मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये ६५ लाख रुपये खर्चून विहार तलाव बांधण्यात आला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव आहे.
२०२४ मध्ये हाच तलाव २५ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता, तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच २०२३मध्ये २६ जुलैला विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव, हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा, तुळशी तलाव सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
विहार तलावाबाबत संक्षिप्त माहिती-
मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
या तलावाचे बांधकाम १८५९मध्ये पूर्ण झाले.
या तलावाच्या बांधकामासाठी तेव्हा सुमारे ६५.५ लाख रुपये खर्च आला होता.
या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ जवळजवळ ७.२६ चौरस किलोमीटर असते.
तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा २७,६९८ दशलक्ष लीटर अर्थात २,७६९.८० कोटी लिटर असतो.
हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर त्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.

