Homeपब्लिक फिगरनवाब मलिकांना पाठीशी...

नवाब मलिकांना पाठीशी घालणे हाच का ‘ठाकरी बाणा’?

बॉम्बस्फोट करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रीपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ठाकरी बाणा दाखवणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत केला.

अनिल देशमुख यांचा जसा तातडीने राजीनामा घेण्यात आला तोच न्याय मलिक यांना लावला पाहिजे. दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप हा देशद्रोहाएवढाच गंभीर असल्याने असा ठपका असलेला मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेसह अन्य निवडणुकांवर डोळा ठेवून मुस्लिमांच्या अनुनयाकरिता देशद्रोही दाऊदच्या हस्तकास अभय देण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकारच्या अधोगतीस कारणीभूत ठरेल असा इशाराही उपाध्ये यांनी दिला. नवाब मलिक यांनी दाऊदच्या दहशतवादी कारवायांकरिता पैसा जमा करण्याच्या कटास साह्य केल्याचा आरोप असून त्यासाठीचे सज्जड पुरावे ‘ईडी’कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या दाऊद इब्राहीमने १९९२मध्ये मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेत देशाविरुद्धचा सर्वात घातक दहशतवादी कट आखला, त्याच दाऊदशी नवाब मलिक यांची हातमिळवणी असल्याचा गंभीर आरोप ईडीकडून करण्यात येत असतानाही मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास विरोध करण्याच्या राष्ट्रवादीच्या लांगूलचनाच्या राजकारणाची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल. मलिक यांना मंत्रिपदावर ठेवण्याच्या दबावापुढे झुकून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण कणाहीन राजकारणी असल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर विधिमंडळात भ्रष्ट पोलीस आधिकारी सचिन वाझे याची पाठराखण केली होती. त्यानंतर खंडणीखोर अनिल देशमुख यांनाही पाठीशी घालण्याचे आटोकाट प्रयत्न केले. केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट, व्यभिचारी आणि लाचखोर, खंडणीखोर सहकाऱ्यांना वाचविताना ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या ठाकरी बाण्यास मूठमाती दिली. आता मतांच्या राजकारणासाठी देशद्रोही कारवायांतील सहभागाचा आरोप असलेल्या नवाब मलिक, या मंत्र्याकरिता आपला कणा झिजविण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे. स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे अनुयायी असलेल्या कडवट शिवसैनिकांच्या भावनांची थट्टा चालविली आहे, असा आरोपही उपाध्ये यांनी केला.

नवाब मलिक, या मंत्र्याने दाऊदच्या कारवायांसाठी बेनामी पद्धतीने मालमत्ता हडप करून गरीब कुटुंबांची फसवणूक केली असून हा पैसा दाऊदकडे वळविल्याचा आरोप आहे. दाऊदच्या दहशतवादी कारवायांना आर्थिक साह्य करण्याच्या अशा गुन्हेगारी व देशद्रोही कारवायांना सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने संरक्षण द्यावे हा महाराष्ट्राच्या कोट्यवधी नागरिकांच्या सुरक्षिततेशी सामूहिक खेळ आहे. अशा खेळात सहभागी होऊन राज्याच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या जनताविरोधी सरकारच्या निषेधार्थ भाजप संपूर्ण शक्तिनिशी लढा देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Continue reading

५००-१०००च्या जुन्या नोटा अजूनही बदलून मिळणार?

सोशल मीडियाच्या जमान्यात माहिती जितक्या वेगाने पसरते, तितक्याच वेगाने अफवा आणि फसवणुकीचे जाळेही विणले जाते. सध्या इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या (बंदी घातलेल्या) नोटांबाबत मोठा दावा...

‘होर्मुझ’च्या कोंडीमुळे जागतिक विमानसेवा धोक्यात

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. इराणने गेल्या दोन महिन्यांपासून 'होर्मुझची सामुद्रधुनी' रोखून धरल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाविरोधात कठोर लष्करी पावले उचलण्याचे संकेत दिले...

जॅनिक सिनरने मोडला पीट सॅम्प्रासचा ३२ वर्षांपूर्वीचा विक्रम

इटलीच्या स्टार टेनिसपटूने आणि सध्याचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जॅनिक सिनरने टेनिसविश्वात एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. त्याने एटीपी १००० मास्टर्स स्पर्धेत वर्षाची सुरुवात सलग २० विजयांनी करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. असा पराक्रम करणारा तो नोव्हाक...
Skip to content