Homeटॉप स्टोरीनाकारलेल्या स्थगन प्रस्तावांवर...

नाकारलेल्या स्थगन प्रस्तावांवर बोलण्याने प्रश्नोत्तरातली १० मिनिटे कमी!

विधानसभा अध्यक्षांनी दालनातच स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतरही विरोधी पक्षांतील आमदारांनी तसेच विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात विषय उपस्थित करण्याचा आग्रह धरल्याने प्रश्नोत्तराच्या तासातील दहा मिनिटे कमी झाली.

वास्तविक, अनेक आमदार आपले प्रश्न लेखी स्वरूपात अधिवेशनापूर्वी ४५ दिवस आधी सादर करतात. त्यानंतर सरकारकडून त्या प्रश्नांचे उत्तर तयार करून सभागृहात दिले जाते. त्या उत्तरानंतर अनेक सदस्य उपप्रश्न विचारून जनतेचे प्रश्न धसास लावतात. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाला अनन्यसाधारण महत्त्व असते.

नागपूर आगप्रश्नी काही मुद्दे विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि अनिल देशमुख यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केले. वास्तविक, त्यांचे स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी दालनातच नाकारले होते. तरीही नागपूरमधील आगीचा विषय नाना पटोले, विजय वडेट्टीवार तसेच अनिल देशमुख यांनी मांडला. त्यानंतर नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या आदेशांचे पालन होत नाही, असे सांगत सरकारला निवेदन करण्यास सांगावे, अशी मागणी केली.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की सरकार दखल घेऊन निवेदन करेल. संसदेत जो प्रकार झाला त्यामुळे त्यादिवशी निवेदन करता आले नाही. अजित पवार म्हणाले की, नाना पटोले खासदार होते आणि त्यांना माहीत आहे की गंभीर विषयांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करत असते.

त्यावर अमरावतीमध्ये शस्त्रे सापडली, ही गंभीर बाब नाही का, असे विचारून नाना पटोले म्हणाले की, मी खासदार होतो, आज आमदार आहे, त्यामुळेच प्रश्न उपस्थित केला आहे. पण, शस्त्रे सापडली हा प्रश्न गंभीर नाही का… त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना तंबी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पण, त्यांची मागणी मान्य झाली नाही.

विरोधकांचा सभात्याग

नागपूरमधील स्फोट आणि आगीच्या संदर्भात स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतर सभागृहात बोलू दिले नाही, असा आरोप विधानसभा अध्यक्षांवर करत विरोधी पक्षांनी १२ वाजून दहा मिनिटांनी सभात्याग केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, ही घटना गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे, मी स्वतः, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तसेच मंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीलाच तुम्ही विरोधी पक्षातील आमदारांना बोलायला संधी दिलीत आणि तेव्हाच प्रश्नोत्तराच्या तासानंतर या विषयावर बोलायला वेळ देणार नाही, हेही तुम्ही स्पष्ट केले होते. अशा वेळी आधी बोलून पुन्हा विषय उपस्थित करून सभात्याग करणे योग्य होणार नाही, असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले. विरोधकांपैकी नाना पटोले तसेच जयंत पाटील, राजन साळवी, अजय चौधरी आदी सदस्य मात्र सभागृहात लगेच परत आले. त्यानंतर हळूहळू बाकीचे सदस्यही पुन्हा सभागृहात परतले.

सांगली जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायती बंद करून धरणे धरले आहे, या विषयीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या विषयावरील स्थगन दालनातच नाकारला आहे, हे अध्यक्षांनी स्पष्ट केले पण जयंत पाटील यांनी हा विषय उपस्थित केला. त्यानंतर औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित करण्यासाठी २५ आमदारांना परानगी देण्यात आली.

Continue reading

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...

प्रभूजी.. तर मग तुम्ही दिवाळखोरीत!

शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांच्या निवडणूक शपथपत्राचा हवाला देत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत त्यांना विचारले की, सुनील प्रभूजी तुमच्या संपत्तीच्या तुलनेत पंचवीस टक्के इतकी तुमची देणी दिसताहेत. तर मग तुम्ही लवकरच दिवाळखोर होणार का... नादारी जाहीर...

चंद्राची न शिवली गेलेली चड्डी आणि नोकरभरती…

आभाळात चड्डी न घालता दिमाखात वावरणारा आणि अखिल विश्वाचे लक्ष वेधून घेणारा चंद्र आणि महाराष्ट्रातील नोकरभरती याचा काय संबंध आहे? असं विचारलं तर तुम्ही गोंधळात पडाल. पण सध्या रोजच्या रोज विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारे राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
Skip to content