छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र ‘बापूजी’ म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट ही मालिका सोडणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अमित भट्ट हे मालिकेच्या सुरुवातीपासूनच या शोचा अविभाज्य भाग आहेत. जेठालालचे वडील म्हणून त्यांची धाकधपटशा आणि विनोदी शैली प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अमित भट्ट आता या मालिकेतून निरोप घेऊ शकतात. मात्र, अद्याप निर्माते असित मोदी किंवा स्वतः अमित भट्ट यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. जर ही बातमी खरी ठरली, तर जेठालाल आणि बापूजींची ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकत्र पाहता येणार नाही.
आतापर्यंत १२ कलाकारांनी सोडली मालिका
‘तारक मेहता…’ या मालिकेला कलाकारांनी सोडचिठ्ठी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांत तब्बल १२ मुख्य कलाकारांनी विविध कारणांमुळे या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. यामध्ये काही प्रमुख नावांचा समावेश आहे-
- दिशा वकानी (दयाबेन): मालिकेची मुख्य नायिका दिशा वकानी हिने प्रसूती रजेनंतर मालिकेत पुनरागमन केलेच नाही.
- शैलेश लोढा (तारक मेहता): जेठालालचे ‘फायर ब्रिगेड’ आणि मालिकेचे सूत्रधार शैलेश लोढा यांनी मानधन आणि निर्मात्यांशी असलेल्या वादामुळे मालिका सोडली.
- भव्य गांधी आणि राज अनदकट (टप्पू): टप्पूची भूमिका साकारणाऱ्या दोन्ही अभिनेत्यांनी करिअरमधील इतर संधींसाठी मालिका सोडली.
- नेहा मेहता (अंजली भाभी): नेहा मेहता यांनीही निर्मात्यांशी असलेल्या काही मतभेदांमुळे या गाजलेल्या मालिकेला रामराम ठोकला.
- गुरुचरण सिंह (रोशन सिंह सोढी): सोढीच्या भूमिकेतील गुरुचरण सिंह यांनी वैयक्तिक कारणांमुळे मालिका सोडली होती.
- जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (रोशन भाभी): जेनिफरने निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत मालिका सोडली, ज्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.
- मोनिका भदौरिया (बावरी): बावरीचे पात्र साकारणाऱ्या मोनिकानेही सेटवरील वागणुकीला कंटाळून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
मालिकेच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह
एकामागून एक जुने आणि लोकप्रिय कलाकार मालिका सोडून जात असल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. अमित भट्ट यांनी जर मालिका सोडली, तर त्याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी अनेक कलाकारांच्या जागी नवीन कलाकार आले आहेत, मात्र जुन्या कलाकारांची जागा भरून काढणे निर्मात्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. सध्या चाहते या वृत्तावर अधिकृत मोहोर उमटण्याची वाट पाहत आहेत. जर ही एक्झिट झाली, तर ‘गोकुळधाम’ सोसायटीमधील एक मोठा आधारस्तंभ कमी होणार आहे.

