खरंतर अत्यन्त व्यथित अंतःकरणाने आज लिहीत आहे. राज्यपालांवर लिहिण्याचे प्रसंग फार कमी येतात. राज्यपाल शपथ घेतात तेव्हा आणि त्यांची राज्यातून बदली होते तेव्हा! मागील राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याला काहीसे अपवाद ठरतील. अन्यथा राज्यपाल हे कधीच टीका-टिप्पणीचा विषय होत नाहीत. पण कधीकधी नियमालाही अपवाद करावा लागतो. नाहीतर 11व्या लोकसभेपासून ते 2014पर्यंत लोकसभेचे खासदारपद सलगपणे भूषविलेल्या खासदाराला मी बापुडा काय बोलणार? त्यातही अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण व वन खात्याची जबादारी समर्थपणे पेललेल्या राजकीय नेत्याबद्दल बोलणे म्हणजे शांतम पापमच!! पण कालपरवा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांशी ‘शाळा’ कार्यक्रमात मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलाविषयी त्यांनी जी सूचना केली ती काहीशी न रुचणारीच होती, इतकेच.
आधीच महाराष्ट्र सरकार मुंबई तसेच इतर मोठ्या शहरांमधील प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कार्यालयीन वेळा बदलाबाबत खलबते करत आहेच! वाहतूक पोलिसांचा ताफा वाढवण्याऐवजी तसेच वाहतुकीला शिस्त लावण्याचे बाजूला ठेवून जेव्हा कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत सरकार विचार करू शकते, या विचारलाच साष्टांग नमस्कार घातला पाहिजे. आणि आता शाळांच्या वेळात बदल करण्याची खुद्द महामहिम यांचीच सूचना!! आज सकाळी कुठल्यातरी वृत्तसंस्थेने बातमीही दिली की राज्यपालांच्या सूचनेवर सरकारचा गांभीर्याने विचार!! झाले म्हणजे राज्यपालांनी सूचना काय केली सरकार एकदम गंभीरच झाले!! भाडेवाढ़, महागाई, पेट्रोलचे वाढते दर, आनंदशिधा अजून मिळालेला नाही, आदी विषषयावर गंभीर व्हायला सरकारकडे वेळ नाही आणि शाळेच्या वेळांबाबत लगेचच गंभीर विचार!!!
महामहिम राज्यपालांनी शाळेतील मुलांच्या झोपेबाबत काळजी व्यक्त केलेली आहे ती रास्तच आहे. परंतु मुंबई, ठाणे कल्याण तसेच इतर मोठ्या शहरातील परिसरात हे जरा कठीणच दिसते. कारण संध्यकाळी पालकांना नोकरी वा कामावरून घरी परतयलाचा रात्रीचे साडेआठ ते नऊ वाजतातच. मग जेवण वगैरे करून झोपायला रात्रीचे 11 वाजतात. मग मुले सकाळी लवकर कशी उठणार? जवळपास डोळे चोळीतच आणि काहीशी पेंगतच ही मुले स्कूल बसमध्ये बसतात. बरे तर ही बस तरी शाळेत लवकर पोहोचते का? तर नाहीच. कारण मुलांना विविध ठिकाणांहून घेऊन सुमारे अडीच तासाने ही बस धापा टाकीत शाळेत पोहोचते. रस्त्यात वाटेत प्रचंड वाहतूककोंडी तर दररोजच असते. आता मला सांगा मुलांची झोप पूर्ण कशी होणार?? परत शाळेतून घरी परततानाही सुमारे दोन-अडीच तासांची प्रदक्षिणा होतेच. मग मुले काय करतात? घरात येताच दप्तर अक्षरशः भिरकावून देतात. तोंडात काही घास कोंबतात आणि बेडवर झोकून देतात.
मुलांची झोप पूर्ण झाली पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे. परंतु सध्या आपण काही आदर्श व्यवस्थेत राहत नाही. झोप पूर्ण होऊ द्यायची असेल तर प्रथम संपूर्ण व्यवस्थाच बदलायला हवी. पूर्वीही लवकर न झोपण्यासाठी प्रलोभने नव्हती, असे नाही. पण सध्या ती बरीच आहेत. खरं तर नको इतकी आहेत. पण ही प्रलोभने सरकारच्या नवीन आर्थिक धोरणमुळेच निर्माण झालेली आहेत. मार्केटिंगमुळे या सर्व वस्तू मुलांना सहज दिसतात व ते हट्ट करतात व सुजाण आईबापांना हे हट्ट पुरवावे लागतात. त्यामुळे सर्वांच्या झोपेचे खोबरे होते.

खरेतर शाळांच्या वेळांबाबत शिक्षणक्षेत्रातील नामवंतांनी पुढे येऊन आपआपली मते मांडली पाहिजेत. पण गेल्या अनेक वर्षांची पद्धत एका सूचनेमुळे मोडीत काढायची याला काही अर्थ नाही. मुळात समजा.. शाळांच्या वेळेत बदल करून मुलांची झोप पूर्ण होईलच अशी हमी कोण देणार? कारण रविवार वा सुटीच्या दिवशी सकाळी 11पर्यंतही कोणी उठायचे नाव घेत नाही. महत्त्वाचे म्हणजे अगदी ऋषीमुनींच्या काळापासून सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचे धडे गिरवले गेले आहेत. (हे जुने उदाहरण सध्याच्या बदलाला डोळ्यासमोर ठेवूनच दिले आहे.) त्यामुळे अनंतकाळापासून मुलांची म्हणचेच विद्यार्थ्यांची झोपमोड होतच आहे. असो.. वेळेचे काय करायचे ते राज्यपाल, मुख्यमंत्री + दोघे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री आपल्या अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह ठरवतीलच!!
केसरकरांची सेलिब्रिटी शाळा
याच कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरही बोलते झाले. माणूस थोडकेच पण मुद्देसूद बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. (सिंधुदुर्गातील आहे.) तसाच धडाकेबाज आणि भिडणाराही आहे. उगाच नाही.. सूरतला जाण्याआधी झालेल्या एकत्रित शिवसेनेच्या बैठकीतून बाहेर आल्यावर संतप्त शिवसैनिकांना तेवढ्याच मोठ्या आवाजात ओरडून सांगितले होते ‘मी एका दादाला घाबरवलंय. माझ्या वाटेस जाऊ नका. घुसवूनच टाकीन!!!!’ ऐकताच सर्वजण दूर पळाले होते. असो. पण मंत्र्यानो, ते सेलिब्रिटी काय ते डोक्यात घुसले नाय हो!
मला एकदम एक जुनी आठवण झाली. अनेक वर्षांपूर्वी शिक्षणमंत्र्याच्या उपस्थितीत असाच एक कार्यक्रम झाला होता. कारण होते आपले प्रसिद्ध कवी भा. रा. तांबे यांच्याविषयीचा. (तेच ते ‘जन पळभर म्हणतील हाय हाय.. आणि चाफा बोलेना..’ या अजरामर गाण्यांचे कवी.) उत्साहाच्या भरात तेव्हा शिक्षणमंत्री म्हणाले होते की ‘प्रत्येक तांबे यांच्यासारखे कवी निर्माण झाले पाहिजेत.’ झाले.. हे एक वाक्य मराठी पत्रकारितेतील भीष्माचार्य गोविंद तळवळकर यांना बस्स झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी “शिक्षणमंत्र्यांचा तांब्यांचा कारखाना” असा अग्रलेख लिहून त्या शिक्षणमंत्र्यांना नमोहरम केले. चांगल्या सेलिब्रिटीसाठी काही वेगळ्या शाळांची गरज नाही. किमान शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या-त्या विषयातील नैपुण्य मिळवण्यासाठी अनेक तज्ज्ञमंडळीची गुरुकुले आहेत. त्यांच्या सोयीसुविधा वाढवून द्या. लालफितीत त्यांचे अनुदान अडवून ठेवू नका. खरंतर सरकारने अशा फंदात पडू नये! “Education is the passport to the future, for tomorrow belongs to those who prepare for it today.” असं म्हणतात. असं शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, हीच दोन्ही हात जोडून विनंती…