराती गुळगुळीत पानांवर रंगसंगतीत दणक्यात प्रसिद्ध झाल्यावर कोणाची बिशाद आहे, हे सर्व खोटे आहे म्हणण्याची??

पावसाळा संपत आला की पाणीपुरवठ्याबाबतचे वर्तमानपत्रांचे मथळेही चमकदार असतात. ‘पाणीपुरवठ्याची चिंता मिटली’, ‘यावर्षी ठाणेकरांची तहान भागणार’ ‘पुरेशा पाण्याने सरकारची चिंता मिटली’… वगैरे… एकदा का पाऊस संपला आणि नवरात्राचे वेध लागले की जल विभागाला विविध दुरुस्तीचे डोहाळे लागायला सुरुवात होते. कधी पाणीकपात तर बऱ्याच वेळा कमी दाबाचा पाणीपुरवठा. पाणीकपात झाली की कमी दाबाने पुरवठा हे त्याच्याबरोबर येतेच. हा कमी दाबाचा पुरवठा सुमारे चार-पाच दिवस तरी पिच्छा सोडत नाही. अशी पाणीकपात महिन्यातून दोन-तीनदा तरी होतेच. म्हणजे एकूण 15/20 दिवस पाण्याच्या नावाने नागरिक बोंबा मारत असतात. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या ठाणे शहराला हे शोभणारे आहे का? प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याचा विचार केला असता तर नागरिकांना पाणीटंचाईला सामोरेच जावे लागले नसते. शिवाय साकेत परिसरात पाईप लाईन्सखाली टँकरचीही गर्दी पाहवयास मिळाली नसती.

अलीकडच्याच वर्तमानपत्रात वाचले की महापालिका प्रशासन ध्यानधारणा केंद्र स्थापन करणार आहे. का तर म्हणे ठाणेकरांची मनःशांती प्रशासनाला महत्त्वाची वाटते. ध्यानधारणा केंद्राचा प्रस्ताव टोपलीत टाकण्याच्या लायकीचाच आहे. ठाणेकरांची मनःशांती इतकी महत्त्वाची वाटते तर प्रथम शहराचा पाणीपुरवठा सुधारा, रस्त्यांची सुधारणा करा, टी एम टी बससेवा सुधारा, कचरा नीट उचला, जागोजागी उभारलेली गॅरेजेस हलवा, रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाले हटवा.. जनतेच्या मनःशांतीसाठी अशा अनेक गोष्टी पालिका करू शकते.

काही महिन्यांपूर्वी आयुक्त म्हणाले होते की, शहरातील धूळ कमी केली पाहिजे. बरोबर आहे. पण प्रथम महापालिका मुख्यालयातील तळघरात किती मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे ते पाहून घ्या. तळघरच काय? पण, मुख्यालयाच्या इमारतीचीच रया गेल्यासारखी दिसत आहे. तुम्ही म्हणाल काय लिहिता, असे कुठे असते का?

“लिखा लिखि की बात नही|

मै कहता आखन देखी||” (कबीर जी)

आता सध्या प्रशासनाच्या कामात रोज हस्तक्षेप करायला लोकप्रतिनिधी नाहीत. तेव्हा संधीचा फायदा घेऊन प्रशासन लोकाभिमुख करा इतकेच सांगणे. नाहीतर..

“आपलेच खाऊन आपल्याच बसतात बोकांडी

जीआरचा पायखुट घातलेले लाल बैलही 

कधीच सोडवत नाहीत आपली मान

तथाकथित लोकसेवक गेंड्यांच्या जाचातून

आता आपणच यांना अश्व लावूया लोकहो…”

अशी अवस्था झाल्यास सावरायला कोणीच येणार नाही!!

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content