Homeटॉप स्टोरीनाकारलेल्या स्थगन प्रस्तावांवर...

नाकारलेल्या स्थगन प्रस्तावांवर बोलण्याने प्रश्नोत्तरातली १० मिनिटे कमी!

विधानसभा अध्यक्षांनी दालनातच स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतरही विरोधी पक्षांतील आमदारांनी तसेच विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात विषय उपस्थित करण्याचा आग्रह धरल्याने प्रश्नोत्तराच्या तासातील दहा मिनिटे कमी झाली.

वास्तविक, अनेक आमदार आपले प्रश्न लेखी स्वरूपात अधिवेशनापूर्वी ४५ दिवस आधी सादर करतात. त्यानंतर सरकारकडून त्या प्रश्नांचे उत्तर तयार करून सभागृहात दिले जाते. त्या उत्तरानंतर अनेक सदस्य उपप्रश्न विचारून जनतेचे प्रश्न धसास लावतात. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाला अनन्यसाधारण महत्त्व असते.

नागपूर आगप्रश्नी काही मुद्दे विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि अनिल देशमुख यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केले. वास्तविक, त्यांचे स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी दालनातच नाकारले होते. तरीही नागपूरमधील आगीचा विषय नाना पटोले, विजय वडेट्टीवार तसेच अनिल देशमुख यांनी मांडला. त्यानंतर नाना पटोले यांनी अध्यक्षांच्या आदेशांचे पालन होत नाही, असे सांगत सरकारला निवेदन करण्यास सांगावे, अशी मागणी केली.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की सरकार दखल घेऊन निवेदन करेल. संसदेत जो प्रकार झाला त्यामुळे त्यादिवशी निवेदन करता आले नाही. अजित पवार म्हणाले की, नाना पटोले खासदार होते आणि त्यांना माहीत आहे की गंभीर विषयांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करत असते.

त्यावर अमरावतीमध्ये शस्त्रे सापडली, ही गंभीर बाब नाही का, असे विचारून नाना पटोले म्हणाले की, मी खासदार होतो, आज आमदार आहे, त्यामुळेच प्रश्न उपस्थित केला आहे. पण, शस्त्रे सापडली हा प्रश्न गंभीर नाही का… त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना तंबी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पण, त्यांची मागणी मान्य झाली नाही.

विरोधकांचा सभात्याग

नागपूरमधील स्फोट आणि आगीच्या संदर्भात स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतर सभागृहात बोलू दिले नाही, असा आरोप विधानसभा अध्यक्षांवर करत विरोधी पक्षांनी १२ वाजून दहा मिनिटांनी सभात्याग केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, ही घटना गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे, मी स्वतः, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तसेच मंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीलाच तुम्ही विरोधी पक्षातील आमदारांना बोलायला संधी दिलीत आणि तेव्हाच प्रश्नोत्तराच्या तासानंतर या विषयावर बोलायला वेळ देणार नाही, हेही तुम्ही स्पष्ट केले होते. अशा वेळी आधी बोलून पुन्हा विषय उपस्थित करून सभात्याग करणे योग्य होणार नाही, असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले. विरोधकांपैकी नाना पटोले तसेच जयंत पाटील, राजन साळवी, अजय चौधरी आदी सदस्य मात्र सभागृहात लगेच परत आले. त्यानंतर हळूहळू बाकीचे सदस्यही पुन्हा सभागृहात परतले.

सांगली जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायती बंद करून धरणे धरले आहे, या विषयीचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या विषयावरील स्थगन दालनातच नाकारला आहे, हे अध्यक्षांनी स्पष्ट केले पण जयंत पाटील यांनी हा विषय उपस्थित केला. त्यानंतर औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित करण्यासाठी २५ आमदारांना परानगी देण्यात आली.

Continue reading

क्यालिडोस्कोपिक नारळीकर…

जयंत नारळीकर... मनःपटलासमोर हे नाव आले की माझ्या पत्रकारितेच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे १९८८पासूनच्या काही आठवणी डोळ्यासमोर फेर धरू लागतात. आठवणींचे हे कोलाज मनात, डोळ्यासमोर येते आणि त्यातून आपले मन मनातल्या मनात या थोर वैज्ञानिकासमोर नतमस्तक होत आहे, हे जाणवू...

अजित पवारबरोबर राहिलात तर कल्याण होते…

महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी पुण्याच्या चिंचवडमध्ये पानाची टपरी चालवली आहे. पानाची टपरी चालवणारा अण्णा यांच्यासारखा कार्यकर्ता नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष ते विधानसभेचा...

आपल्याला कॉमन मॅनला सुपरमॅन करायचं आहे नानाभाऊ..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे विधानसभेत बोलताना संसदीय भाषण न करता बहुतांशवेळा राजकीय स्वरूपाचे भाषणच करतात, हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सव्वादोन वर्षांच्या कारकिर्दीतही दिसून आले होते. त्याची आठवण त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत करून दिली आणि कॉँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी...
Skip to content