Homeब्लॅक अँड व्हाईटपुन्हा सुरू झाला...

पुन्हा सुरू झाला ‘आयपीएल’चा धमाका!

ज्याप्रमाणे टेनिस खेळात विश्वातील कोट्यवधी टेनिसप्रेमी जून महिना उजाडला की जगप्रसिद्ध लंडनमध्ये सुरू होणाऱ्या मानाच्या विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेकडे डोळे लावून बसतात, तसाच काहीसा प्रकार क्रिकेट खेळातील जगातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींबाबत मार्च महिना उजाडला की होतो. क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी बक्षीस रक्कम असलेल्या “आयपीएल” चषक क्रिकेट स्पर्धेची चातकाप्रमाणे हे क्रिकेटरसिक वाट पाहत असतात. बीसीसीआयच्या या मानाच्या स्पर्धेला नुकतीच पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात झाली आहे. २००८ साली पहिल्यांदा सुरु झालेल्या या स्पर्धेचे यंदाचे १८वे वर्ष आहे. यंदा पुन्हा एकदा जेतेपदासाठी १० संघांमध्ये जोरदार मुकाबला होणार यात शंका नाही. यंदा जेतेपदाच्या शर्यतीत बलाढ्य चेन्नई, मुंबई, कोलकाता, हैद्राबाद, लखनौ, पंजाब, दिल्ली, गुजरात, बेंगळुरू, राजस्थान १० संघ आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी ५ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे तर कोलकाताने तीन वेळा बाजी मारली. २००८ साली झालेली पहिली स्पर्धा शेन वॉर्नच्या नेतृत्त्वाखाली राजस्थान संघाने जिंकली होती. परंतु त्यानंतर मात्र त्यांना जेतेपदानी हुलकावणीच दिली आहे. हैद्राबादच्या डेक्कन चार्जर्स, सनराइझर्स या दोन संघानी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले तर नवोदित गुजरात टायटन्स संघाने पदार्पणातच हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली २०२३ साली ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळवले होते.

सुरुवातीला ८ संघात होणारी स्पर्धा आता १० संघामध्ये होते. काही वर्षांपूर्वी लखनौ आणि गुजरात या दोन नव्या संघांचा प्रवेश या स्पर्धेत झाला. प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर प्रत्येकी १-१ सामना खेळतो. त्यामुळे दोन्ही संघांना आपल्या घरच्या मैदानावर खेळताना विजयाची समान संधी मिळते. पहिल्या टप्यात साखळी लढतीनंतर अव्वल जास्त गुण मिळविणारे ४ संघ स्पर्धेच्या प्लेऑफसाठी पात्र ठरतात. मग त्यातील २ संघ अंतिम फेरीत खेळतात. या स्पर्धेवर बलाढ्य चेत्रई संघाने आपल्या जबरदस्त खेळाची छाप पाडली. बरीच वर्षे या संघाचे नेतृत्त्व भारताचा माजी कर्णधार महेंद्र‌सिंग धोनीने केले होते. त्याने आपल्या कुशल नेतृत्त्वाच्या जोरावर चेन्नईला ५ जेतेपद मिळवून दिली. तसेच ४ वेळा हा संघ उपविजेता राहिला. यंदादेखील ४३ वर्षीय धोनी पुन्हा एकदा चेन्नईसाठी मैदानात उतरणार आहे. आता जरी पहिली जादू त्याच्या खेळात राहिली नसली तरी त्याचा अनुभव चेन्नईसाठी खूप मोलाचा आहे. चेन्नईप्रमाणेच या स्पर्धेतील दुसरा दादा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबईनेदेखील ५ वेळा या स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. विराट कोहली बरीच वर्षे नेतृत्त्व करत असलेल्या बेंगळुरू संघाला मात्र अद्याप एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही. त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच आहे. आता यंदा नविन कर्णधार असलेल्या रजत पाटीदारचा बेंगळुरू संघ आपल्या जेतेपदाच्या स्वप्नाची पूर्तता करतो का, हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

गतवर्षी अय्यरच्या नेतृत्त्वाखाली कोलकाता संघाने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. यंदा या संघाचे नेतृत्त्व करणारा मुंबईकर अजिंक्य रहाणे कोलकाता संघाला जेतेपदाचा चौकार मारून देतो का, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असेल. यंदाच्या स्पर्धेतील सर्वात महागडा भारतीय खेळाडू यष्टिरक्षक ऋषभ पंत ठरला. त्याला लखनौ संघाने तब्बल २७ कोटी रुपये देऊन आपल्या संघात दाखल केले. तोच या संघाचे नेतृत्त्व करणार आहे. गेल्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पंतला अंतिम भारतीय संघात जागा मिळाली नाही. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेतदेखील त्याला एकाही सामन्यात खेळवले नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धा पंतसाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने धावांचा पाऊस पाडला तर जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात पंतची निवड होऊ शकते. त्यासाठीच तो प्रयत्नशील असून पंत या स्पर्धेत लखनौ संघाच्या डावाची सुरुवात करणार आहे अशी चर्चा सुरू आहे. याअगोदर २०२४पर्यंत पंत दिल्ली संघातर्फे खेळला होता. गेली ३ वर्षे दिल्लीचे नेतृत्त्वदेखील हा धडाकेबाज फलंदाज यष्टिरक्षक करत होता.

यंदाचा हंगाम विदर्भ संघातर्फे खेळणाऱ्या करुण नायरने गाजवला. त्याने यंदाच्या मौसमात तब्बल ९ शतके फटकावून विदर्भाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. ४ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर तो यंदा पुन्हा आयपीएलमध्ये कमबॅक करत आहे. यंदा तो दिल्ली संघातर्फे खेळणार आहे. या अगोदर ३३ वर्षीय नायर राजस्थान, बेंगळुरू, पंजाबतर्फे या स्पर्धेत खेळला होता. ७६ आयपीएल लढतीत १४९६ धावा केल्या. त्यात १० अर्धशतकांचा समावेश आहे. ८३ धावा नाबाद ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. भारताचा माजी बुजूर्ग फिरकी गोलंदाज आर. अश्विन पुन्हा एकदा चेत्रईच्या पिवळ्या जर्सीत या स्पर्धेत खेळताना बघायला मिळेल. १० वर्षांनतर अश्विन परत चेन्नई संघात दाखल झाला आहे. २००७मध्ये अश्विनने चेन्नई संघातर्फेच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०१०, २०११च्या आयपीएलविजेत्या चेन्नई संघात अश्विनचा समावेश होता. चेन्नईला गुडबाय केल्यानंतर अश्विन या स्पर्धेत पंजाब, पुणे, दिल्ली, राजस्थान या संघातर्फे खेळून आता पुन्हा आपल्या पहिल्या चेन्नई संघात दाखल झाला आहे. ३८ वर्षीय अश्विनची ही १६वी आयपीएल स्पर्धा आहे. त्याने १२१ सामन्यात १२० बळी घेतले. २०१५मध्ये त्याने चेन्नई संघाला गुडबाय केले होते.

यंदा रजत पाटीदारप्रमाणेच अक्षर पटेल दिल्ली, शुभमन गिल, गुजरात प्रथमच या स्पर्धेत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आयपीएलची सुरुवात होण्यास झी एंटरटेन्नंमेंट एंटरप्रायझेस ही कंपनी खरी कारणीभूत ठरली. त्यांनी २००७मध्ये इंडियन क्रिकेट लीग सुरु केली. त्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेशचे संघ सहभागी झाले होते. या लीगला चांगला प्रतिसाद लाभला. हीच बाब बीसीसीआयला मात्र खटकली. आयसीसी आणि बीसीसीआयची मान्यता नसल्याने बीसीसीआयने या अनधिकृत लिगमध्ये खेळण्यास भारतीय खेळाडूंवर बंदी घातली. जे खेळाडू खेळतील त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगादेखील उगारण्याचा इशारा बीसीसीआयने दिला. त्यामुळेच आयसीएल लीगचा कालावधी फार लांबला नाही. याचाच फायदा बीसीसीआयचे तेव्हाचे उपाध्यक्ष ललित मोदी यांनी चाणाक्षपणे उचलला. त्यानी मग आयसीएलच्या धर्तीवर इंडियन प्रिमियर लिग सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले. २००८ साली पहिल्या लिगच्या उद्‌घाटनाची लढत नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाली आणि अंतिम सामनादेखील त्याच मैदानावर खेळवण्यात आला. अल्पावधीतच आयपीएलने क्रिकेटप्रेमींच्या मनावर गारुड केले. क्रिकेटविश्वात होणारा याच धर्तीवरील लिगना आयपीएलने बरेच मागे टाकले. पाहता पाहता क्रिकेटविश्वातील आयपीएल ही एक अव्वल स्पर्धा झाली.

आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआयला सोन्याची अंडी देणारी कोंबडीच सापडली. त्यामुळे बीसीसीआयला प्रचंड महसूल मिळू लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला बीसीसीआयकडूनच सर्वाधिक महसुल मिळत असल्याने बीसीसीआय म्हणेल तीच पूर्व दिशा असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे लगेचच आयसीसीने या स्पर्धेला मान्यता दिली. तसेच या स्पर्धेच्या दोन महिन्यांच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी स्पर्धा अथवा लीग इतरत्र होणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळेच पाकिस्तान वगळता इतर सर्वच देशातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास नेहमीच उत्सुक असतात. कारण रातोरात ते मालामाल होतात. पहिल्या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली होती. मुंबई, चेन्नई हे संघ या स्पर्धेतील ताकदवान संघ म्हणून ओळखले जातात. परंतु गेल्या वर्षी या दोन्ही संघांची कामगिरी खूपच खराब झाली होती. गुणतालिकेत मुंबई संघ शेवटच्या स्थानावर होता. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली प्रथम खेळणाऱ्या या स्पर्धेत मुंबईला अवघे ४ विजय मिळवता आले होते. चेन्नई संघाला प्लेऑफमध्येदेखील स्थान मिळवता आले नव्हते. आता यंदाच्या या स्पर्धेत या दोन संघांची कामगिरी सुधारते का, हे बघणे महत्त्वाचे ठरेल. रोहिल शर्माचे कर्णधारपद काढून ते हार्दिक पंड्याकडे दिल्यामुळे मुंबईकर क्रिकेटप्रेमी कमालीचे नाराज होते. पंड्याची प्रत्येक सामन्यात हुर्यो उडवली जात होती. यंदा भारताने नुकतीच चॅम्पियन्स स्पर्धा आणि त्याअगोदर टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्यात हार्दिक पंड्याचे योगदान मोठे होते. आता तोच फॉर्म हार्दिक आयपीएलमध्ये दाखवतो का, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष असेल. यंदाच्या या स्पर्धेत कुठला संघ बाजी मारणार याचा फैसला मेमध्ये होईल. तेव्हा आता दोन महिने भारतीय क्रिकेटवर्तुळात सर्वत्र आयपीएल सामन्यांचीच चर्चा रंगेल..

आयपीएलमधील विक्रमः

चेन्नई, मुंबईने प्रत्येकी ५ वेळा स्पर्धा जिंकली.

कोलकाता संघाच्या सुनील नारायणने मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कार सर्वात जास्त ३ वेळा मिळवला.

विराट कोहलीने एकाच मोसमात २०१६मध्ये सर्वाधिक ९७३ धावा केल्या.

३ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या कोलकाताने २०१४-१५मध्ये सलग १० लढती जिंकल्या.

बेंगळुरूच्या गेलने २०१३मध्ये पुण्याविरुद्ध अवघ्या ३० चेंडूत सर्वात वेगवान शतक फटकावले.

राजस्थानच्या यशस्वी जयस्वालने २०२३मध्ये कोलकाताविरुद्ध अवघ्या १३ चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक काढले होते.

मुंबईच्या अल्झारी जोसेफने आपल्या पहिल्याच सामन्यात २००८च्या हैद्राबादविरुद्धच्या लढतीत अवघ्या १२ धावात ६ बळी घेऊन पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.

अमित मिश्राने सर्वाधिक ३ हॅटट्रिकची नोंद केली.

२०१३च्या लढतीत बेंगळुरूच्या गेलने पुण्याविरुद्धच्या सामन्यात १७५ धावांची केलेली खेळी आजवरची सर्वात मोठी खेळी.

यजुवेंद्र चहलच्या नावे सर्वाधिक २०५ बळींची नोंद.

२०१६च्या स्पर्धेत बेंगळुरूच्या विराट-डिविलियर्स जोडीने गुजरातविरुद्धच्या सामन्यात २२९ धावांची स्पर्धेतील सर्वात मोठी भागिदारी नोंदवली.

गेल्या स्पर्धेत हैद्राबादने बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात ३ बाद २८७ धावा ही सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली.

Continue reading

आय.पी.एल. स्पर्धेत पंतचा ‘फ्लॉप शो’!

यंदाच्या आय.पी.एल. चषक क्रिकेट स्पर्धेची जेव्हा बोली लागली, तेव्हा नवख्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला तब्बल २७ कोटी रुपये बोली लावून आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. आय.पी.एल.च्या इतिहासात पंत आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तेव्हाच...

नावाप्रमाणेच ‘समर्थ’चे देखणे, शिस्तबद्ध शिबीर संपन्न

यंदा आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या मुंबईतल्या दादर, शिवाजीपार्क येथील प्रख्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराचे सलग ५१वे '१० दिवसांचे वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबिर' उत्साही वातावरणात नुकतेच संपन्न झाले. "समर्थ" या नावाला साजेसे असेच शिस्तबद्ध आणि देखणे आयोजन या शिबिराचे...

यशस्वी संघनायक रोहित शर्माची निवृत्ती!

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर गतवर्षी अमेरिकेत झालेली टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकली होती. या जेतेपदानंतर लगेचच रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांना विराम द्यायचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेली मानाची चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धादेखील रोहितच्या नेतृत्त्वाखाली...
Skip to content