Homeमाय व्हॉईसवाधवान खटल्यात तपासयंत्रणांनी...

वाधवान खटल्यात तपासयंत्रणांनी चालढकल का केली?

बरोबर तीन वर्षांपूर्वी वाधवान कुटुंबियांशी संबंधित विषय चर्चिला गेला आणि कालच या बदनाम वाधवान यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. भांडुपनजिकच्या ड्रीम मॉल जळीत प्रकारणीही त्यांना अटक झालेली होती. कोरोना काळात येथील रुग्णालयाला आग लागून 11 जण होरपळून दगावले होते. जामीन मुख्यतः पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या गफल्यासंदर्भात आहे. येथेही तपासयंत्रणा म्हणून सीबीआय व इडीने काम पाहिलेले होते. हा खटला बराच रेंगाळला आणि नेमके हेच कारण हेरून आरोपींनी जामीनअर्ज पुढे रेटला. खटला नियमित चालला नाही म्हणून जामीन मिळाला हे उघड आहे. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोपांना उत्तर देताना आम्ही खटला लवकर संपवण्यावर भर देत असतो असे इडीतर्फे सांगण्यात आले.

खरे तर सीबीआय व इडीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणे गरजेचे आहे. आरोपीच्या नातलगांचे लागेबांधे शोधण्यात वस्ताद असलेल्या इडी अधिकाऱ्यांचेही नातलग काय काय दिवे लावतात हेही जनतेसमोर येणे गरजेचे आहे. मुंबई, ठाणे येथील काही अधिकाऱ्यांच्या पत्नींचेही व्यवसाय आहेत. काहीजण निवासी गाळे व व्यावसायिक गाळ्यांची दलाली करतात. (ब्रोकरेज) या दलाली करारात अफलातून कलमे घालतात. नैसर्गिक न्यायाला जणू घोडाच लावतात. करारातील भलीमोठी रक्कम ते स्वतः आणि त्यांचे साथीदार गट्टम करतात. त्यांची मुले-बाळे गाड्या पुरवण्याचा व्यवसाय करतात, तोही वडिलांच्या राहत्या घराच्या पत्त्यावर. या प्रकारणतील सर्व कागदपत्रे हाती येताच सुमारे 10/15 अधिकाऱ्यांचा पंचनामाच येथे करण्याचा मानस आहे.

तर.. आपला मुख्य विषय वाधवान आहे. या वाधवान यांचा खटला नियमित का चालू शकला नाही याची चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय ज्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे अनेक वर्षे अध्यक्ष असलेल्या स्व. तारासिंग यांची चौकशी का झाली नाही हेही कुठेतरी नोंदले गेले पाहिजे. कारण त्यांचे निधन नंतर झाले. त्याआधीच बँकेचा घोटाळा बाहेर आला होता. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सजा झाली असली तरी खरे सूत्रधार तारासिंगच होते.

महाराष्ट्र पंजाब सहकारी बँकेत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. पुढे नाव आले वाधवान बंधूंचे. तेथे पैशाची आणि चेक्सची अशी बेमालूम हेराफेरी केली की ती हेराफेरी अनेकवर्षे कोणाच्या लक्षातच आली नाही. लक्षात आली तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याशिवाय कोणी काही करण्याच्या मनःस्थितीतच नव्हते. त्याप्रकरणी न्यायालयाच्या चकरा सुरू झाल्या असून आपल्या देशातील न्यायदानप्रक्रिया पाहता अंतिम निर्णय येण्यास किती वेळ लागेल हे पट्टीचा भविष्यवेत्ता सांगू शकणार नाही. हे प्रकरण काहीसे शांत होत नाही तोवरच भांडुप रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेल्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयात 25 मार्चच्या रात्री भीषण आग लागून झालेल्या दुर्दैवी अग्निकांडात 11 रुग्ण दगावले. दगावलेल्या रुग्णात कोरोना झालेल्या रुग्णांचा समावेश होता. सनराईज रुग्णालयाला तात्पुरते कोरोना रुग्णालय उभारण्याची परवानगी अटीशर्ती घालून मुंबई महापालिकेने दिली होती.

आता काही क्षणाकरीता थोडे मागे जाऊया. आता ज्याठिकाणी मॉल आणि आतल्या बाजूस ड्रीम निवासी संकुल आहे त्या मोठ्या भूखंडावर (सुमारे 35/40 एकर) एपीआय, ही औद्योगिक कंपनी होती. या कंपनीत स्कूटर आणि तिचे सुटे भाग बनत असत. 1997मध्ये ही कंपनी बंद पडली. याच साली लढाऊ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचा त्यांच्या घराजवळ पवई मुक्कामी गोळ्या झाडून खून करण्यात आला आणि या खुनानंतर अवघ्या तीन-साडेतीन महिन्यांत या औद्योगिक कंपनीत स्वेच्छानिवृत्ती जाहीर करण्यात आली. या स्वेच्छानिवृत्तीपोटी कामगारांमध्ये सुमारे 12 कोटी रुपयांपेक्षा मोठी रक्कम वाटण्यात आली आणि सुमारे 350/400 कामगार कायमचे बेकार झाले तसेच एक मोठा कारखाना बंद झाला.

वाधवान

या मोठ्या भूखंडावर वाधवान यांच्या हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा डोळा होताच. परंतु इतका मोठा भूखंड वाधवानकडे जात आहे असे कळताच राजकीय हालचालींना वेग आला. सर्वांना समाधानी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला गेला. समझोत्यापोटी पवार स्कूलला तीन-चार एकर देण्यात आले व प्रकरणावर पडदा पडला. खरी गंमत त्यानंतरच सुरू झाली. एलबीएसच्या रस्त्याला लागून असलेल्या भूखंडावर मॉल बांधायचे ठरले तर आतल्या बाजूस भूखंडावर ड्रीम निवासी संकुल उभारण्याचे ठरले. जमिनीचे आताचे भाव लक्षात घेतले तर 1997च्या आसपास या भूखंडाला कमीच भाव मिळाला. (तरी कोटींची उड्डाणे होतीच हां..)

या ड्रीम मॉलचा आराखडा हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांचा आहे. वास्तविक 2004मध्येच हा मॉल बांधून पूर्ण झाला होता. परंतु मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने राहण्यायोग्य वा वापरात आणता येईल असे प्रमाणपत्र काही दिलेले नव्हते. अजूनही असे प्रमाणपत्र मॉलकडे नाही. कोरोना रुग्णालय सुरू करतानाही अटींच्या पूर्ततेच्या सापेक्ष तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात आले होते. हे प्रमाणपत्र वर्षासाठीच होते. त्याची मुदत मार्च महिन्याच्या अखेरपर्यंतच होती. या मॉलचे बांधकाम धड नाही. मॉलमधील गाळे बांधण्यात बरीच अनियमितता व गैरप्रकार आहेत. याबाबत इमारत प्रस्ताव खात्यातील एका अभियंत्याने खरमरीत अहवाल लिहून मॉलचे बांधकाम नियमित करण्याची मागणी धुडकावून लावली होती, अशी माझी माहिती आहे.

ज्या दिवशी आग लागली त्याच्या दुसऱ्या दिवशीच या मॉलसंबंधित फाईल महापालिका मुख्यालयात मागवून घेण्यात आली आणि प्रत्येक कागद तपासून पाहण्यात आला. त्या कागदांमध्ये काहीच चूक आढळून आली नाही. ओसी नसल्याने मॉलला पाणीपुरवठा होत नाही तसेच वीजजोडणीही नाही. रुग्णालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी आणि विजेची सोय करून देण्यात आली होती आणि तेही कोरोना होता म्हणून! दरम्यान पाणी आणि वीज नसल्याने मॉलमधील गाळेधारक त्रासले होते. काही गाळेधारकांनी अनधिकृतरित्या पोटमाळेही बांधलेले होते. खरेतर 2009पर्यंत हा मॉल सुरूच झाला नव्हता. नंतर सुरू झाला, परंतु अनेक तक्रारी असल्याने तेथे येण्यास कोणीही उत्सुक नव्हते. तशातच गाळेधारक आणि कंपनीत वाद सुरू झाले. मग पैशांची थकबाकी सुरू झाली.

मॉलचे प्रशासन सांभाळण्यासाठी विधी लवादाने प्रशासक नेमण्यापर्यंत वाद विकोपाला गेले. वाद वा खुसप्टे काढण्यात बड्या कंपन्या वाकबगार असतातच. एकदा का वाद लवादाकडे गेला की वर्षोनुवर्षे तो वाद लवादाकडेच राहतो आणि थेट मिळालेले पैसे खुशाल वापरता येतात किंवा फिरवता येतात. कोरोना रुग्णालय होते म्हणजे सनराईजने काहीच गुंतवणूक केलेली नसणार. सरकार वा महापालिकेने या उभारणीसाठी मोठा निधी दिला असणारच. तो कोणाच्या सल्ल्याने दिला? तेथील आमदार, खासदार तसेच नगरसेवकांचा याप्रकरणी काय रोल होता हेही समोर आले पाहिजे. या आगप्रकरणी मॉलच्या व्यवस्थापन करणाऱ्यांपैकी काही अटकेत आहेत. रुग्णालयाचे संचालकही आतच आहेत. या आगीत दगावलेल्या रुग्णांसाठी या सर्वांकडून दंडापोटी मोठी रक्कम वसूल केली जावी. ती नातेवाईकांना समप्रमाणात वाटण्यात यावी. पाच लाख रुपयांच्या मदतीने हल्ली काहीही होत नाही म्हणून वरील सूचना केली आहे.

हा मजकूर लिहीत असतानाच ड्रीम निवासी संकुलातील रहिवाशांचा फोन आला. आमच्याही अनेक समस्या आहेत. जाहिरातीत दाखवलेली स्वप्ने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. पाणी नाही, ड्रेनेजची सोय अपुरी आहे. आतले रस्तेही यथायथाच आहेत. इमारतींची देखभाल व्यवस्थित होत नाही, असा बराच मोठा नन्नाचा पाढा त्यांनी वाचला. बघुया कायकाय होते ते..

छायाचित्र मांडणीः राजस वैद्य

Continue reading

रोहित शेट्टींच्या बंगल्यावरचा गोळीबार, एक स्टंट?

काही महिन्यांपूर्वी वा सुमारे वर्षांपूर्वी प्रसिद्ध सिनेअभिनेता सलमान खान यांच्याही बंगल्याच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा तर बांद्रा पूर्व येथे भररस्त्यात गोळ्या घालून खून करण्यात आला. यानंतरही कुणाकुणाला कोट्यवधी रुपयांच्या...

ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना खुले पत्र!

नवनिर्वाचित महापौर शर्मिलाताई यांना सविनय प्रणाम. शर्मिलाताई, प्रथम आपले अभिनंदन! आज आपण ठाणे शहराच्या महापौर म्हणून अधिकृतरित्या पदभार सांभाळला. त्याबरोबरच आपले अभिनंदन करण्याचा मान मी घेत आहे. महापौरपदाचा भार सांभाळल्यानंतर आपण शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे म्हणजेच सत्तारूढ महायुतीचे सरकार ठाणे...

जेलवारी करणारे छगन भुजबळ होते ‘राजबंदी’?

महाराष्ट राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बेहिशेबी संपत्ती जमवल्याच्या आरोपतून सरकारच्या इडी यंत्रणेने आरोपमुक्त केल्याची बातमी काल आली आणि इंग्रजीतील आघाडीचे साप्ताहिक 'आउटलूक'मध्ये 'Thou Shalt Not Dissent' ही मुखपृष्ठकथाही कालच बाहेर आली! तसा भुजबळ यांचा...
Skip to content