Homeपब्लिक फिगरअर्थसंकल्प वाचायला शिकवता...

अर्थसंकल्प वाचायला शिकवता शिकवता तुम्हीच केला खेळखंडोबा..

अर्थसंकल्प कसा वाचावा, हे तुम्ही शिकवले. पण तुम्ही गेल्या दहा वर्षांतल्या विक्रमी ५० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पुरवण्या मागण्या मांडून अर्थसंकल्पाचा खेळखंडोबा केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत राज्य सरकारवर विशेषतः अर्थमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर केली.

पुरवणी मागण्यांमधून मत्ता निर्माण होण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने या मागण्या म्हणजे आर्थिक बेशिस्तीचे उत्तम उदाहरण असल्याची टीकाही पवार यांनी केली. सत्ताबदलातल्या घडामोडींचा आढावा घेऊन फडणवीस यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, तुम्ही काय काय केलेत, कोणाकोणाला फोन केलेत आणि कुठे कुठे पाठवलेत, ते आम्हाला माहीत आहे. तुम्ही अगदी वेष पालटूनही कोणाला भेटत होतात आणि हे कोणी सांगितले, हे काही मी सभागृहात सांगणार नाही. (फडणवीस वेष बदलून रात्री जायचे आणि एकनाथ शिन्दे यांना भेटून यायचे, हे राज्यातील सत्तांतरानंतर अमृता फडणवीस यांनी सांगितले होते.)

पवार बोलत असताना संजय कुटे यांनी हस्तक्षेप करताच पवार म्हणाले की, मी विदर्भावरच बोलतोय. विदर्भातल्या नेत्यांवरच बोलतोय. मला सगळं माहीत आहे अगदी पहाटे आठ वाजता उठून झालेल्या शपथविधीबद्दलही माहीत आहे… पवार यांनी ही गोष्ट सांगताच सभागृहात हशा उसळला. त्यावर लगेचच पवार म्हणाले की, मात्र माहीत असले तरी ते आमच्या दोघांतले (अजित पवार आणि फडणवीस) आहे आणि ते मी सर्वांना सांगणार नाही.

अर्थसंकल्प

ईडी माहीत होती, एनआयए माहीत होते. पण आता उठसूट एसआयटी लावतो, हा प्रकार सुरू झाला आहे, अशी टीकाही पवार यांनी केली. ती करताना त्यांनी फडणवीस यांची नक्कल केली आणि मी तपासून बघतो आणि एसआयटी लावतो, असे पवार यांनी सांगताच सभागृहात पुन्हा एकदा हशा उसळला.

भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रात देवेन्द्र फडणवीस सर्वात प्रभावी नेते आहेत, असे सांगून अजित पवार म्हणाले की, तुमचे एक नेते म्हणाले की घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम बारामतीत करतो. बारामतीत आमचं काम आहे. आणि हे आमचा करेक्ट कार्यक्रम करायला निघालेत… अरे, मी एखाद्याचा चॅलेन्ज घेतला तर कोणाच्या बापाचं ऐकणार नाही… आम्ही कार्यक्रम केला तर हे कोलमडून पडेल… पवार यांच्या फटकेबाजीला संपूर्ण सभागृहाने दाद दिली.

सहा महिने झाले. पण, अजून तुम्ही एकाही महिलेला मंत्री करत नाही, अशी टीका करून पवार म्हणाले की, मी आता वहिनींनाच सांगतो म्हणजे मग त्या तुम्हाला सांगतील आणि मग तुम्ही ऐकाल. मग तरी महिला मंत्री होईल. महिला मंत्री नाही हा महाराष्ट्रातील महिलांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांबद्दलही अजित पवार यांनी टीका केली. बुट्टीबोरी असो की मिहान. हे प्रकल्प गतिमान होऊ शकलेले नाहीत, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. तुम्हीही कमी पडलात आणि आम्हीही कमी पडलो… यात विदर्भाचा काय दोष, असा प्रश्न करून पवार म्हणाले की आपण सगळेच कमी पडलोय.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content