Homeमुंबई स्पेशलघ्या वदवून राहुल...

घ्या वदवून राहुल गांधींकडून माफी!

ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे आणि याच शहरात त्यांचा मुलगा, बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, त्यांच्यासमोरच लाचारी करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना उद्धव ठाकरे माफी मागायला लावणार का, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी जमलेले किती नेते बाळासाहेबांच्या स्मारकस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहणार, असे सवाल आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर तसेच मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

लालुप्रसाद यादव, समाजवादी पक्ष, काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसत आहेत. हा बाळासाहेबांच्या विचारांविरोधात दगा आहे. INDIA आघाडीच्या नेत्यांनी बैठकीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना खा. गजानन कीर्तिकर यांनी हे सर्व पक्ष घराणेशाहीचा परिपाक असल्याचा आरोप केला. या आघाडीत सामील झालेल्या पक्षांपैकी १७ पक्ष घराणेशाही पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना देशाच्या विकासाची काहीच पडलेली नाही, असे ते म्हणाले.

राहुल

उद्धव काँग्रेसच्या ताटखालचं मांजर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेला विरोध केला. एक वेळ पक्ष विसर्जित करेन, पण काँग्रेससोबत जाणार नाही, अशी भूमिका आयुष्यभर घेतली. उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर बनले आहेत. स्वा. सावरकर यांचा उल्लेख माफीवीर अशा हेटाळणीने करणाऱ्या राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत त्याचं स्वागत आदित्य ठाकरेंनी करावं, हे दुर्दैवी आहे. कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या समाजवादी पक्षासोबत, राम मंदिरासाठी निघालेली रथयात्रा अडवून अडवाणींना अटक करणाऱ्या लालुप्रसाद यादवांसोबत आणि उद्दाम व्यक्तिमत्त्वाच्या राहुल गांधींसोबत उद्धव यांनी बसावं हे वाईट आहे, अशी टीकाही खा. कीर्तिकर यांनी केली.

… तर उद्धव यांनी युती तोडली असती?

उद्धव ठाकरे यांनी केवळ स्वत:ला मुख्यमंत्रीपद मिळावं, म्हणून या सर्व कोलांटउड्या मारल्या. भाजपने त्यांना पाच वर्षं मुख्यमंत्रीपद देऊ केलं असतं, तर त्यांनी युती तोडली असती का, या प्रश्नाचं उत्तर उद्धव यांनी द्यावं. निवडणुकीनंतर उद्धव मोदींना भेटले होते. आपल्या युतीचा विजय झाल्याने आपलीच सत्ता येईल, एवढी बोलणी झाली होती. पण नंतर मुख्यमंत्रीपदामुळे त्यांची मति फिरली, असा घणाघात केसरकर यांनी केला. २०१४मध्ये न मागता शरद पवार यांनी भाजपला स्थिर सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिला होता. आताही पवार साहेबांनी स्थिर सरकारासाठी आमच्यासोबतच यावं, असंही ते म्हणाले.

राहुल

उद्धव यांना आव्हान

मुंबईत सत्तेच्या मिषाने एकत्र आलेल्या या पक्षांपैकी अनेकांनी बाळासाहेबांचा सतत विरोधच केला. उद्धवना या सर्वांचा एवढाच पुळका असेल, तर त्यांनी या सर्वांना घेऊन बाळासाहेबांच्या स्मारकावर जावं. तिथे जाऊन या सर्वांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करायला लावावं, असं खुलं आव्हान शिवसेना पक्षातर्फे दीपक केसरकर यांनी दिलं.

नव्या बाटलीत जुनी दारू

काँग्रेसने UPAच्या काळात अमाप भ्रष्टाचार केला. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर त्यांचा हा भ्रष्टाचार उघडा पडला. त्यामुळे UPA हे नाव घेऊन लोकांसमोर गेलो, तर लोक नाकारतील, ही भीती काँग्रेसला वाटते. त्यामुळे त्यांनी INDIA हे देशाचं पवित्र नाव धारण करत ही भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधली आहे. पण नाव बदललं, तरी आतली माणसं तीच आहेत. हे म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू भरण्यासारखं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

राहुल

जनतेने तुम्हाला नाकारलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरू झाली आणि त्यात तुमच्यापैकी काहींची चौकशी झाली, तर ती लोकशाहीविरोधी कारवाई नसते. देशात लोकशाही नसती, तर इतर राज्यांमध्ये तुमची सरकारं कशी आली असती, असा सवालही दीपक केसरकर यांनी विचारला. देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. सामान्य माणूस सुखी होत आहे आणि तुम्हाला आता लोकशाहीचा पुळका आला आहे. पण देशाने, देशातल्या लोकांनी तुमच्या भ्रष्ट आघाडीला नाकारलं आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.

मोदीच सक्षम नेतृत्त्व

हे विरोधक सत्तेत आल्यावर चीनला अरुणाचल प्रदेशातून मागे ढकलण्याची भाषा करतात. पण ते त्यांना शक्य नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याएवढं सक्षम नेतृत्त्व या लोकांकडे नाही. मोदींच्या काळात देशाने दैदिप्यमान प्रगती केली आहे. पूर्वी आपल्या देशात शस्त्रास्त्र तयार होत नव्हती. आता आपण त्या आघाडीवरही सक्षम झालो आहोत. आज जगभरातील देश भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. या गुंतवणुकीतून रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यामुळेच या विरोधकांना रोजगाराचा मुद्दा आता आठवला, असंही ते म्हणाले.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content