ठाणे शहराजवळील काल्हेर गावात कालच्या मंगळवारी एका महिलेवर घरात घुसून गोळीबार केल्याची गंभीर घटना घडल्यावर वर्तमानपत्रांनी गेल्या तीन-चार महिन्यांतील ही चौथी घटना असल्याचे नमूद करून ठाणे पोलिसांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. यातून ठाणे पोलीस किती सतर्क झाले हे येणारा काळच सांगणार आहे. हे लिहीपर्यंत पोलिसांनी हल्लेखोरांना मध्य प्रदेशमधून अटक केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न नाही. अवघ्या तीन दिवसांत आरोपी पकडण्यात यश मिळाले म्हणून पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, त्याबरोबरच संबंधितांनी डमी आरोपी हजर केल्याची कुजबूज सर्वत्र सुरू आहे. गोळीबार करण्यामागे जे कारण सांगितले आहे तेही फारसे पटणारे नाही आणि गोळीबार केल्यानंतर बूट न घालताच आरोपी पळून गेला ही माहिती तर हास्यास्पद वाटते. जिवाच्या आकांताने माणूस जीव मुठीत घेऊन पळतो हे माहीत आहे. परंतु घटनास्थळाला भेट दिली असता तो रस्ता पळून जाण्यासाठीही धड वाटत नव्हता. सर्वत्र अणूकुचिदार खडी व कमालीचा खडबडीत रस्ता दिसत होता. त्याने बाईकवरून पलायन केले असावे असाही एक तर्क आहेय
सुमारे वर्ष-सव्वा वर्षापूर्वी याच काल्हेर गावात एका व्यक्तीची खांडोळी करण्यात आली होती, असेही तेथील गावकऱ्यांनी दबक्या आवाजात सांगितले. संपत्तीच्या वादातून तो खून झाला होता. दुर्गेश पार्कच्या मागील बाजूस स्थानिक गावकऱ्यांची बंगलेवजा प्रशस्त घरे आहेत. दोन-तीन बंगले, बंगले म्हणावेत असे आहेत. बाकीच्या उरलेल्या ऐसपैस भूखंडावर वाट्टेल तशा इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. जिल्हा परिषद

कार्यालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकदा सवड काढून या परिसराला भेट देण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीने या इमारतींचे आराखडे कसे संमत केले हे एक कोडेच आहे. इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याचा पत्ता नाही. जेमतेम एक गाडी पास होईल इतका अरुंद रस्ता, पाण्याची सोय तात्पुरती आहे. अनेकांनी पाण्याच्या दाबासाठी मोटारी लावलेल्या दिसल्या. खाडीपर्यंत पसरलेल्या या भागाची पोलिसांनी एकदा छाननी केली पाहिजे. तसेच काही बंगलेवजा घरांची झडती घेणेही गरजेचे आहे असे एका ज्येष्ठ व्यक्तीने बोलताना सांगितले.
येथील स्थानिक युवक वर्गापैकी काही युवक टपोरीगिरी करतात. बाईक्सवर तिघे-चौघे विनामास्क बसतात व बाईक हवी तशी फिरवतात. कोणाकडे कोण येतो, जातो यावरही येथे बारीक लक्ष ठेवले जाते. आणखी एक गोष्ट कळली ती ही की, या गावात राडा करायचा आणि ठाणे शहरात जाऊन प्रभावशाली नेत्याच्या घरात आश्रयाला जायचे हा इथला जणू रिवाजच आहे. या ग्रामीण भागातील गुंडगिरीला या नेत्यांचा पाठिंबा नसला तरी आश्रय मात्र नक्की आहे असे कुणाचेही नाव न घेता अनेकांनी सांगितले. राडा करायचा आणि ठाणे किंवा भिवंडीत छू व्हायचे, हे या युवकांना पक्के ठाऊक आहे. या गुंडांचे कुठल्या नेत्यांशी संबंध आहेत हे शोधण्यास पोलिसांना फारसे श्रम घ्यावे लागणार नाहीत. मात्र, मनोबल वाढवावे लागेल. सर्वांचे कॉल डिटेल्स जर नेत्यांसमोर ठेवले तर त्यांची बोलतीच बंद होईल. तरीही हे प्रकार थांबले नाहीत तर ही सर्व माहिती त्यांच्या ‘देव पित्याला’ द्यायला घाबरू नका. प्रकरण आपल्या अंगाशी येतंय हे कळताच हा देवपिता त्यांना झुरळासारखा झटकून देईल याची खात्री बाळगा. तसेच ठाणे शहर पोलीस आयुक्तांनी या ग्रामीण भागासाठी जादा पोलीस कुमक तसेच जादा वाहनांची मागणी करणे आवश्यक आहे. एक-दोन खुनाच्या केसेस राज्य सीआयडीकडे सुपूर्द करून पोलिसांची जरब पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. काहीही करा. पण ठाणे ग्रामीणमध्ये वाढणारी गुन्हेगारी वेळीच रोखा!

