Homeमुंबई स्पेशलमुंबईत ‘वन भारत...

मुंबईत ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

भारतातील हातमाग साडी संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने काल, रविवारी सकाळी मुंबई येथील एमएमआरडीए ग्राउंड, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, येथे ‘वन भारत सारी वॉकेथॉन’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सारी

केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल, केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश आणि खासदार पूनम महाजन यांनी या वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. महिलांनी त्यांची शक्ती दाखवण्याची ही वेळ आहे, हीच वेळ आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे असे सांगत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गोयल यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

अशा उपक्रमांच्या आयोजनामुळे “वोकल फॉर लोकल” या संकल्पनेला समर्थन मिळते त्याचबरोबर महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता वाढवून आणि त्यांना निरोगी जीवन जगण्यास प्रवृत्त करण्यासाठी मदत मिळते असं वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यावेळी म्हणाल्या.

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे, जिथे स्त्रीत्वाची भावना स्त्रीच्या अस्तित्त्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये खोलवर रुजलेली आहे. विविध क्षेत्रातल्या महिलांचा, त्यांच्या विशिष्ट प्रादेशिक शैलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साड्या नेसून इथे उपस्थित आहेत त्यातून विविधतेचे सुंदर चित्र तयार झाले आहे आणि ते ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला समर्थन देणारे आहे, असे जरदोश यांनी सांगितले.

आजच्या या उपक्रमाने केवळ मुंबईच्या चैतन्यपूर्ण अभिव्यक्तीला प्रतिध्वनित केले नाही तर वॉकथॉनला साडीच्या वैशिष्ट्य पूर्ण सांस्कृतिक पैलूंने जोडले आहे असे या वॉकथॉनच्या एक आयोजक खासदार पूनम महाजन यांनी सांगितले. आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक घटकांना एकत्रित आणून, ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ ने एक प्रभावी चित्र निर्माण केले आहे, ज्यामधून भारताचे वैशिष्ट्य असलेल्या विविधतेतील एकता देखील साजरी केली जात आहे आणि त्याचबरोबर हातमाग कारागिरीच्या चिरस्थायी वारशाला प्रोत्साहन मिळाले आहे,असे त्या म्हणाल्या.

सांस्कृतिक विविधता आणि सक्षमीकरणाच्या आजच्या उपक्रमात, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी, रूपा गांगुली, गायिका फाल्गुनी पाठक डिझायनर अनिता डोंगरे, नीता लुल्ला, शायना एन सी यांच्यासह, दूरचित्रवाणीवरील तारका, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय महिला, उद्योग, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील प्रभावशाली महिलासह 5000हून अधिक महिला पारंपारिक हातमाग साड्यांबरोबर आधुनिक प्रकारच्या साड्या अभिनव पद्धतीने नेसून या वॉकेथॉनमध्ये उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

भारतातील सर्वात मोठी ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ ठरलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच देशभरातील महिलांच्या साड्या परिधान करण्याच्या विशिष्ट पद्धतींचा परिचय इतरांना करून देणे, भारताची “विविधतेतील एकता असलेला देश’ ही प्रतिमा अधोरेखित करणे हा आहे. यापूर्वी सूरतमध्ये अशा साडी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

हातमाग क्षेत्र:

हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, शिवाय मोठ्या संख्येने कारागिरांना, विशेष करून महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील हातमाग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक लोक गुंतलेले आहेत. हातमागावर साडी विणण्याच्या कलेशी पारंपारिक मूल्ये जोडलेली आहेत आणि प्रत्येक प्रदेशात वैशिष्ट्यपूर्ण साड्यांचे प्रकार प्रचलित आहेत.

पैठणी, कोटपाड, कोटा डोरिया, टंगाईल, पोचमपल्ली, कांचीपुरम, थिरुभुवनम, जामदानी, संतीपुरी, चंदेरी, माहेश्वरी, पटोला, मोइरांगफी, बनारसी ब्रोकेड, तनछोई, भागलपुरी सिल्क, बावन बुटी, पश्मिना साडी असे काही साड्यांचे प्रकार आहेत जे आपल्या कला, विणकाम, डिझाईन्स आणि पारंपारिक आकृतिबंधांसह जगभराला आकर्षित करतात.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content