Homeमाय व्हॉईसठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाला...

ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाला झेला फक्त ‘उद्याच्या भविष्यासाठी’!

ठाणे जिल्हा तसेच ठाणे शहराचा महाराष्ट्र राज्याच्या महसुलात चांगला मोठा वाटा असला तरी राजकीय नेते तसेच राज्यातील नोकरशहा ठाणे जिल्हा आणि शहराकडे म्हणावे तसे लक्ष देतच नाहीत, असे खेदाने म्हणावे लागत आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयाचे साधे उदाहरण घेऊ. या विषयाला हात घालण्याआधी एक स्पष्ट करू इच्छितो की, कोरोना काळात सरकारी व महापालिकेच्या रुग्णालयांनी खरोखरच चांगले काम केले आहे आणि याची नोंद सर्वच यंत्रणांनी व समाजाने घेतलेली आहे. आता विषयाकडे..

हे ठाणे जिल्हा रुग्णालय बरीच वर्षे जुने आहे. तेथील डॉक्टर्स, परिचारिकावर्ग तसेच कर्मचारी कामगारांनी या रुग्णालयासाठी बरेच परिश्रमही घेतले आहेत, हे मान्य केले तरी प्रत्यक्ष पाहणीत मात्र निराशाच पदरात पडली. याचे प्रमुख कारण म्हणजे रुग्णालयाची नियोजित मोठी इमारत! या प्रस्तावित नवीन इमारतीबाबत आजच काही बोलत नाही. हा स्वतंत्र विषय आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कानोसा घेतला असता या नवीन प्रस्तावित इमारतीला किमान पाच-सहा वर्षे निश्चित लागणार. सरकारी काम असल्याने हा कालावधी दहा वर्षे लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात नवीन इमारत होईपर्यंत जुन्या इमारतीची आबाळ हे ठरलेलेच. त्यातच, काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक-दोन आठवड्यात येथील काही रुग्णकक्ष हळूहळू मेंटल रुग्णालयाच्या आवारात स्थलांतरित केले जाणार आहेत. म्हणजेच नवीन चकाचक इमारत तयार होईपर्यंत जुन्या इमारतीकडे पाहायचेच नाही, असे प्रशासनाने ठरवलेले दिसते. हे म्हणजे मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास जनतेने ‘उद्याच्या भविष्यासाठी’ खुशीने सोसावा असाच असावा. 

सुमारे तीन-चार तास जिल्हा रुग्णालयाच्या आवारात फेरफटका मारला असता दोनचार गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्या येणेप्रमाणे.. रुग्णालयाच्या आवारात प्रवेश केल्यापासून तो कोरोना रुग्णांच्या इमारतीपर्यंतच्या छोट्या टप्प्यात किमान सात-आठ खटारा रुग्णवाहिका मान टाकून धूळ खात पडलेल्या दिसून आल्या. त्यातील एक खटारा रुग्णवाहिका विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या आमदारकीच्या काळात आमदार निधीतून घेतल्याची जाहिरातच केलेली आहे. खरेतर ही व इतर खटारा रुग्णवाहिकांची विल्हेवाट रुग्णालय प्रशासन स्वतःच्या अधिकारात लावू शकते. मग हे प्रदर्शन कशासाठी? या खटारा रुग्णवाहिकांचे पर्यटन आयोजित करण्याचा प्रशासनाचा मानस तर नाही?

दुसरी एक नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे कंटेनर्स क्यूबिक! असे किमान 15/20 तरी कंटेनर्स क्यूबिक आहेत. जुन्या इमारतीत बसण्यायोग्य जागा नसल्यानेच हे कंटेनर्स आणण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सर्व कंटेनर्सच्या घोळक्यात एक कापून ठेवलेला झाडाचा बुंधाही दिसून आला. या कंटेनर्समध्ये आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत ही त्यातली समाधानाची बाब. बाकी सर्व आनंदीआनंदच आहे. रुग्णांचे केसपेपर्स काढण्याच्या जागेत प्लास्टिकचे भले मोठे पाईप आणून टाकले आहेत. त्याच्या थोडेसे बाजूला बाबा आदमच्या काळातील एक जुनाट यंत्र चिरविश्रांती घेत असल्याचे दिसून आले.

कोरोना रुग्णांची इमारत वगळता इतर सर्व इमारती अगदी विटलेल्या आहेत. इतक्या की, गेल्या 15/20 वर्षांत बांधकाम विभागाने साधा चुनाही तेथे मारलेला दिसत नाही. चुन्याचे बिल मात्र त्यांनी नक्की पाठवले असेल आणि संमतही झाले असेल. रुग्णालयाच्या आवारातील सार्वजनिक स्वछतागृहाची हालतच आहे. पाण्याच्या नावाने आनंद आहे. अनेक ठिकाणी पाईपच नाहीत. पॅथॉलॉजी विभागाच्या खिडकीत ढीगभर कचरा अडकलेला आहे. हे तर काहीच नाही. जिल्हा सर्जन बसतात त्यांच्या केबिनच्या खाली तळमजल्यावर प्लास्टिक बाटल्यांचा ढीग आहे. तो कोणाला सहजासहजी दिसू नये म्हणून हिरवा पडदा लावलेला आहे. बागेत ठेवलेल्या खेळण्यांना गंजाची पुटे चढली आहेत. ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी कोणालाही न कळवता या जिल्हा रुग्णालयाला नक्की भेट द्यावी. थोड्या आशा तरी पल्लवित होतील..

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content