Homeपब्लिक फिगरघोटाळे करण्यात ज्यांची...

घोटाळे करण्यात ज्यांची हयात गेली त्यांना त्रास होणारच!

ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली त्यांना काँक्रीटचे रस्ते होत आहेत याचा त्रास होणारच. कारण त्यामुळे ४० वर्षे रस्तेच बनवता येणार नाहीत. दरवर्षी डांबरी रस्ते बनवायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा हे आता बंद होणार आहे. त्यांची दुकानदारी बंद करण्याचे हे काम असल्यामुळे यांची ओरड चालली आहे. जनता त्यांना उत्तर देईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर पलटवार केला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे करत आहेत. त्यांचे नाव न घेता फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला. २०१८ साली सुमारे २०० रस्त्यांची चौकशी झाली होती. या चौकशीत या रस्त्यांना खालचा लेयरच टाकण्यात आला नव्हता असे आढळून आले. आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने यांची दुकानदारी बंद होणार आहे. इनका गोरखधंदा बंद होगा, यही उनका दर्द है… अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना सुनावले.

मी मुख्यमंत्री असताना एसटीपी योजनांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून आणल्या होत्या. परंतु टक्केवारी ठरली नाही म्हणून हे टेंडर काढू शकले नाहीत. आता आमचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई महापालिकेने याच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे या कामाचे क्रेडिट घेण्याचा यांना हक्कच नाही, असे ते म्हणाले. १५ वर्षे ज्यांना ते करता आले नाही ते एसटीपी प्रोजेक्ट आमच्या काळात झाले असे कसे म्हणू शकतात? तसे म्हणण्याचा यांना अधिकारच काय, असा सवालच फडणवीस यांनी केला. यांच्या काळात हाती घेण्यात आलेला ब्रीमस्टोवॅड प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे इतर प्रकल्पांवर हे काय बोलणार, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झोपेत बोलणारे हे लोक आहेत. मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. आणि आता त्याचे उद्घाटनही तेच करणार आहेत. त्यामुळे आमच्या काळात झालेल्या योजनांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत, या बोलण्यात काही तथ्य नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा मुंबईचा दौरा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला होईल. अपेक्षेपेक्षा जास्त मोठा जनसागर येथे उसळेल. त्यामुळे सर्व व्यवस्थेची खात्री करून घेण्यासाठी आम्ही आज आढावा घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content