Homeपब्लिक फिगरअचानक उष्मा वाढल्याने...

अचानक उष्मा वाढल्याने श्रीसेवकांचा मृत्यू!

नवी मुंबईतल्या खारघर येथील महाराष्ट्र भूषण देण्याच्या कार्यक्रमाची वेळ सर्वांच्या सोयीसाठी सकाळची ठरवण्यात आली होती. मात्र दोन दिवसात अचानक उष्मा वाढला आणि परिणामी उष्माघातामुळे 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. रुग्णवाहिका तैनात होत्या. पाण्याचे टँकरची सोय होती. नळ बसवण्यात आले होते. वैद्यकीय पथके तयार ठेवण्यात आली होती. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यावा असे आमचे मत होते. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर श्रीसेवकांची जाण्याची गैरसोय होईल म्हणून हा कार्यक्रम सकाळच्या वेळेत घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे सत्कारमूर्ती डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी चर्चा केली. लोकांच्या सोयीसाठी तसेच इतर मान्यवरांच्या दृष्टिकोनातून सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले, असे त्यांनी सांगितले.

आपण स्वतः पाच दिवस तेथे होतो. ठाण्याचे, पालघरचे पालकमंत्री तेथे लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा स्वतः तिथे जाऊन आढावा घेतला होता. एक आठवड्यापूर्वी कार्यक्रम निश्चित करताना हवामान खात्याचा असा कोणताही उष्णतावाढीचा धोका मिळालेला नव्हता. मात्र, ऐनवेळी अचानक उष्मा वाढला आणि त्याचा काही श्रीसेवकांना त्रास झाला. त्यात 13 जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडून सरकारवर टीका

दरम्यान, आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा कार्यक्रम राजभवनावर घ्यायला हवा होता असे सांगितले. केवळ राजकीय दृष्टीने इतक्या लोकांना येथे बोलावण्यात आले, अशी टिपण्णी त्यांनी केली. हा कार्यक्रम संध्याकाळी का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या लोकांची विचारपूस केली. त्यानंतर बोलताना त्यांनी आयोजक सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना अत्यंत वेदनादायी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. हा कार्यक्रम सरकारचा होता. त्यामुळे लोकांची व्यवस्था करणे ही सरकारची जबाबदारी होती. पण ती केली गेली नाही. त्यामुळे या घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content