Homeटॉप स्टोरीमहाविकास आघाडीमध्ये नव्याने...

महाविकास आघाडीमध्ये नव्याने धुसफूस!

राज्यात काँग्रेसकडे असलेले विधानसभा अध्यक्षपद रिक्त होताच आता त्या पदावर दावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या असून यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीत नव्याने धुसफूस सुरू झाली आहे.

काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राज्य मंत्रिमंडळातही आहेत. त्याशिवाय ते काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेतेही आहेत. तीन-तीन पदांची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे थोरात काँग्रेसच्या पक्षवाढीला फारसे उपयुक्त ठरणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या श्रेष्ठींनी नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध चालू केला. यासाठी विदर्भातले आक्रमक व बहुजन समाजाचे नेते नाना पटोले यांचे नाव श्रेष्ठींनी निश्चित केल्याचे कळते. त्यानंतर त्यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, यानंतर संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतल असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पदावर अप्रत्यक्ष दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत नव्याने धुसफूस निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचे होते. आता ते खुले झाले आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असे शरद पवार म्हणाल्याचे कळते.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असल्यामुळे ते राजीनामा देतील, अशी चर्चा होतीच. त्यानंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाने मला आदेश दिला. त्याचे मी पालन केले. पक्षाने सांगितल्याप्रमाणे मी राजीनामा दिला. मी मंत्रीपद किंवा कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून आपल्याला पक्षाकडून काहीही सांगितलेले नाही. पक्ष आदेश देईल, त्याचे मी पालन करेन, असे ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना मी त्या खुर्चीला जनतेची खुर्ची बनवली याचा मला अभिमान आहे. तुम्ही राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, हा निर्णय तीन पक्षाचे नेते घेतील. तीन पक्षांचे प्रमुख या संदर्भात बैठक करुन निर्णय घेतील. विधानसभा अध्यक्ष निवडण्याची निवडणूकप्रक्रिया अधिवेशनाच्या काळातच होते.

नाना पटोले यांनी काँग्रेसपासून राजकारणाची सुरुवात केली. पण २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पुन्हा भाजपा नेत्यांवर दुगाण्या झाडत ते काँग्रेसमध्ये परतले. २०१९ साली ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आणि पुढे ते विधानसभेचे अध्यक्षही झाले होते.

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content