Homeटॉप स्टोरीउद्यापासून अवकाळी पावसाचा...

उद्यापासून अवकाळी पावसाचा जोर ओसरणार!

आयएमडी च्या पुणे आणि नागपूर विभागाने स्वतंत्रपणे वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्यापासून पुढच्या पाच दिवसांत अवकाळी पावसाचा जोर ओसरणार आहे. पुढील 5 दिवसांचा (4 एप्रिल – 8 एप्रिल) अंदाज पुढीलप्रमाणेः

4 एप्रिल: पावसाचा जोर हळूहळू ओसरण्यास सुरुवात होईल, मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पाऊस सुरूच राहील.

5 आणि 6 एप्रिल: विदर्भात ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे व्हायला सुरुवात होईल.

7 आणि 8 एप्रिल: राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे तापमानात पुन्हा 2-3 अंशांनी वाढ होऊ शकते.

हवामान इशारा: महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना पावसाचा तडाखा; ‘गारपिटी’सह वादळी वाऱ्याचे अनुमान

आज 3 एप्रिलला महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा कायम आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या हवामानात मोठे बदल झाले असून, एकूण 20 जिल्ह्यांवर पावसाचे सावट आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा (हेलस्ट्रॉम) अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अवकाळी

जिल्हानिहाय अलर्ट आणि स्थिती

ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. नाशिक, पुणे, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येथे ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहून काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येलो अलर्ट (Yellow Alert)

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

मुंबई आणि कोकण किनारपट्टी

मुंबईत गुरुवारी रात्री काही भागात पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आजही हलक्या पावसाची शक्यता आहे. पालघर आणि सिंधुदुर्गमध्येही हवामान ढगाळ राहील. पश्चिम विक्षोपामुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) हे बदल झाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांसाठी आवाहन

काढणीला आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषतः द्राक्ष, आंबा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पावसाच्या सावटाखाली खबरदारी घ्यावी.

पुढील 5 दिवसात पावसाची तीव्रता कमी होत असतानाच अधूनमधून वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी झाडाखाली किंवा पत्राच्या शेडखाली आश्रय घेणे टाळावे.

Continue reading

टिटवीच्या अंड्यांमध्ये दडलेय पावसाचे रहस्य!

देशातील काही भागात शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, टिटवीची अंडी मान्सूनच्या आगमनाचे आणि तीव्रतेचे अचूक संकेत देतात. टिटवीने दिलेल्या अंड्यांची संख्या, अंडी घालण्याची जागा यानुसार पारंपरिकरित्या, पिढ्या न् पिढ्या देशाच्या काही भागात मान्सूनच्या पावसाचे ठोकताळे आणि अंदाज बांधले जातात. अंड्यांची...

आता देशातच बनणार एमआरआय मशिन, चाचण्यांचे दर होणार ७०%पर्यंत कमी!

भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बेंगळुरूस्थित 'व्होक्सेल ग्रिड्स' या कंपनीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय...

आठवलेंची ‘आरपीआय’ उत्तर प्रदेशात लढवणार विधानसभा निवडणूक!

उत्तर प्रदेशातील आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ने राज्यात आपली ताकद आजमावण्याची तयारी पूर्ण केली आहे. भाजपासोबतच्या महायुतीत (एनडीए) राहून आरपीआयने उत्तर प्रदेशात २५...
Skip to content