Homeकल्चर +‘जय भीम-२’ लवकरच...

‘जय भीम-२’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

‘जय भीम’ला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करताना, या चित्रपटाचे सहनिर्माते राजसेकर के. यांनी ‘जय भीम’चा पुढचा भागाचे म्हणजेच सिक्वेलचे काम सुरू झाल्याचे जाहीर केले.

53व्या इफ्फीदरम्यान पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या टेबल टॉक्समध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अभिनेता सूर्या यांच्या आगराम फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या स्थापनेमागे दिग्दर्शक ज्ञानवेल हेच मार्गदर्शक आहेत यावर प्रकाश टाकत, सहनिर्माते राजसेकर म्हणाले की, पत्रकार आणि लेखक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे ज्ञानवेल अनेक वर्षांपासून दीनदुबळ्यांच्या कामाशी निगडीत होते. सूर्याशी आम्ही चित्रपटाच्या निर्मितीसाठी आग्रह केला होता होता, पण त्याने चित्रपटाची कथा ऐकली, आणि आम्हाला सांगितले की, त्याला या चित्रपटात काम करायचे आहे.

चित्रपटासाठी इरुला जमातीतील कलाकारांसह कलाकारांनी घेतलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले की, अभिनेते मणिकंदन आणि लिजोमोल जोस यांनी राजकन्नू आणि सेंगेनीची भूमिका केली आहे. ते या व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी ते आदिवासी समुदायासोबत 45 दिवस राहिले.

आठ दिवस सिनेरसिक प्रेक्षक आणि प्रतिनिधींना भरभरून आनंद देणाऱ्या 53व्या इफ्फीचा शेवटचा दिवसही, त्यांना नेहमीचा निरोप देणारा नाही, तर ज्याच्यापासून प्रेरणा घेता येईल अशा भावनेने ओतप्रोत भरलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा ठरला. आमच्यावर विश्वास नाही? मात्र, ‘जय भीम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, ज्यांनी आपल्या चित्रपटातून, देशातील कायद्याची अंमलबजावणी आणि न्यायव्यवस्था यातील त्रुटींवर मर्मभेदक धाडसी भाष्य केले, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा, तर ‘जय भीम’ हे केवळ दोन शब्द नाहीत, तर ती एक भावना आहे; प्रेरणा आहे.

आपला तामिळ चित्रपट ‘जय भीम’विषयी दिग्दर्शक था. से. ज्ञानवेल यांनी हे मत व्यक्त केले. हा चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा आहे. जे योग्य आहे, त्याच्यासाठी बोलण्याची, त्याच्या बाजूने उभे राहण्याची प्रेरणा आणि हिंमत देणारा आहे.

आपल्या चित्रपटासाठी ‘जय भीम’ हे शीर्षक का निवडले याविषयी बोलताना, ज्ञानवेल यांनी सांगितले की, माझ्यासाठी ‘जय भीम’ हा शब्द, दलित, शोषित आणि उपेक्षित समाजासाठीचा प्रतिशब्द आहे, असा समाज ज्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायम उभे राहिले.

समाजाच्या सर्व स्तरातून ह्या चित्रपटाला मिळालेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आनंददायी आहे. सगळ्यांना हा चित्रपट यासाठी आवडला, कारण त्यातला विषय सार्वत्रिक आहे. जय भीमनंतर, जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या, आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे पीडितांवर झालेल्या अन्यायाच्या अनेक कथा मी ऐकल्या. या चित्रपटाच्या माध्यमातून, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपले संविधान हेच आपले खरे शस्त्र आहे, हे दाखवायचे होते, असेही दिग्दर्शकांनी सांगितले.

‘जय भीम’ चित्रपटात, राजकन्नू आणि सेनगेनी या गरीब आदिवासी जोडप्याचे जीवन आणि संघर्ष चित्रित करण्यात आला आहे. उच्चवर्णीय लोकांच्या सेवेत असलेल्या, त्यांच्यासाठी हलकी कामे करणाऱ्या या जोडप्याला ज्या ज्वलंत समस्यांचा सामना करावा लागला, त्याचं तसंच्या तसं, वास्तव चित्रण यात करण्यात आलं आहे. जेव्हा या चित्रपटात, राजकन्नूला त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी अटक केली जाते त्या प्रसंगापासून चित्रपट नेहमीच्या चित्रपट शैलीपासून, वेगळे वळण घेतो. सत्तेत असलेल्या लोकांकडून वंचितांना होणारा अत्याचार आणि अपमान, त्यांना सोसावी लागणारी अवहेलना, याचे विदारक पण प्रभावी चित्रण यात दाखवण्यात आले आहे.

चित्रपट हा सामाजिक बदलाचे प्रभावी साधन कसा होऊ शकतो, हे सांगताना ज्ञानवेल म्हणाले की, जरी या चित्रपटात, वंचित, दुर्बल घटकांसाठी काम करणारी, त्यांच्या मदतीला धावून जाणारी व्यक्तिरेखा असली, तरीही, हा चित्रपट असा संदेश देतो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, आपल्या दिलेली शिक्षण घेण्याची शिकवण हेच आपल्याला सक्षम करणारे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. सिनेमासारखे खऱ्या आयुष्यात कोणी ‘हिरो’ आपल्या मदतीला येत नाहीत, त्यामुळे आपल्यालाच आपले नायक बनावे लागते. शिक्षण घेऊन सक्षम व्हावे लागते. या सिनेमातून मला जे साध्य करायचे आहे, ते उद्दिष्ट तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा सर्व पीडित लोक सक्षम होतील.

हा चित्रपट न्यायमूर्ती के चंद्रू यांच्या एका वास्तव जीवनातील घटनेवर आधारित आहे. जेव्हा ते वकील होते आणि ख्यातनाम अभिनेता सूर्याने ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील आशय आणि संवाद हेच त्याचे खरे नायक आहेत. जर तुमच्या आशयात खरा जीव असेल, तर चित्रपटातून निर्माता दिग्दर्शकाला जे सांगायचे असते, ते बरोबर सांगितले जाते आणि नंतरच्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात, असे ते म्हणाले.

प्रसिद्ध मल्याळी अभिनेते लिजोमोल जोस यांनी सांगितले की, तमिळभाषिक इरुला पात्र साकारणे हे त्यांच्यापुढचे खरे आव्हान होते. आणि हे पात्र साकारण्यात आदिवासी समुदायासोबत राहण्याचा अनुभव खूप कामी आला.

यावेळी अभिनेता मणिकंदनही उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, हा चित्रपट त्यांना अगदी अनपेक्षितपणे मिळाला. या चित्रपटामुळे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची आणि विशेषतः आंतरिक बदलासाठी कशी मदत झाली, हे सांगताना ते म्हणाले की, मी अशा लोकांना भेटलो आणि त्यांच्यासोबत राहिलो ज्यांच्याकडे आपल्या भौतिक जगातील कुठलीही सुखे-साधने नव्हती, तरीही ते पूर्ण समाधानी होते.

IFFIच्या भारतीय पॅनोरमा फीचर फिल्म्स विभागाअंतर्गत ‘जय भीम’चे प्रदर्शन झाले. दिग्दर्शक था से ज्ञानवेल हे तमिळ चित्रपट उद्योगातील भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहेत आणि ते ‘जय भीम’साठी प्रसिद्ध आहेत. कूटाथिल ओरुथन (2017) हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पाहिला चित्रपट आहे.

निर्माता 2D एंटरटेनमेंट ही एक पुरस्कारप्राप्त भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. तिची स्थापना अभिनेता, निर्माता आणि प्रस्तुतकर्ता सूर्या यांच्यासह राजसेकर पांडियन, ज्योतिका आणि कार्ती यांनी केली आहे.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content